अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग : अहमदनगर आणि मालोजीराजे भोसले

अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग 

अहमदनगर आणि मालोजीराजे भोसले 

बहामनी राज्याचे काही कारणांनी पाच शकले झाली त्यामध्ये अहमदनगरची निजामशाही ,गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही,  विजापूरची आदिलशाही आणि वऱ्हाडची इमादशाही या पाच शाह्यामध्ये स्वतःच्या सत्तेचा प्रसार व वाढ व्हावी यासाठी आपापसात खूप मोठी चुरस निर्माण झाली होती.  हिंदू समाजातील हुशार व कर्तबगार माणसांना शोधून त्यांच्या कर्तबगारी नुसार निरनिराळ्या प्रकारचे शासकीय यंत्रणेतील कमी-जास्त महत्त्वाच्या जागा या मंडळींना मिळू लागल्या यामध्ये कोणी शिपाई पासून सरलष्कर पर्यंत पोचले, तर कोणी कारकुना पासून सरकारकुना पर्यंत पोहोचले भोसले घराणे यापैकीच एक होते. 

"त्यांचे मूळ पुरुष बारडजी  राजे भोसले हिंदुस्तान चित्तोड सोमवंशी क्षत्रिय मुख्य सार्वभौमत्व पातशहाचे उपमा ने दक्षिण देशी आले हे मूळ पुरुष त्याकाळी तिकडे आजादी चे  कित्येक बंद  होती, त्यांचे पारिपत्य करण्याकरता दक्षीण देशी या क्षेत्री यादी उमराव धर्मसंस्थापक मुखत्यार करण्यात आले. "

वरील मजकूर शिवाजी महाराजांचे चुलत  घराणे त्यांचे वारस कर्जत तालुक्यातील भिकाजी राजे भोसले यांनी अहमदनगर वस्तुसंग्रहालयाला काही जुन्या वस्तू ,दांडपट्टे , ढाली , विषपरीक्षा पात्र या प्रकारच्या वस्तू व काही हस्तलिखित पोथ्या वंशवेल आदींचा समावेश आहे. त्यातील वंशवेल मध्ये वर लिहिलेला मजकूर आहे या वंशावळी अठराव्या व एकोणिसाव्या शतकात तयार केल्या आहेत.  परंतु या वंशावळी मध्ये शके १३७९ असा उल्लेख केला आहे त्याप्रमाणे इसवीसन१४५७ साल येते.  हे शक व्यंकोजीराजे यांच्या नावापुढे आहे हे व्यंकोजीराजे बारड जी राजे यांची चौथी पिढी आहे आणि मालोजी बिन बाबाजी ही वंशावळी वरून सहावी पिढी आहे काही ऐतिहासिक कागदपत्रावरून शहाजी मालोजी भोसले असा उल्लेख आहे . राधा -माधव विलास चंपू या ग्रंथात मालोजीराजे यांच्यापासून माहिती देण्यात आली आहे.  या संपूर्ण राहणा-या शिसोदे घराण्याशी संबंध जोडला आहे . परंतु मालोजीराजे यांचा जन्म कसा व कोठे झाला याचा उल्लेख आढळत नाही. 

त्यांची अनुवंशिक पाटीलकी व देशमुखी वतन हे भीमा नदीच्या तीरावर दौंड पासून दहा कोसांच्या अंतरावर ते अंतर साधारणपणे पेडगाव तालुका श्रीगोंदा पर्यंत येत असावे.  मालोजीराजे हे निजामशाहीचे मनसबदार होते त्यांना किती मनसब  होती व त्यापासून किती उत्पन्न मिळे याचा कोठेही उल्लेख नाही . अहमदनगर येथे अर्बन बँक परिसरात त्यांचा खूप मोठा वाडा होता त्याला सरकार वाडा म्हणत होते कदाचित मालोजीराजे यांना 'सरकार' हा किताब मिळाला असावा त्यामुळे कदाचित अहमदनगरला सरकार अहमदनगर म्हणत होते.  त्या वाड्याच्या शेजारी त्यांनी अमृतेश्वराचे मंदिर बांधले आहे ते आजही चांगल्या स्थितीत आहे. 

शिवभारतकार सांगतात निजामशाही व आदिलशाही यांच्या मध्ये काही कारणाने वितुष्ट आले . त्या वेळेला निजामाने मालोजी राजे व त्यांचे भाऊ विठोजी यास आदिलशाहीविरुद्ध विरोधी पाठविले . परंतु निजामशहाचे आज्ञेने तो इंदापूर पर्यंतच्या स्वारी मध्ये गेले असता त्यांना मरण आले त्यांच्या जन्माची कोठेही नोंद नसल्यामुळे त्यांना कितव्या वर्षी मरण आले हेही सांगता येत नाही.  यांच्या बायकोचे नाव उमा  होते.  त्या फलटणचे निंबाळकर घराण्यातील होत्या असे शिवभारत सांगते . त्यांचे लग्न होऊन बरेच दिवस झाले होते, परंतु त्यांना मूलबाळ काही नव्हते शंकराच्या आराधनेने व अहमदनगर मधील शहाशरीफ सिद्ध पुरुषाच्या आशीर्वादाने दोन वर्षाच्या अंतराने दोन मुले झाली .  शहा शरीफ त्या सिद्ध पुरुष याच्या आशीर्वादाने मुले झाली त्यामुळे त्यांचे नाव शहाजी व शरीफजी असे ठेवले असे शिवभारतकार सांगतात शहाजी यांचा जन्म१५९९ मध्ये मार्च महिन्यात १८ तारखेला झाला असे बीकानेर येथील टिपण सांगते मालोजीराजांचे  राजकारण काय याची  तपशीलवार माहिती मिळत नाही. 

ग्रँड डफ ने अशी माहिती दिली आहे की,  निजामशाही खजिन्यावर दिनार नावाची व्यक्ती काम करत होती.  त्या वेळेला चोरांकरवी  दिनारने  काही खजिना लुटला व तो मालोजीस दिला अशा प्रकारे राजांचे कान  भरविले राजाने दिनारास कैद केले व चौकशीअंती काही पुरावा मिळाला नाही.  त्याची सुटका झाली त्यासाठी मालोजीराजांनी मदत केली त्यामुळे मुंगी तालुका शेवगाव च्या ठिकाणची अर्धी  पाटीलकी  दिनारची होती .याची  निजामाची खात्री पटल्यावर मालोजीरावास पक्की पाटीलकी करून दिली. 

 लेखक :  नारायण आव्हाड ( 9881963603)

 मोडीलिपी वाचक 

 संदर्भ मराठ्यांचा इतिहास

 अ .रा. कुलकर्णी -ग. ह. खरे 

आवृत्ती 2021 .

Post a Comment

0 Comments