विठूनामाच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी

 विठूनामाच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी  

वारकऱ्यांच्या मांदियाळीने फुलला चंद्रभागेचा वाळवंट  

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शुक्रवारी (25 जुलै) पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पारंपरिक शासकीय महापूजा भक्तीभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यंदाच्या महापूजेला विशेष महत्त्व लाभले ते धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील शेतकरी दाम्पत्य बाळासाहेब माधव माने आणि प्रभावती माने यांना मानाचा वारकरी म्हणून मिळालेल्या सन्मानामुळे.

शेतकरी दाम्पत्याची निवड

बाळासाहेब माने (वय 70) हे गेली 20 वर्षे आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी करणारे वारकरी आहेत. यंदाही ते आपल्या पत्नीसोबत वारीसाठी आले होते. मध्यरात्री दर्शन रांग बंद करण्यात आल्यानंतर रांगेत सर्वप्रथम उभे असलेल्या या शेतकरी दाम्पत्याची निवड समितीने मानाचा वारकरी म्हणून निवड केली. त्यामुळे मुख्यमंत्री दाम्पत्यासोबत त्यांना शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा दुर्मिळ मान मिळाला.


पहाटे अडीच वाजता श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारीच पंढरपुरात दाखल झाले होते. शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास ते पत्नी अमृता फडणवीस आणि कुटुंबीयांसह मंदिरात पोहोचले. पहाटे अडीच वाजता श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. त्यानंतर माता रुक्मिणीचीही विधिवत महापूजा करण्यात आली.

महापूजेपूर्वी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची नित्य पूजा करण्यात आली. रुक्मिणी मातेची पूजा शिवाजी महाराज मोरे यांनी केली, तर पाद्यपूजा मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, त्यांच्या पत्नी सोनिया गोरे तसेच मंदिर समितीचे पदाधिकारी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

देशभरातून तब्बल 30 लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल

यंदाच्या आषाढी यात्रेसाठी देशभरातून तब्बल 30 लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. विठ्ठल नामाच्या गजराने, टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि दिंड्यांच्या जल्लोषाने संपूर्ण पंढरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. संत नामदेव पायरी, महाद्वार, पश्चिम द्वार आणि प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पदस्पर्श दर्शनासाठीची रांग सुमारे 20 किलोमीटरपर्यंत पोहोचली असून, 80 हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी प्रतीक्षेत आहेत. दर्शनासाठी तब्बल 24 ते 25 तासांचा कालावधी लागत असल्याचे प्रशासनाने सांगितले.तसेच आषाढी निमित्त पंढरपूरातील विठ्ठल मंदिर व शहरातील प्रमुख स्थळांवर ,इमारतींवर आकर्षक विधुतरोषणाई करण्यात आली आहे. 

भाविकांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय

यावर्षी प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेत शासकीय महापूजेदरम्यान मुखदर्शन सुरू ठेवले. त्यामुळे महापूजेच्या वेळेतही हजारो भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता आले. मुखदर्शनासाठीची रांगही सुमारे तीन किलोमीटरपर्यंत गेली होती.

भारत भुजबळ यांच्या हस्ते भव्य सजावट

दरम्यान, आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिराला देशी-विदेशी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. प्रथमच कमळासह 25 ते 30 विविध प्रकारच्या फुलांचा वापर करून गाभारा, सोळखांबी, चौखांबी, सभामंडप आणि संत नामदेव पायरी परिसर सजवण्यात आला. जवळपास पाच टन फुलांचा वापर करण्यात आला असून, पुण्यातील भाविक भारत भुजबळ यांनी ही भव्य सजावट साकारली आहे.

माझ्या जीवनाचे सार्थक झाले - बाळासाहेब माने

महापूजेनंतर भावना व्यक्त करताना बाळासाहेब माने म्हणाले, "मी गेली वीस वर्षे आषाढीची वारी करत आहे. आज मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मान मिळाल्याने माझ्या जीवनाचे सार्थक झाले. पांडुरंगाने सर्वांना सुखी ठेवावे आणि राज्यात चांगला पाऊस पडावा, अशी प्रार्थना मी विठुरायाच्या चरणी केली." 

Post a Comment

0 Comments