राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल

राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल 

धमकीचं पत्र मिळाल्यानंतर बाळा नांदगावकरांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट

वेब टीम मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. बाळा नांदगावकर यांनी याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी यासंबंधी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

“मला एक धमकीचं पत्र आलं आहे. भोंग्याचा विषय समोर आल्यापासून अशा प्रकारच्या धमक्या मिळत आहे. पत्रात माझ्यासोबत राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मी राज ठाकरेंना पत्र दाखवलं आणि काल संध्याकाळी पोलीस आयुक्तांना भेटलो. पत्राची प्रत त्यांना दिली आहे. पोलीस काय कारवाई करतात ते पाहू,” असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

“अजानबाबात जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करु. तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू,” असं पत्रात लिहिलं असल्याची माहिती नांदगावकरांनी यावेळी दिली. हे हिंदी पत्र असून त्यात उर्दू शब्दही आहेत अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

पुढे बोलताना सांगितलं की, “पत्र कोणी दिलंय याची माहिती नाही. पण ते पोस्टातून माझ्या कार्यालयात आलं आहे. गृहमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी ताबडतबोत पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. पण मी एवढंच सांगू इच्छितो की, बाळा नांदगावकर ठीक आहे पण राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही याची दखल राज्य सरकारने घ्यावी. मी वारंवार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे. राज्य सरकार दखल घेत नाही, किमान केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी”.

Post a Comment

0 Comments