तर मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतणार

तर मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतणार 

वेब टीम नगर : नाफेडने राज्यातील हरभरा खरेदी बंद केली आहे. त्यामुळे राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे तर किसान सभा राज्य सरकार विरोधात आक्रमक झाली आहे. किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेयांनी राज्यातील मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे

डॉ. अजित नवले म्हणाले की, खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करून दिलेल्या मुदतीपूर्वीच नाफेडने हरभरा खरेदी बंद केली आहे. हरभरा उत्पादक शेतकरी सरकारच्या या कृतीमुळे हवालदिल झाले आहेत. राज्यभर खरेदी केंद्रांवर हजारो वाहने उभी असताना अचानक खरेदी बंद केल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी झाली आहे.

पुणतांब्यातील शेतकरी शिष्टमंडळाची शरद पवार यांच्याशी चर्चा 

ते पुढे म्हणाले की, वाहनांचे भाडे दररोज वाढत असून नाईटचार्ज भरावा लागत असल्याने व खरेदी होईल याची शाश्वती नसल्याने शेतकरी काकुळतीला आले आहेत. राज्यात नाफेड द्वारे 5 हजार 230 रुपये प्रति क्विंटल दराने हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरु होती. खुल्या बाजारात 4200 रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा विकण्याचा पर्याय निवडला होता.

नाफेडकडे रितसर नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना एस.एम.एस. पाठविण्यात आले होते. रितसर एस.एम.एस. आलेल्या शेतकऱ्यांनी वाहने भाड्याने करून आपला माल खरेदी केंद्रांवर आणला असताना आता खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण सांगून खरेदी नाकारली जात आहे. शेतकऱ्यांमध्ये यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे. 23 मे रोजी अचानक खरेदी बंद झाल्यामुळे केंद्रांवर आणलेल्या मालाचे काय करायचे असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने हरभरा खरेदी पुन्हा सुरू करावी तथा राज्य सरकारनेही हरभरा उत्पादक शेतकऱ्यांबाबत योग्य पावले उचलावीत, अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचे आंदोलन केले जाईल असा इशारा किसान सभेने दिला आहे. 


Post a Comment

0 Comments