अहमदनगरच्या नामांतरावर ओवैसी म्हणाले, “अरे तुम्ही…”

अहमदनगरच्या नामांतरावर ओवैसी म्हणाले, “अरे तुम्ही…”

वेब टीम नगर : अहमदनगर शहराचे नामांतर करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे करावे अशी मागणी केली जात आहे .  याच मुद्द्यावर एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अरे तुम्ही नोकरी द्या, रोजगार द्या. आज भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ढासळत आहेत. आज पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. 

गॅस सिलिंडरच्या किमतीही वाढल्या आहेत. तुम्हाला फक्त नावांची काळजी लागली आहे. कामाची काळजी करायला हवी.

निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांचं काय झालं. सरकार चालवण्यात अपयश येत असल्यामुळे हे मुद्दे बाहेर काढले जात आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी  दिली.

ओवैसी यांनी वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात होणाऱ्या युतीवरही भाष्य केले आहे . प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्याशी युती करत आहेत. हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. आम्ही त्यांच्यासोबत होतो.आम्ही जेव्हा त्यांच्यासोबत होतो, तेव्हा वंचित समाजाचा विकास व्हावा हाच आमचा उद्देश होता.

देशातील वंचितांचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सशक्तीकरण हवे असेल तर अगोदर त्यांचे राजकीय सशक्तीकरण होणे गरजेचे आहे.

आता प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंसोबत गेले असतील तर मी काय म्हणू शकतो, अशी प्रतिक्रिया असदुद्दीन ओवैसी यांनी दिली.

त्यांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावरही भाष्य केले. “लव्ह आणि जिहाद हे कधीच सोबत येऊ शकत नाहीत. प्रेम ही संकल्पना पूर्णत: वेगळी आहे. तर जिहाद हादेखील वेगळा आहे. तलवार उचलून कोणालाही मारून टाकणे, म्हणजेच जिहाद असल्याचा समज आहे. मात्र ते चुकीचे आहे.

भारतात १८ वर्षे झालेल्या व्यक्तीला त्याच्या आवडीनुसार लग्न करण्याचा अधिकार आहे. एखादी व्यक्ती आपल्या मनाने जोडीदार निवडून लग्न करत असेल, तर कोणालाही त्याबाबत आक्षेप नसावा. ज्या-ज्या राज्यात लव्ह जिहादचा कायदा करण्यात आला. ते सर्व कायदे असंवैधानिक असल्याचे न्यायालयाने सांगितलेले आहे, असेही औवैसी म्हणाले.

Post a Comment

0 Comments