कलम ३७० हटवल्यानंतर किती काश्मिरी पंडितांची हत्या झाली?

कलम ३७० हटवल्यानंतर किती काश्मिरी पंडितांची हत्या झाली?


गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली माहिती

वेब टीम नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी राज्यसभेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मागील पाच वर्षांमध्ये काश्मिरच्या खोऱ्यात अल्पसंख्यांक समाजातील ३४ जणांचा मृत्यू झालाय. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी यासंदर्भात माहिती दिली. ५ ऑगस्ट २०१९ पासून या वर्षाच्या मार्च जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांकडून चार काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आलीय. तसेच अन्य १० हिंदू वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत. सध्या काश्मिरच्या खोऱ्यात पुन्हा एकदा दुसऱ्या राज्यांमधून आलेले मजूर आणि अल्पसंख्यांकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जात आहे. सोमवारी बालकृष्ण नावाच्या एका काश्मिरी पंडितावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. तर या घटनेनंतर पुढील २४ तासांमध्ये पंजाब आणि बिहारमधून आलेल्या चार मजुरांना गोळीबार करुन दहशतवाद्यांनी जखमी केलं.

गृह राज्यमंत्री नित्यानंतर राय यांनी एका लेखी स्वरुपात दिलेल्या उत्तरामध्ये सरकारने काश्मिरच्या खोऱ्यात अल्पसंख्यांक समुदायाची सुरक्षा निश्चित करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्याचं सांगितलं. यामध्ये सशक्त सुरक्षा, स्टॅटिस्टीक गार्ड्सच्या स्वरुपामध्ये सामूहिक सुरक्षा, या क्षेत्रामध्य् दिवसरात्र डोमिनेशन, तपास नाक्यांच्या माध्यमातून २४ तास येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी, अल्पसंख्यांक राहत असणाऱ्या वस्त्यांमध्ये सुरक्षा दलांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्यात, असं सांगितलं.

अन्य एका उत्तरामध्ये गृह राज्यमंत्र्यांनी काश्मिरमध्ये सीमेपलीकडून होणारी घुसखोरी २०१८ पासून कमी झाल्याचं म्हटलंय. २०१७ मध्ये १३६ वेळा घुसखोरी झाली. २०१८ मध्ये १४३ वेळा, २०१९ मध्ये १३८ वेळा, २०२० मध्ये ५१ वेळा तर २०२१ मध्ये हा आकडा ३४ इतका होता. घुसखोरी रोखण्यासाठी सरकार उपाययोजना करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा व्यवस्था, गुप्त आणि माहिती देवाण-घेवाणीमध्ये सुधारणा, सुरक्षा दलांना आधुनिक हत्यारं पुरवणं यासारख्या गोष्टींचा यामध्ये समावेश असल्याचं सरकारने स्पष्ट केलं.

सरकारने दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स भूमिका स्वीकारल्याने जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादाच्या घटना कमी झाल्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणाले. सन २०१८ मध्ये ४१७ दहशतवादी घटना झाल्या होत्या. २०१९ मध्ये यात घट होऊन आकडा २५५ वर पोहोचला. २०२० मध्ये २४४ तर २०२१ मध्ये २२९ वर हा आकडा होता.




Post a Comment

0 Comments