युवकांनी रक्तदान चळवळीत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे

 युवकांनी रक्तदान चळवळीत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे

शेरअली शेख  : अल-करम हाॅस्पिटलच्या शिबीरात 120 जणांची मोफत रक्त व शुगर तपासणी

अहमदनगर - रक्त हे कोणत्याही फॅक्टरीत तयार होत नसल्याने त्याची गरज भासल्यास मनुष्यालाच रक्तदान करावे लागते. एखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासल्यास त्यास ते वेळेत मिळणे गरजेचे असते. यासाठी युवकांनी रक्तदान करुन या चळवळीत सहभागी झाले पाहिजे. अत्याधुनिक उपचार पद्धतीने रक्ताचे विघटन होत असल्याने एका रक्तदात्याचा अनेकांना फायदा होत असल्याने या पुण्यकार्यात सहभागी व्हावे. अल-करम हाॅस्पिटलच्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे इतरांनाही प्रेरणा मिळणार आहे, अशा उपक्रमाची समाजाला गरज आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते शेरअली शेख यांनी केले.

स्वातंत्रता सेनानी अशफाकुल्ला खान व स्वतंत्रता सेनानी बहादूर शाह जफर यांच्या जयंतीनिमित्त अल-करम सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशनल सोसायटीच्या अल करम हॉस्पिटलच्या वतीने मोफत रक्त व शुगर तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील लोकांना यावेळी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मख़दुम सोसायटीचे अध्यक्ष आबिद दूल्हे खान, शाहिद काजी,डॉ जहीर मुजावर, तौफिक तांबोली आदि मान्यवर उपस्थित होते.


पुढे बोलतांना शेरअली म्हणाले, आज प्रत्येकाचे जीवनमान धावपळीचे झाले आहे, त्यामुळे रस्ते अपघाताबरोबरच इतरही अनेक कारणांनी रक्ताची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासत असते. अशा परिस्थितीत प्रत्येकाने कर्तव्य म्हणून वर्षभरातून एकदातरी रक्तदान करुन आपले सामाजिक दायित्व पार पाडले पाहिजे. आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून रक्तदान करणे जरुरी आहे, असेही त्यांनी सांगितले. या शिबीरात 120 जणांनी रक्त व शुगर तपासणी केली. या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तौफिक तांबोली म्हणाले की अलकरम सोसायटीच्या माध्यमातून आरोग्याच्या क्षेत्रात वर्षभर समाज उपयोगी उपक्रम सतत राबविले जात असते. म्हणून या उपक्रमामध्ये समाजातील लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे सांगितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आबीद खान यांनी केले.

Post a Comment

0 Comments