नगरटुडे बुलेटीन 14-01-2021

 नगरटुडे  बुलेटीन 14-01-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिक्षकांच्या मागण्या मान्य न झाल्यास उपोषण करणार:शहराध्यक्ष प्रसाद शिंदे 

वेब टीम नगर :  शिक्षकांच्या विविध मागण्या शासन दरबारी पाठपुरावा करावा या साठी कास्ट्राईब शिक्षक संघटना अहमदनगर शहाराध्यक्ष प्रसाद शिंदे  यांच्या पुढाकारातून शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग कार्यालय येथे निवेदन दिले

      आणि शिक्षकांच्या मागण्या विषयी विनंतीपूर्वक सोडवाव्यात अशी मागणी केली. आहे  की शिक्षकांच्या विविध मागण्या संदर्भात आपण शासन दरबारी आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून  पाठपुरावा करावा. शिक्षकांच्या बाबतीत वेगवेगळ्या मागण्या संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा केला जात आहे पुढील मागण्या विषयावर मार्ग निघावा या साठी संघटनेच्या माध्यमातून शिक्षणाधिकार्या ची भेट घेतली आहे

 २० टक्के  अनुदानित प्राप्त शिक्षकांचे वेतन नियमित व्हावे

२० टक्के अनुदानित शाळांचे वेतन देयक  प्लॅन'मधून नॉन प्लॅन मध्ये समाविष्ट करण्यात यावेत

 प्राथमिक शिक्षकांचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची मुभा  मिळावी

  शासनाने घोषित केलेल्या २०टक्के वाढीव टप्पा अनुदान त्वरित निर्गमित करावे

 २० टक्के  अनुदान प्राप्त शिक्षकांना ७ वा वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळावा

समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी विशेष शिक्षकांना  शासकीय सेवेत कायम करावे व वेतन श्रेणीनुसार वेतन मिळावे..

 या सर्व मागण्या बाबतीत वेळोवेळी निवेदन देऊनही  सकारात्मक गोष्टी होत नाही  

शिक्षकांचे पगार नियमित होत नाही त्यामुळे असंख्य अडचणी शिक्षकांना येत आहेत.सध्याच्या परिस्थिती शिक्षकांचे जिवन असह्य झाले आहे.या बाबतीत शासकीय स्थरावर देखील दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात असे न झाल्यास तसेच

२० टक्के अनुदान शिक्षकांचे मानधन दिनांक १८ जानेवारी २०१९ पर्यंत खात्यावर जमा न झालात संघटनेच्या माध्यमातून साखळी उपोषण करण्यात येणार आहे अशी माहिती कास्ट्राईब शिक्षक संघटना शहराध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी दिली आहे.

या प्रसंगी कांतीलाल खुरंगे, उमेश शिंदे , राहूल मोरे, मार्टीन पारधे, सिराज खान, आदी शिक्षक या प्रसंगी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विकासपर्वाची पुनरावृत्ती करण्यासाठी  सशक्त दबाव गट उभा करा 

 डॉक्टर सर्जेराव निमसे : नवनीतभाई बार्शीकर जन्मशताब्दी 

वेब टीम नगर : नगरचे राजकारण अतिशय गढूळ झालंय. कोळसा जसा कितीही उगाळला तेवढा काळाच ..अशा राजकारणा  पेक्षा नवनीत भाईचां सुवर्ण काळ आठवून त्या विकासपर्वाची पुनरावृत्ती करण्यासाठी आपण एक सशक्त दबाव गट उभा करून या शहराला पुन्हा वैभव प्राप्त करून देवू ..जन्म शताब्दी निमित्त हीच भाइना योग्य आदरांजली होईल अशा शब्दात माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे यानी अभिवादन केले.. नवनीत विचार मंच माध्यमातून अध्यक्ष सुधीर मेहता यानी भाईंची आठवण जपण्याचे आणि  जन्मशताब्दी निमित्त विविध प्रकल्पांचे आयोजन केले आहे त्यात सर्वांनी सहभागी व्हावे आणि सहकार्य करावे असे आवाहन निमसे यानी केले...

नवनीत भाईंच्या जन्म शताब्दी कार्यक्रमात डॉक्टर निमसे सुभाष शेठ मुथा मंचचे अध्यक्ष सुधीर मेहता यानी प्रतिमेचे पूजन केले..

इंजिनिअर अमृत मुथा आर्किटेक्ट असोसिएशनचे अर्शद भाई शेख रसिक ग्रुप चे जयंत येलुलकर.. जागरूक मंच चे सुहासभाई मूळे, पत्रकार प्रकाश कुलकर्णी, सुशील शाह, जनार्दन शिरसाठ, डॉक्टर कमर सूरुर,श्रीमती बागडे राजन नवले, महावीर पोखरणा अबिद खान आदींनी अभिवादन करून आपल्या भावना व्यक्त करून शताब्दी कार्यक्रमाबाबत सूचना मांडल्या.

प्रारंभी नवनीत विचार मंचचे अध्यक्ष सुधीर मेहता यानी शताब्दी समितीच्या अध्यक्ष पदासाठी डॉक्टर निमसे यांच्या नावाची सूचना केली सुभाष मुथा यांनी अनुमोदन दिले आणि सर्वांनी टाळ्या वाजवून या निवडीचे स्वागत केले .. सुधीर मेहता यानी भाईंची उपेक्षा करणारांना आतानगर कर कृतघ्न पालिका पुरस्कार देतील असे सांगितले .. सर्व संस्था संघटना एकत्र अल्यातर भाईंची स्मृती जपण्याचा उद्देश सफल होईल.. प्रत्येकाने आपल्या घरावर नवनीत नगर आणि शहरात कृतज्ञता फलक लावावेत असे आवाहन करतानाच गौरव ग्रंथ साथ सर्वांनी सहकारी करावे असे आवाहन केले

यावेळी बोलताना सुधीर मेहता म्हणाले की, नवनीतभाई बार्शीकर विचार मंचाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष भाईंचे विचार जपण्याचे काम आम्ही केले. भाईंनी नगर शहराला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. परंतु त्यांनी विकासाच सुरू केलेलं काम खंडित झालं आहे. ते नव्याने सुरू होण्याची गरज आहे. अभिवादन कार्यक्रम मध्ये मेहता यांनी नेहरू उद्यानाच्या पुनरुज्जीवन करण्यासाठी नवनीतभाई विचारमंच पुढाकार घेईल असे जाहीर केले.

सुभाष मुथा म्हणाले की, आम्ही भाईंच्या बरोबर काम केलं. तो काळ सुवर्णकाळ होता. आम्ही त्यांच्या नावाने होणाऱ्या जन्मशताब्दी महोत्सवासाठी सर्वतोपरी योगदान देऊ. किरण काळे म्हणाले की, त्यांचे विचार शहरातील आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहचवीण्याची गरज आहे. जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी तरुणांच्या जास्तीत जास्त सहभागासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

जयंत येलुलकर म्हणाले की, भाईंमध्ये मध्ये रसिकता होती. त्यांनी केलेल्या विकास कामांच्या मधून ती प्रकर्षाने जाणवते. येलूलकर म्हणाले नवनीत विचार मंचच्या या शताब्दी कार्यक्रमात आपण पूर्ण ताकतीने सहभागी होऊन सुधीर मेहता यांचे त्यांनी खुल्या मनाने अभिनंदन केले आणि त्यांच्यामुळे आठवण, त्यांच्या कार्याची ओळख आजच्या पिढीला होत आहे असे ते म्हणाले. हर्षद शेख यांनी सांगितले की शहराची दुरावस्था झाली आहे प्रत्येक ठिकाणी पावलोपावली भाईंच्या कामाची आठवण नगरकरांना होत असते . 

भाईंच्या बरोबर इंजिनिअर म्हणून काम केलेले अमृत मुथा यांनी सांगितले आज नगरहून तरुण पिढी नोकरीकरिता बाहेर जाता होती .त्याकाळात भाईंनी मला नगरला आणलं आणि पालिकेचे महत्त्वाचे प्रकल्प राबवण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली महत्त्वाची मोठी कामे आज मात्र नगरला तरुणांना रोजगार नाही अशी खंत अमृत मुथा यांनी व्यक्त केली.सुधीर मेहता यांचे त्यांनी अभिनंदन केले त्यांच्यामुळे आज भाईंची आठवण जपली जातानाच नगरच्या विकास प्रश्नांना सुद्धा नवनीत विचार मंचच्या माध्यमातून चालना मिळणार आहे असे सांगितले.

सुहास मुळे म्हणाले की, भाईंच्या रूपाने नगरला विकासपुरुष मिळाला. हे शहराचे भाग्य आहे या वेळी सुहास मूळे यानी आपली सर्वांची वज्रमूठ करा सगळे सरळ होतील असे सांगीतले. यावेळी बोलताना अर्शद शेख यांनी सांगितले की, शहराची दुरावस्था झाली आहे. प्रत्येक ठिकाणी पावलोपावली भाईंच्या कामाची आठवण नगरकरांना होत असते

कार्यक्रमाचे संयोजन सुशील शाह ,श्रीराम जोशी, जनार्दन शिरसाठ, किशोर मूनोत, सायली मेहता आदींनी केले .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आत्मविश्‍वास देणारे योध्दे म्हणजे स्वामी विवेकानंद

शेखर पाटील :जिल्हा क्रीडा कार्यालय व जय असो च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन

वेब टीम नगर : जीवनाच्या रणभूमीत युवकांना सामर्थ्य व आत्मविश्‍वास देणारे योध्दे म्हणजे स्वामी विवेकानंद होय. मानवी जीवनाला व युवाशक्तीला ऊर्जा त्यांच्या विचारांनी मिळते. जीवनात संघर्ष करण्याची प्रेरणा व ज्ञान त्यांनी दिले. भारताला सर्वोच्च शिखरावर नेण्याचे कार्य स्वामीजींनी केले. त्यांचे विचार व कार्यातून आजच्या युवाशक्तीने प्रेरणा घेऊन आपले ध्येय गाठण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले.

वाडिया पार्क क्रीडा संकुल येथ अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय व जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) आयोजित राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील बोलत होते. यावेळी जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, जय असोसिएशन ऑफ एनजीओचे अध्यक्ष अ‍ॅड.महेश शिंदे, अ‍ॅड. अनिता दिघे, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. अमोल बागुल, पोपट बनकर, क्रीडा अधिकारी दीपाली बोडखे,राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे, विशाल गर्जे, सागर अलचेट्टी, सलीम सय्यद, रजनी ताठे, भोर आदी उपस्थित होते.

प्रारंभी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या सप्ताहाचे शुभारंभ करण्यात आले. प्रास्ताविकात राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे यांनी राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत सात दिवस व्याख्यान, निबंध, वक्तृत्व, चित्रकला, वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महिलांच्या सबलीकरणासाठी व्याख्यान घेतले जाणार आहे. दि.१९ जानेवारीला या सप्ताहाचा समारोप होऊन बक्षीस वितरण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत स्वामी विवेकानंद यांची पुस्तके देऊन करण्यात आले.

अ‍ॅड. अनिता दिघे म्हणाल्या की, स्वामी विवेकानंद युवा शक्तीची प्रेरणा व ऊर्जास्त्रोत आहे. त्यांचे विचार आजच्या युवा पिढीने आत्मसात केले पाहिजे. अमेरिकेत झालेल्या परिषदेत त्यांनी आपल्या भाषणाने आपली संस्कृती व संकल्पना जगा समोर मांडली. स्वामींच्या विचाराने नैराश्य जीवनात चैतन्य निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅड. भानुदास होले म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना अठरापगड जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली. जिजाऊ या स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणास्थान होत्या. शिवाजी महाराजांवर संस्कार घडवून एक रयतेचे राज्य असतित्वात आले. महिलांनी राजमाता जिजाऊंचा आदर्श ठेऊन शिवबांसारखे संस्कार मुलांमध्ये रुजविल्यास समाजात महिलांवर अन्याय, अत्याचार होणार नसल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले. आभार क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एव्हरेस्ट व लक्ष्य करिअर अकॅडमी व विविध स्वयंसेवी संस्थांच्या युवक-युवतींनी परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कृषी कायद्यांना स्थगिती देणार्‍या निर्णयाचे स्वागत

पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन : समिती समोर शेतकरी संरक्षण कायद्याचा प्रस्ताव मांडणार

वेब टीम नगर :  शेतकर्‍यांच्या आंदोलनाची दखल न घेणार्‍या केंद्रातील भाजप सरकारला सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच मंजूर करण्यात आलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांना स्थगिती देऊन झटका दिला आहे. पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीत नगरचे अनिल घनवट यांची नियुक्ती केली असून, त्यांच्या माध्यमातून देशात शेतकरी संरक्षण कायदा आनण्याची मागणी समिती समोर मांडण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीस स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्याची समीक्षा करण्यासाठी चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे. समितीत शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शेतकरी नेत्याला या समितीत स्थान मिळाल्याने शेतकरींचे प्रमुख प्रश्‍न त्यांच्या समोर मांडून देशात शेतकरी संरक्षण कायद्याची गरज असल्याचा प्रस्ताव देखील त्यांच्या समोर संघटनेच्या वतीने मांडण्यात येणार आहे. शेतकर्‍यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाशी सुसंगत बाजारभाव मिळावा, डॉ. स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी शेतकरी संरक्षण कायद्यात समाविष्ट असण्याची प्रमुख मागणी देखील करण्यात येणार असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

दिल्लीतील आंदोलक शेतकर्‍यांना शेवट पर्यंत केंद्रातील भाजप सरकारने न्याय दिला नाही. शेवटी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयास हस्तक्षेप करावा लागला आहे. नवीन कृषी कायद्यांचा प्रश्‍न केंद्र सरकारने सहानुभूतीपुर्वक सोडवण्याची गरज होती. सरकारने शेतकर्‍यांचे खरे प्रश्‍न समजावून घेऊन देशात शेतकरी संरक्षण कायदा असतित्वात आनण्याची गरज असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले. शेतकरी बांधवांच्या आत्महत्या थांबून, त्यांचा विकास साधण्यासाठी देशात शेतकरी संरक्षण कायदा आनण्यास संघटनेचे अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, प्रकाश थोरात, वीरबहादूर प्रजापती, कॉ.बाबा आरगडे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शेतकरी विरोधी तीन नवीन कृषी कायदे रद्द करा 

शेतकर्‍यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ : राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाचे  धरणे आंदोलन 

वेब टीम नगर : नव्याने पारीत करण्यात आलेल्या तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या प्रदीर्घ आंदोलनाची दखल सरकार घेत नसल्याच्या निषेधार्थ शहरातील मार्केटयार्ड चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनास पाठिंबा व्यक्त करुन नव्याने पारीत करण्यात आलेले शेतकरी विरोधी तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली.  

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी सत्ताधारी भाजप सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ पाटील, ह.भ.प. भगवान शास्री घुगे, हरजितसिंह वधवा, राजू मदान, संजय सावंत, गणेश चव्हाण, शिवाजी भोसले, संजय संसारे, भारतीय बौध्द महासभेचे संजय कांबळे, अण्णा गायकवाड, सतीश बोरुडे, शाहरुख शेख, दत्ता सावंत, संतोष सावंत, सुदाम सावंत, लक्ष्मण सावंत, अमर सातुरे आदी सहभागी झाले होते.

बाळासाहेब मिसाळ पाटील म्हणाले की, भाजप आणि संघ परिवार दिल्लीच्या आंदोलना विषयी गंभीर नाहीत. शेतकरी दिल्ली येथील थंडीच्या कडाक्यात आंदोलन करीत आहे. तर आंदोलन दडपण्यासाठी त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले जात आहे. दीड महिना उलटून देखील केंद्र सरकार आपली अडमुठी भूमिका सोडण्यास तयार नाही. सरकार केवळ चर्चेच्या फेर्‍या घडवून आणत आहेत. शेतकरी कायदा मागे घ्यावा ही प्रमुख मागण्या असताना सरकार मागे हटायला तयार नाही. सरकारने हे आंदोलन केवळ पंजाब, हरियाणाच्या शेतकर्‍यांचे आंदोलन असल्यचे चित्र निर्माण करण्याचे काम केले. मात्र या आंदोलनात संपुण देशातील शेतकरी उतरले आहेत. महाराष्ट्रातून देखील अनेक शेतकरी या आंदोलनासाठी दिल्लीला गेले आहेत. हा कायदा रद्द झाला तर देशभरातील सर्व शेतकर्‍यांचा फायदा होणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. हरजितसिंह वधवा यांनी या धरणे आंदोलनास पाठिंबा देऊन दिल्लीतील भूमीपुत्रांच्या आंदोलनास खलिस्तानी आतंकवादी म्हणून संबोधने हे शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. अशा चुकीच्या प्रचाराने शीख, पंजाबी समाजाच्या भावना  देखील दुखावल्या आहेत. सर्वसामान्य शेतकर्‍यांचे हे आंदोलन असून, सरकारने त्यांची दखल घेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाची केंद्र सरकार दखल घेत नसल्याने या आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी संपुर्ण देशात राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन रविवार दि.१७ जानेवारी पर्यंत चालणार आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अर्बन बँकेच्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नका : सुभाषचंद्र मिश्रा

         वेब टीम  नगर : गेल्या वर्षापासून अर्बन बँकेचा प्रशासक म्हणून काम पाहतांना वेळोवेळी नवनीतभाई बार्शीकरांच्या नावाचा उल्लेख झाला. त्यामुळे चेअरमन म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय मला झाला आहे. आदर्शवत कार्य नवनीतभाई बार्शीकर यांनी आपल्या चेअरमनपदाच्या काळात केले आहे. अर्बन बँकेच्या प्रगतीत स्व.नवनीतभाई बार्शीकरांचे मोठे योगदान आहे. आर.बी.आय.च्या मार्गदर्शक तत्वानुसार अर्बन बँकेच्या चाकण व सिन्नर या तोट्यात चाललेल्या शाखा बंद करण्याचा निर्णय बँकेचे हित पाहूनच घेतला आहे. मात्र काही जण जाणूनबुजून सोशल मीडियामधून बँकेबद्दल अपप्रचार करत आहेत. तरी सर्व सभासद, ठेवीदार व कर्जदारांनी अर्बन बँकेच्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अर्बन बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी केले.

स्व.नवनीतभाई बार्शीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नगर अर्बन बँकेत त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शिंगटे, प्रमुख व्यवस्थापक सुनील काळे, राजेंद्र डोळे आदिंसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शिंगटे म्हणाले,  नगर शहराच्या विकासात जेवढे बहुमोल योगदान नवनीतभाई बार्शीकर यांनी दिले आहे, तेवढेच मोलाचे कार्य अर्बन बँकेच्या प्रगतीसाठी त्यांनी केले आहे. अनेक वर्षापासून अर्बन बँकेत नवनीतभाईंची जयंती व पुण्यतिथी निमित्त विशेष कार्याक्रमचे आयोजन केले जात आहे. यावर्षीही खंड न पडता त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कायद्याचे पालन करत आपापल्या हक्कांसाठी सर्वांनी सजग असावे

: मुख्य न्यायदंडाधिकारी पी.एस.चांदगुडे : कायद्याच्या जनजागृतीने राष्ट्रीय युवादिन साजरा

वेब टीम नगर : स्वामी विवेकानंद हे तेजस्विता, तत्परता व तपस्विता याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करतांना युवकांमधील प्रचंड उर्जेच्या स्रोताला चांगल्या प्रकारे वळण देण्याचे काम होणे गरजेचे आहे. चांगल्या जीवनशैलीसाठी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कायदे व नियमांच्या जनजागृतीसाठी राष्ट्रीय, राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तत्पर आहे. धर्म व कायदा हे एकच आहेत. धर्माचे पालन म्हणजेच कायद्याचे पालन होय. कायद्याचे पालन करत आपापल्या हक्कांसाठी सर्वांनी सजक असावे. जनजागृतीसाठी झालेल्या या शिबिरातून युवकांना कायद्याचे चांगले ज्ञान मिळाले आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी पी.एस.चांदगुडे यांनी केले.

          जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या वतीने सी.एस.आर.डी. समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कायदेविषयक जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थाना वरून मुख्य न्यायदंडाधिकारी पी.एस.चांदगुडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश रेवती देशपांडे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, शहर बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड.भूषण बऱ्हाटे, सेन्ट्रल बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष काकडे, सी.एस.आर.डी. समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक डॉ.सुरेश पठारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

          प्रास्ताविकात  न्यायाधीश रेवती देशपांडे म्हणाल्या, तरुण म्हणजे प्रचंड उत्साह, काहीतरी करुन दाखवण्याची धडपड, तरुण म्हणजे प्रचंड जोश, अफाट इच्छाशक्ती. आजच्या तंत्रज्ञानात तरुणांची भरारी विलक्षणीय आहे. परंतू व्यसनाधीनता, चंगळवाद, सोशल मिडीयाचा अतिरेक वापर ही तरुण पीढीला लागलेली वाळवी आहे. म्हणूनच ‘उठा, जागेव्हा आणि ध्येयसिद्धी झाल्या शिवाय थांबू नका’ हा स्वामी विवेकानंदांनी दिलेला संदेश युवकांनी अंगिकारला पाहिजे. राजमाता जिजाबाई यांचेही महान कार्य आज सर्वाना मार्गदर्शक आहे. युवकांना कायद्याचे चांगले ज्ञान असावे यासाठी जिल्हा विधिसेवा प्राधिकरण जनजागृतीचे उपक्रम राबवत आहे.

          जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी व्याख्यानात सार्वजनिक उपयोगीता सेवा आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजना बद्दल माहिती दिली. युवकांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक महत्वपूर्ण योजना आहेत. या योजनाचा लाभ युवकांनी घ्यावा, असे आवाहन केले. 

यावेळी ॲड.भूषण बऱ्हाटे यांनी व्याख्यानातून दारिद्र्य निर्मुलन योजनांची प्रभावी अंमलबजावणी या विषयावर माहिती दिली. ते म्हणाले, जिल्हा विधिसेवा प्राधिकरण सर्वसामान्यांना न्याय व ज्ञान देण्याचे महत्वपूर्ण कार्य करत आहे. स्वामी विकेकानंद व राजमाता जीजाबाईंचा आदर्श घेवून जीवनात काम करावे असे आवाहन केले.

      ॲड. सुभाष काकडे यांनी व्याख्यानातून रस्ता सुरक्षतेबद्दल जागरूकता या विषयर युवकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, रस्तांवर होणाऱ्या अपघाता मध्ये होणारे मृत्यूंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अपघात ग्रस्तांना मदत करणाऱ्या मदतदूतास कोणताही त्रास होणार नाही यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कायद्यात मोठ्या तरतुदी केल्या आहेत.

          यावेळी डॉ.सुरेश पठारे यांनी समाज विकासात युवकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी विधिसेवा प्राधिकरणाचे सदस्य ॲड. शिवाजी कराळे, ॲड. अनुराधा येवले, ॲड.सुनील तोडकर आदी उपस्थित होते. कार्याक्रमचे सुत्रसंचलन ॲड.अभय राजे यांनी केले. आभार जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे अधिक्षक राजकुमार मोरे यांनी मानले.


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विवेकानंद यांचे जीवन चरित्र युवकांना प्रेरणा देणारे : अ‍ॅड.पिल्ले

   वेब टीम नगर : स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्र प्रत्येक युगात युवकांना प्रेरणा देणारे असून, त्यांचे विपुल साहित्याचे आजही जगभरातील अनेकांकडून वाचन होते. देशातील प्रत्येकाने हे साहित्य जाणून घेतले तर सुसंस्कृत समाज निर्माण होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन अ.नगर कॅन्टोंमेंट बोर्डाचे भुतपूर्व व्हाईस प्रेसिडेंट व भिंगार काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. आर.आर.पिल्ले यांनी केले.  स्वामी विवेकानंद यांची १५८ वी जयंती नगर शहर व भिंगार काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. यावेळी अ‍ॅड.पिल्ले बोलत होते.

     गुजर गल्लीतील (नगर) स्वामी विवेकानंद पुतळ्यांला अ‍ॅड.पिल्ले व काँग्रेसचे नगर शहर अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ  यांनी पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन केले. स्वामीजींचे विपुल साहित्य म्हणजे भारताची उच्च दर्जाची विद्वता सिद्ध करते, असे भुजबळ यावेळी म्हणाले तर कवी विवेक येवले यांनी धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालून स्वामीजींनी जगभरात दिलेली व्याख्यानांचे अनेक खंड वाचनीय तर आहेच. शामराव वाघस्कर यांनी स्वामीजींचे साहित्य युगानंयुगे जगाला दिशा देणारे ठरणार आहे, असा दावा केला.

     पक्षाचे पदाधिकारी अभिजित कांबळे, विजय आहेर, रमेश कदम आदिंनी स्वामीजींचे विचार आणि आचरण ‘बोले तैसा चाले’ असे असल्याचे विविध पैलू सांगतांना स्पष्ट केले. गायक व कवी सुनिल महाजन यांनी युवा दिनाचे महत्व आपल्या गायनातून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजेश सटाणकर यांनी केले तर अ‍ॅड.नरेंद्र भिंगारदिवे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांसह पक्षाचे सदस्य, मित्र परिवार आदि उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद हे मानवतेचे प्रणेते- प्रा. डॉ. बापू चंदनशिवे

वेब टीम नगर : १२ जानेवारी हा दिवस राजमाता जिजाऊ आणि स्वामी  विवेकानंद जयंती दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून अ.ए.सो.ची बाई इचरजबाई फिरोदिया प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.विजय कदम यांच्या संकल्पनेतून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. महापुरुषांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा पद्धतीचे व्याख्यान आयोजित करणे गरजेचे आहे असे मनोगत श्री. विजय कदम यांनी व्यक्त केले.

 या प्रसंगी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जिवनाबद्दल वैचारिक प्रबोधन करण्यासाठी प्रा. डॉ.बापूसाहेब चंदनशिवे सरांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रा.चंदनशिवे यांनी सांगितले की, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद हे मानवतेचे प्रेरणास्थान  होते. त्यांच्यासाठी मानव हाच महत्त्वाचा घटक होता समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी दोन्ही महापुरुषांनी आपले उभे आयुष्य पणाला लावले. राजमाता जिजाऊंनी दिलेले संस्कार छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी समर्थपणे पार पाडले.

 स्वामी विवेकानंदांनी आपले विचार संपूर्ण जगभरात पोहोचवले.यावेळी प्रा.चंदनशिवे  यांनी सर्व शिक्षकांना हे देखील सांगितले की, शिक्षकांनी जास्तीत जास्त संदर्भ ग्रंथ वाचावेत, विद्यार्थी केंद्रित शिक्षण द्यावे. शिक्षक हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे .

प्रशालेचे मुख्याध्यापक विजय कदम व प्रमुख पाहुणे बापू चंदनशिवे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच प्रा.डॉ. श्री.बापू चंदनशिवे यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक विजय कदम यांनी पुस्तक, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन केला.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद शिंदे तर आभार पराग विलायते यांनी मांडले. कार्यक्रमाचे नियोजनासाठी विशाल तांदळे, शरद कातोरे, कांतीलाल खुरंगे ,दीपक कराळे, .वैभव वाघ व सर्व सहकारी शिक्षक त्याचबरोबर पूर्व प्राथमिक वर्गाच्या शिक्षिका उपस्थित होत्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------



Post a Comment

0 Comments