शहराभोवतीची तटबंदी शोधणारा माणूस ... सुधीर पाटील
वेब टीम अहमदनगर दि. ९- दिल्लीगेट ची वेस पाडण्याची चर्चा तेव्हा जोरात होती आणि मनात कुतूहल जागं झालं. दिल्लीगेट बद्दल नगरकरांना इतका जिव्हाळा का दिल्लीगेट कशाचं मूळ आहे असं म्हणून खोलात जायचं ठरवलं आणि लक्षात आलं माळीवाडा, दिल्लीगेटची वेस हे शहराभोवती असलेल्या तटबंदीचा भाग आहेत. कोणे एके काळी सर्जेखान नावाच्या एका सरदाराने शहराच्या सुरक्षितते साठी गावाभोवती तटबंदी उभारली दुर्दैवाने आज ती तटबंदी अस्तित्वात नाही. काळाच्या उदरात गडब झालेल्या या तटबंदीच्या अस्तित्वात असलेल्या या पाऊलखुणा आहेत. झालं ठरलं हाच आपल्या शैक्षणिक डॉक्युमेंटरीचा विषय तसं शिक्षकांनी सल्ला दिला विषयला पर्याय ठेवा कारण त्यांना खात्री वाटत होती कि जे अस्तित्वात नाही ते दाखवता येणार नाही आणि हा प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही असेच गृहीत धरले होते. मात्र माझ्या मनानं याचा ध्यासच घेतला होता.असं सुधीर पाटील मोठ्या अभिमानाने सांगतात.
घर बांधणं जिकिरीचं वाटत असताना शहरालाच कुंपणभिंत घालणं किती जिकिरीचं होईल. मात्र इच्छा तिथे मार्ग म्हणतात ना तसेच असतं. वेशीची ठिकाणं शोधू लागलो,जुनी जाणती माणसं शोधून काढली, ज्या ठिकाणी भिंतीचे अवशेष सापडले तेथे खोदकाम केलेली माणसे शोधली, जे अवशेष सापडले ते दुवा म्हणून वापरले त्यात ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाच्या नारायणराव आव्हाड ह्यांनी हे दुवे सांधण्यात मोठे सहकार्य केले पूर्वी या वेशींना लाकडी दरवाजे होते.कुठल्याश्या जुन्या गावात जाऊन त्या दरवाज्याचं छायाचित्रण केलं एकीकडे हे काम सुरु होतं तर दुसरीकडे इतिहासाची पानं चाळली,इतिहासात डोकावताना शहराबद्दलच्या इतर बाबीही समजल्या. इतिहासात १६३१ साली तटबंदी बांधल्याचा उल्लेख सापडला सर्जेखान नावाच्या सरदाराने तटबंदी बांधली त्याची कबर दोबोटीचिरा येथे असल्याचं सांगितलं जातं मात्र त्या स्थळाला २-३ भेटी दिल्यानंतर हि कोणा दुसऱ्याच शर्जेखानाची कंबर असल्याचं लक्षात आल्यानंतर इतिहासाच्या पहिल्याच पायरीवर ठेच लागल्याने आणखीन अभ्यासासाठी दुवे शोधू लागलो वयस्कर माणसं तज्ञ इतिहासकार,मौखिक परंपरेतून आलेल्या गोष्टींचा आधार, फेरिश्ता सारख्या तत्कालीन इतिहासकाराच्या पुस्तकातील संदर्भ आणि समोर दिसत असलेले तथ्य यांचा आधार घेत घेत कथानक हळू हळू पुढे सरकलं अर्थात यातहि काही जण ऑफ द रेकॉर्ड माहिती देत तर काहींनी मलाच अतिरेकी ठरवलं ९०-९५ वर्षाच्या व्यक्तींना बोलतं करण्यासाठी पटवणे या साठी मोठं कौशल्य वापरावं लागलं,जिथे रास्ता माहिती नव्हता तिथे या सगळ्या गोष्टींचा शोध घेणं आणि तेही ज्या गावाला जन्म दिनांक आहे त्या गावचा इतिहास शोधणं सुरवातीला आव्हानात्मक वाटत होतं नंतर तेच काम तडीस जाणार असल्याने भरून पावल्या सारखं वाटू लागलं.या प्रवासात शहराचं क्षेत्रफळ,भिंतीचा परीघ,बांधकाम शैली हे सारं ओघानेच आलं.
कित्येक वेळा चपखल माहितीच्या आधारे गोष्टी जमून येत होत्या तर कित्येक ठिकाणी वेगवेगळे संदर्भ संभ्रम निर्माण करत होते. किंग्जगेट वेशीच्या उल्लेख सापडत नव्हता तर काही ठिकाणी १८८१ साली बांधल्याचा उल्लेख सापडला मात्र त्याच वेळी काही दस्तऐवजात १८५३ साली किंग्जगेट चा उल्लेख सापडतो जर १८५३ साली गेट असेल तर १८८१ साली बांधल्याचा उल्लेख कसा? मात्र अन्य दस्तऐवजावरून ब्रिटिशांनी बंद केलेली वेस १८८१ साली सुरु केल्याचा उल्लेख मिळतो.तसेच नेप्तीगेट जवळ ब्रिटिश कालीन पोलीस चौकी होती आणि तिथेच दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर आहे हे आजही सर्वांना माहिती आहे. तर काही ठिकाणि जुनी जाणती माणसं आमच्या लहानपणी इथे एक मोठी भिंत होती त्यातील चुनखडी माती आम्ही घर सरवण्यासाठी न्यायचो किंवा या ठिकाणी वेशीचे तोडकं मोडकं बंधकाम होतं तेथून आमची येजा असायची,असं सांगणारी माणसं आजीही उपलब्ध आहेत.थोडक्यात काय तर एक शंभर सव्वाशे वर्षा पूर्वी पर्यंत इतिहासाच्या पाऊलखुणा पुसटश्या का होईना पण अस्तित्वात होत्या.
दिल्लीगेट,तोफखाना,सर्जेपुरा,मंगलगेट,किंग्जगेट,बुवा बंगाली,फर्ग्युसन,माळीवाडा,नेप्तीगेट आणि नालेगाव या ११ वेशींच्या बरोबर ६ फूट रुंद ११ फूट उंच आणि ५७ अर्धगोलाकार बुरुज असलेल्या इराणीयन तटबंदीचा शोध लागलाच.या प्रत्येक ठिकाणी ३-३ ४-४ वेळा जाऊन इतिहासातले संदर्भ तपासत तिथे सापडणाऱ्या अवशेषांचा दुवा जुळवित तटबंदीचा मागोवा घेतला आणि ॲनिमेशन च्या सहाय्यानं दिल्लीगेट मुख्य दुवा मानून शहराभोवतालची तटबंदी उभारण्यात यश आल्याचं सुधीर पाटील मोठ्या अभिमानाने सांगतात.
इतिहासाबद्दल आजकालच्या तरुणांमध्ये आस्था नाही असं म्हटलं जातं मात्र ते साफ खोटं आहे.वास्तविक पाहता पुण्या पेक्षा जास्त ऐतिहासिक वैभव नगर शहराला लाभलं आहे.मात्र पर्यटक पुण्यात येतात तेथील वस्तूंना भेटी देतात आणि नगरचे ऐतिहासिक वास्तू वैभव दुर्लक्षितच राहते अशी खंत व्यक्त करून नगर मधील वास्तू वैभव जतनासाठी प्रयत्न व्हायला हवेत त्या दृष्टीने मी तयार केलेला लघुपट खारीचा वाटा ठरावा अशी प्रतिक्रियाहि सुधीर पाटील यांनी दिली.
0 Comments