“गरज पडल्यास रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणू”

“गरज पडल्यास रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणू”

हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते, असंही मिश्र यांनी सांगितलं

वेब टीम जयपूर : राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी नुकत्याच रद्द करण्यात आलेल्या वादग्रस्त कृषी कायद्यांसंदर्भात खळबळजनक विधान केलं आहे. त्यांनी सांगितलं की जर गरज पडली तर हे कायदे पुन्हा आणणयात येतील. मिश्र यांनी भदोही इथं माध्यमांशी संवाद साधताना केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्राला संबोधित करत तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही, म्हणून हे कायदे मागे घेत आहोत. मोदींच्या या निर्णयानंतर शेतकरी संघटना आणि भाजपाविरोधी पक्ष सरकारच्या हेतूवर शंका घेत आहेत, तर काही जण मात्र हे कायदे पुन्हा लागू करण्याची मागणी करत आहेत. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांचं म्हणणं आहे गरज पडल्यास हे कायदे पुन्हा आणले जातील. शेतकरी संघटनांनाही अशी शंका आहे आणि म्हणून जोपर्यंत संसद या कायद्यांना मागे घेतल्याचं अधिकृतपणे सांगत नाही, तोवर शेतकरी आंदोलन संपणार नाही, असं त्यांनी जाहीर केलं आहे.

माध्यमांशी बोलताना मिश्र यांनी सांगितलं की हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते. सरकारने शेतकऱ्यांना समजावण्याचे प्रयत्न केले. पण तरीही शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम राहिले आणि कायदे मागे घेण्याची मागणी करतच राहिले. त्यामुळे शेवटी सरकारला कायदे मागे घ्यावे लागले.

कलराज मिश्र यांच्याआधी उन्नावचे भाजपा खासदार साक्षी महाराज म्हणाले होते की, कायदे बनतात, रद्द होतात आणि पुन्हा आणले जातात. ते म्हणाले होते की पंतप्रधान मोदींनी राष्ट्र आणि कायदा यांच्यामधून राष्ट्राला निवडलं. तर फर्रुखाबादचे भाजपा खासदार यांनीही मोदींच्या कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments