“राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही”

“राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही”

राज ठाकरे ५ जूनला अयोध्येत रामलल्लांच्या दर्शनासाठी जाणार आहेत

वेब टीम लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश करु देणार नाही, असा इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले आहे. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना भेटू नका, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे कुटुंबाचा काहीही संबंध नाही, असेही शरण सिंह म्हणाले. राज ठाकरे ५ जूनला अयोध्येत रामल्लांच्या दर्शनासाठी जाणार आहेत.


कैसरगंज येथील भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी गुरुवारी राज ठाकरेंवर सलग ट्विट करून हल्ला केला आणि ते उत्तर भारतीयांचा अपमान करत असल्याचा आरोप करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. “उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून तमाम उत्तर भारतीयांची माफी मागावी,” असे भाजपा खासदारने म्हटले आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राज ठाकरेंना भेटू नका, असाही सल्ला दिला आहे. “राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरेंना भेटू नये, अशी माझी विनंती आहे,” असे शरण सिंह म्हणाले. राम मंदिर आंदोलनातील ठाकरे कुटुंबीयांची भूमिका नाकारताना ते म्हणाले, “राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि सर्वसामान्यांची भूमिका सारखीच राहिली आहे. ठाकरे कुटुंबीयांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.”

धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्याचा इशारा देणाऱ्या राज ठाकरेंनी योगी सरकारचे नुकतेच कौतुक केले असताना भाजपा खासदाराने राज ठाकरेंविरोधात भूमिका घेतली आहे. लाऊडस्पीकरवर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांच्याशी भाजपाची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. मात्र, मनसे आणि राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांबाबतची भूमिका सर्वश्रुत आहे, त्यामुळे त्यांना सोबत घेण्यास भाजपा कचरत आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रीचा फटका उत्तर भारतात बसू शकतो, अशी भीती भाजपाला वाटत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारचे लोक महाराष्ट्रात येऊन लोकांच्या नोकऱ्या घेतात, गुन्हेगारी घटना करत असल्याचा आरोप राज ठाकरे करत आहेत.

Post a Comment

0 Comments