राष्ट्रीय स्तरावर समविचारी लोकांनी एकत्र येण्याची गरज

राष्ट्रीय स्तरावर समविचारी लोकांनी एकत्र येण्याची गरज 

शरद पवार,ममता बॅनर्जी यांची मुंबईत बैठक  

वेब टीम मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामधील आजच्या बैठकीची गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू होती. राज्याच्या राजकीय वर्तुळासोबतच राष्ट्रीय पातळीवर देखील ही भेट चर्चेत होती. भाजपाविरोधी आघाडीच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी शरद पवारांशी चर्चा करणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर ही शक्यता खरी ठरली असून फक्त आघाडीविषयीच नाही, तर २०२४च्या निवडणुकांच्या अनुषंगाने या दोन्ही राजकीय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. बैठकीनंतर शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी बोलताना याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजपाला देशात सक्षम पर्याय तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यासाठीच ममता बॅनर्जी यांनी आमची भेट घेतल्याचं देखील ते म्हणाले. “आजच्या परिस्थितीत राष्ट्रीय स्तरावर सारख्या विचारांच्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन नव्या नेतृत्वासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. यासोबतच, सगळ्यांनी मिळून भाजपाला सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. २०२४च्या निवडणुकांमध्ये हा पर्याय उपलब्ध व्हायला हवा. यासाठीच त्यांनी आमची भेट घेतली आहे. आमची सकारात्मक चर्चा झाली आहे”, असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, ममता बॅनर्जी भाजपाविरोधी आघाडीमध्ये काँग्रेसला वगण्याच्या भूमिकेत असताना शरद पवारांनी मात्र त्यावर वेगळी भूमिका घेतली आहे. “काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाशिवाय हा पर्याय उपलब्ध करण्याचा प्रश्नच नाही. भाजपाविरोधी असलेल्या कुणालाही एकत्र यायचं असेल, तर त्यांचं स्वागत आहे. नेतृत्व हा आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही, आमच्यासाठी सक्षम पर्याय उपलब्ध करून देणं हा महत्त्वाचा विषय आहे. कुणाचं नेतृत्व वगैरे ही दुय्यम बाब आहे. कुणाला वगळण्याचा प्रश्न नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा मुद्दा आहे. ज्याची मेहनत करायची तयारी आहे, सगळ्यांसोबत काम करण्याची तयारी आहे त्यांना सोबत घेऊन चालायचं”, असं शरद पवारांनी यावेळी नमूद केलं.

Post a Comment

0 Comments