औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश नाहीत ?

औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश नाहीत ?


पोलीस आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं

वेब टीम औरंगाबाद : औरंगाबादमध्ये जमावबंदी असल्याचे कोणतेही आदेश काढले नसल्याची माहिती पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिली आहे. औरंगाबादमध्ये १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यातच पोलिसांनी सणवार तसंच विविध आंदोलनांची कारणं देत जमावबंदी लागू केल्याची चर्चा होती. आदेशामध्ये मनसेने मशिदींवरील भोंगे काढण्यासंबंधी दिलेल्या इशाऱ्याचाही उल्लेख असल्याचं बोललं जात होतं. पण पोलीस आयुक्तांनी ही सर्व चुकीची माहिती असल्याचं स्पष्ट केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी सांगितलं की, “ही चुकीची माहिची आहे. कलम १४४ संबंधी कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, नागरिकांच्या हालचाली, काठ्या, शस्त्रं बाळगणं यावर आम्ही लक्ष ठेवून असतो. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. वर्षभर असे आदेश काढले जातात”.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “कोणत्याही सभेमुळे किंवा विशिष्ट कारणामुळे हे आदेश काढले जात नाहीत. हा एक नियमित आदेश आहे”. राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश काढल्याचा गैरसमज झाल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “असं काही नाही. समाजात दैनंदिन घडामोडी घडत असतात ज्यामध्ये धरणं, आंदोलन, मोर्चा यांचा सामान्यपणे १५ दिवसांनी आढावा घेतला जात असतो. हा आत्ता काढलेला आदेश नाही. वर्षभर हे सुरु असतं”. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या सभेबाबत निर्णय झालेला नाही. झाल्यावर माहिती देऊ असं स्पष्ट केलं.

Post a Comment

0 Comments