अरूणाचल प्रदेश भारताचाच; चीनला ठणकावले!

 



अरूणाचल प्रदेश भारताचाच; चीनला ठणकावले!

वेब टीम वॉशिंग्टन: भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरू असताना चीनकडून भारताविरोधातही वक्तव्ये केली जात आहे. अरुणाचल प्रदेशचा भाग आमचा भूभाग असल्याचा दावा करणाऱ्या चीनला भारतानंतर आता अमेरिकेनेही ठणकावले आहे. अरुणाचल प्रदेशचा भाग हा भारताचाच भूभाग असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

अमेरिकेच्या गृह विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, अमेरिकेने जवळपास ६० वर्ष अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग असल्याचे मानले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कोणत्याही प्रकारची घुसखोरी, सैन्य अथवा नागरिकांद्वारे भूभागावर दावा करण्याच्या एकपक्षीय प्रयत्नांना विरोध करत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. भारत आणि चीनने सीमा वाद हा द्विपक्षीय चर्चेतून सोडवण्याचे आवाहन अमेरिकेने केले आहे. कोणत्याही परिस्थितीत सैन्य बळ वापरण्याला विरोध असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने आणखी एक दावा केला आहे. भारताने पाच मुद्यांवर सहमती दर्शवली असल्याचे चीनने म्हटले आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये याबाबतची चर्चा करण्यात आली होती. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी वर्किंग मॅकनिज्म फॉर कंसल्टेशन अॅण्ड कोऑर्डिनेशनचीबैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. दोन्ही देशांनी तणावाच्या परिस्थितीवर खुलेपणाने आणि अधिक खोलवर चर्चा केली. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये मॉस्कोमध्ये झालेल्या बैठकीत सहमतीने निर्णय घेण्यात आले होते. या निर्णयाचे पालन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्याशिवाय, दोन्ही देशांनी सीमेवरील, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती आणखी चांगली होण्यासाठी योग्य पावले उचलण्यासाठी सहमती दर्शवली आहे.

Post a Comment

0 Comments