धनत्रयोदशीची माहिती आणि पूजा विधी


धनत्रयोदशीची  माहिती आणि पूजा विधी

दिवाळी मधला एक महत्वाचा दिवस धनत्रयोदशी!

अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी येणारा हा दिवस देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणुन देखील साजरा करण्याची प्रथा आहे.

या दिवशी व्यापारी लोक आपल्या हिशोबाच्या नव्या वहयांची पुजाअर्चना करून त्यांचा वापर करण्यास सुरूवात करतात. या दिवशी धनाची आणि लक्ष्मीची पुजा देखील बऱ्याच ठिकाणी केली जाते.घरातील दागदागीने तिजोरीतुन बाहेर काढुन ते आजच्या दिवशी स्वच्छ करून परत जागेवर ठेवले जातात

आजच्या दिवशी नव्या कपडयांची आणि अलंकारांची खरेदी करणे शुभ समजलें  जाते. 

धनत्रयोदशी दिवस साजरा करण्यामागे काही कथा सांगितल्या जातात…

ज्यावेळी इंद्रदेवाने असुरासमवेत समुद्रमंथन केले त्यावेळी त्यातुन देवी लक्ष्मी प्रकट झाली त्याचप्रमाणे  सागरातुन अमृतकुंभ घेउन धन्वंतरी प्रकटले म्हणुन या धनत्रयोदशीला धन्वंतरीची पुजा करण्याची पध्दत आहे. या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हंटले जाते.

धन्वंतरी यांना भगवान विष्णुचा अवतार समजलें  जातं. सर्व वेदांमधे ते निष्णात होते, मंत्र तंत्राचे ते उत्तम जाणकार होते त्यांच्या अलौकीक सामर्थ्यामुळे अमृतरूपाने अनेक औषधींचे सार देवांना प्राप्त झाले आणि म्हणुनच धन्वंतरींना देवांचे वैद्यराज म्हंटल्या जातं. तिन्ही सांजेला ईशान्य दिशेकडे तोंड करून भगवान धन्वंतरीची प्रार्थना केल्यास दिर्घायुष्याचा लाभ मिळतो असे मानले जाते. 

अशीच दुसरी कथा म्हणजे….

हेमराजाचा सुपुत्र वयाच्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार अशी भविष्यवाणी करण्यात आली होती. या भविष्यवाणीमुळे राजा राणी फार चिंतीत होता . आपल्या मुलाने आयुष्यात सर्व सुखं उपभोगावीत आणि तो दिर्घायु व्हावा अशी राजा राणीची ईच्छा असते.राजपुत्राचा विवाह करण्यात येतो, भविष्यवाणी प्रमाणे विवाहाच्या चैथ्या दिवशी राजपुत्राचा मृत्यु निश्चित असतो. त्या रात्री राजपुत्राची पत्नी त्यास झोपु देत नाही. संपुर्ण शयनगृहात दिवे लावले जातात. राजपुत्राच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या भरपुर मोहरा ठेवल्या जातात आणि प्रवेशव्दार देखील सोन्या चांदीच्या दागिन्यांनी पुर्ण भरले जाते.राजपुत्राची पत्नी त्यास अनेक गोष्टी आणि गाणी सांगत त्याला जागे ठेवते. यमराज ज्यावेळी सापाचे रूप घेउन राजपुत्राच्या खोलीत प्रवेश करतात त्यावेळी या दागदागिन्यांनी आणि दिव्यांनी त्यांचे डोळे दिपतात आणि राजपुत्र त्यांच्या दृष्टीस पडत नाही त्यामुळे ते आपल्या यमलोकात परततात. राजपुत्राचे प्राण वाचतात या दिवसाला यमदीपदान असेही म्हंटले जाते.

धनत्रयोदशीला दिवे लागणीच्या वेळी घराबाहेर एक दिवा लावुन त्याचे टोक दक्षिण दिशेला करून त्यास नमस्कार करावा यामुळे अपमृत्यु टळतो असा समज आहे.

शेतकरी आणि कारागिर आजच्या दिवशी आपापल्या कामाच्या संबंधीत अवजारांची पुजा करतात. तिफन, नांगर, कुळवाची पुजा केली जाते. शेतकऱ्यासाठी शेतातुन घरात आलेलं धान्य म्हणजेच लक्ष्मी त्यामुळे धनत्रयोदशीला शेतकरी धान्याची पुजा करतात. धने  आणि गुळाचा नैवेद्य दाखविला  जातो.

सगळीकडे पणत्या लावुन झगमगाट आणि रोषणाई केली जाते. दिपावली हा आनंदाचा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा सण आहे. सर्वजण एकत्र येउन हा पाच दिवसांचा उत्सव मोठ्या उल्हासात साजरा करतात .



Post a Comment

0 Comments