“माननीय पंतप्रधान, अशा प्रकरणांवर तुमचं मौन निराशाजनक आहे”

“माननीय पंतप्रधान, अशा प्रकरणांवर तुमचं मौन निराशाजनक आहे”

 आयआयएमच्या प्राध्यापक-विद्यार्थ्यांचं मोदींना पत्र

वेब टीम बंगळुरू : देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर नेहमीच चर्चा होताना पाहायला मिळते. राजकीय पक्ष देखील या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. पण आता कदाचित पहिल्यांदाच देशातील नॉलेज हब मानल्या जाणाऱ्या आयआयएम अर्थात इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी यावर संतापवजा खेद व्यक्त केला आहे. हे एवढ्यावरच न थांबता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आपलं दु:ख बोलून दाखवलं आहे. तसेच, मोदींना एक विनंतीवजा आवाहन देखील केलं आहे.

इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट बेंगळुरू आणि अहमदाबाद या दोन आघाडीच्या शिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मिळून हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी देशात सध्या वाढत असलेल्या सामाजिक द्वेषाविषयी खंत व्यक्त केली आहे. तसेच, यावर काळजी व्यक्त करतानाच या सगळ्या घटनांवर पंतप्रधानांनी घेतलेलं मौन हे निराशाजनक असल्याचं देखील पत्रात नमूद केलं आहे.

“माननीय पंतप्रधान, सध्या देशात वाढत असलेल्या असहिष्णुतेच्या घटनांवर तुम्ही साधलेलं मौन हे आम्हा सर्वांसाठी निराशाजनक आहे. आपल्या देशाच्या बहुसांस्कृतिक स्वरूपाला आमच्या लेखी फार महत्त्व आहे. पण माननीय पंतप्रधान महोदय, या घटनांवरचं तुमचं मौन हे अशा द्वेषपूर्ण आवाजांना अधिक बळ देत आहे आणि त्यातून आपल्या देशाच्या एकता आणि सामाजिक सलोख्यालाच तडा जाण्याचा धोका निर्माण झाला आहे”, असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

बेंगळुरूमधील खासदार तेजस्वी सूर्या यांनी मुस्लीम आणि ख्रिश्चनांचं धर्मांतर करण्याच्या केलेल्या विधानावरून बराच वाद झाला होता. काही दिवसांपूर्वी देशातील काही भागात चर्चवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या, तर हरिद्वारमध्ये भरलेल्या कथित धर्मसंसदेमध्ये द्वेषपूर्ण भाषणं करण्यात आली. पत्रामध्ये सह्या करणाऱ्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

“जर द्वेष पसरवणारे आवाज मोठे असतील, तर त्यांना विरोध करणारे आवाज त्याहून मोठे असायला हवेत. मौन हा आता या सगळ्यावर अजिबात पर्याय राहिलेला नाही, हे समजल्यानंतर काही विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी हे पत्र पाठवण्यासाठी पुढाकार घेतला”, अशी माहिती आयआयएम बेंगळुरूचे प्राध्यापक प्रतीक राज यांनी दिली.

“आपल्या राज्यघटनेनं कोणत्याही भितीशिवाय आपल्या धर्माचं आचरण करण्याचा अधिकार आपल्याला दिला आहे. पण आता आपल्या देशात एक प्रकारची भिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी काही भागात चर्च उद्ध्वस्त करण्यात आले. आपल्या मुस्लीम बंधू-भगिनींविरोधात शस्त्र उचलण्याचं आवाहन केलं जात आहे. हे सगळं बेडरपणे आणि कोणत्याही कायद्याचा धाक नसल्यासारखं सुरू आहे”, अशा शब्दांत पत्रामधून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

“आम्ही तुम्हाला विनंती करतो की एक देश म्हणून आमचं मन आणि ह्रदय आपल्याच लोकांचा द्वेष करण्यापासून परावृत्त करा. आमचा विश्वास आहे की एक समाज कल्पकता, नवीन आविष्कार आणि विकासावरही लक्ष केंद्रीत करू शकतो किंवा आपल्यात फूट देखील पाडू शकतो. सर्वसमावेशकता आणि विविधतेचा जगासमोर आदर्श ठरावा असा भारत घडवण्याची आमची इच्छा आहे. आमची आशा आहे की तुम्ही देशाला योग्य पर्याय निवडण्याच्या दिशेने घेऊन जाल”, असं या पत्रात शेवटी नमूद करण्यात आलं आहे.

Post a Comment

0 Comments