काँग्रेसनं फिर्याद दाखल केल्यानं, अर्णब गोस्वामी अडचणीत

काँग्रेसनं फिर्याद दाखल केल्यानं, अर्णब गोस्वामी अडचणीत 


वेब टीम मुंबई : टीआरपी घोटाळ्यात नाव आलेले रिपब्लिक टीव्हीचे मालक, संपादक अर्णव गोस्वामी यांच्यावर आता देशाच्या सुरक्षेसंबंधी माहिती लीक केल्याचा आरोप होत असतांनाच गोस्वामी यांच्या विरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली.कांदिवलीतील समता नगर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. त्यामुळं गोस्वामी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टीआरपी घोटाळ्यात 'बार्क'चा माजी सीईओ पार्थो दासगुप्ता याला मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. त्याची  कसून चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्यान दासगुप्ता यानं अनेक महत्त्वाचे खुलासे केले असून अर्णव गोस्वामी हे मुख्य आरोपी असल्याचंही पोलिसांना सांगितलं आहे. गोस्वामी यांनी आपल्याला १२ हजार डॉलर्सचे हॉलिडे पॅकेज व एकूण ४० लाख रुपये दिल्याची कबुलीही दासगुप्ता यानं दिली आहे. त्यातच, अर्णव गोस्वामी व दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप संभाषणही पोलिसांना मिळालं आहे. त्यात भारतीय हवाई दलानं पाकिस्तानातील बालाकोट तळावर केलेल्या हल्ल्याच्या संदर्भातील संवाद आहे. गोस्वामी यांना या कारवाईची आधीच माहिती होती, असं त्यातून पुढं आलं आहे.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील असलेली ही माहिती अर्णव गोस्वामी यांना कशी मिळाली,कोणी दिली ?असा प्रश्न विचारला जात आहे. काँग्रेसनं तोच मुद्दा उचलून धरला आहे. याच प्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कांदिवली येथील समता नगर पोलीस ठाण्यात अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या कलम ५ अन्वये कारवाई करून अर्णव यांना अटक करा आणि त्यांची चौकशी करा,त्यांचे पाकिस्तानातील कोणाशी संबंध आहेत का?,' याची चौकशी करण्याची मागणीही काँग्रेसनं केली आहे.


Post a Comment

0 Comments