काँग्रेस नेत्यांची दिल्ली वारी फसली.. सोनिया गांधींनी भेट न देता पाठवले माघारी




वेब टीम

नवी दिल्ली - काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण एक दिवस आधीच दिल्लीत पोहोचले होते. गुरुवारी रात्री उशिरा काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे पोहोचले. मात्र,काँग्रेस नेत्यांची दिल्ली वारी फसली. हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट न देता सगळ्यांना माघारी पाठवल्याची माहिती मिळाली आहे. दिल्लीत पोहोचतात काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींची वेळ मागितली होती. पण,सोनिया गांधींनी काँग्रेस सरचिटणीस वेणूगोपाल यांची भेट घेण्याची आदेश दिला. काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांनी सर्व काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. यावेळी राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे अनुपस्थितीत होते. काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार नाही, त्यामुळेच भेट नाकारण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
काढली खरडपट्टी...
जर शिवसेनेसोबत जायचं असेल तर काँग्रेसने राम मंदिराच्या संदर्भात काय भूमिका घ्यावी? काश्मीरमध्ये लावण्यात आलेल्या 370 कलम संदर्भात काय भूमिका घ्यावी? वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासंदर्भात काँग्रेसने काय भूमिका घ्यावी? असे सवाल करून वेणुगोपाल यांनी काँग्रेस नेत्यांची खरडपट्टी काढली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिवसेनेसोबत असलेल्या सलगीमधून शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. सोनिया गांधींची भेट नाकारल्यामुळे या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष असल्यामुळे शिवसेनेसोबत कदापिही जाऊ शकत नाही, असे वेणुगोपाल यांनी बजावल्याचे सूत्रांची माहिती दिली. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या आग्रहाखातर शिवसेनेला पाठिंबा देण्याचा हा विचार काँग्रेसमध्ये चर्चेत आला होता.
पण त्या विरोधात सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांनी विरोधी पक्षात बसायची कल्पना मांडली होती. तरीही पृथ्वीराज चव्हाण यांच्या आग्रहाखातर हा सारा खटाटोप केल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments