नरकचतुर्दशीला भ्रष्ट लोकप्रतिनिधी व सत्ताधार्‍यांना सत्तासूर घोषित

 नरकचतुर्दशीला भ्रष्ट लोकप्रतिनिधी व सत्ताधार्‍यांना सत्तासूर घोषित

वेब टीम नगर:  दिवाळीच्या नरकचतुर्दशीचे औचित्य साधून पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने शहरातील हुतात्मा स्मारकात भ्रष्ट लोकप्रतिनिधी व सत्ताधार्‍यांना सत्तासूर घोषित करण्यात आले. सत्तासूरांचे पाय उतार करण्यासाठी डिच्चू कावा तंत्र स्विकारण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. तर या देशात लोकशाहीचे आत्मकेंद्री स्वरूप बदलून राष्ट्रकेंद्रित होण्यासाठी भारतशाहीचा प्रस्ताव ठेवण्यात आला.

संबळच्या निनादात सत्तासूरांचा निषेध करुन भारतशाहीचा जय जयकार करीत भ्रष्ट लोकप्रतिनिधींचा अंधकार दूर करण्यासाठी पणत्या प्रज्वलीत करण्यात आल्या. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, अशोक भोसले, वीरबहादूर प्रजापती, दिलीप जाधव, पोपट भोसले, शाहीर कान्हू सुंबे, गौरव भोसले, आर.आर. बारस्कर, आनंदा आढाव, नंदा साबळे, बळीराम पाटोळे, कारभारी वाजे आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्योत्तर 75 वर्षात वोट माफियांनी मागच्या दाराने सत्ता मिळवण्यासाठी सामान्य मतदारांवर जात, धर्म, पंथ, प्रादेशिक वाद, प्रलोभन आदींचा वापर केला. होईल ते होऊ दे मला काय त्याचे? ही भूमिका स्वतःच्या अल्प हितासाठी नागरिकांनी घेतल्याने राष्ट्रहिताला धक्का बसला. यामुळे चंगळवाद व भ्रष्टाचार पोसला गेला. त्यातून चंगळ ढब्बू मकात्या प्रवृत्ती उदयास आली. त्यामुळे स्वातंत्र्याची फळे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली नाहीत. राज्यात आणि देशात सत्ताधारी सामान्य माणसाचे डोळे विस्फारीत होतील एवढ्या मोठ्या रकमांचा भ्रष्टाचार करत आहे. त्याचबरोबर सत्ताधारी आपल्या जवळच्या लोकांसाठी सत्तेचा वापर टोकाला जाऊन करतात. अशा सत्तासूरांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी मतदारांच्या हातात डिच्चू कावा तंत्र हे प्रभावी शस्त्र आहे. चांगल्या उमेदवारांना मतदान करुन सत्तासूरांना डिच्चू काव्याने वचक बसणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

एकंदरीत भारतीय संविधानाने जाहीर केलेले प्रजासत्ताक या देशात अस्तित्वातच राहिले नाही. घराघरात आणि देशभरात राष्ट्रकेंद्रीत भारतशाही आणण्याची नितांत गरज आहे. लोकशाहीचे भारतशाही अतिप्रगत स्वरूप आहे. इंग्रजी शिक्षणाने या देशात चंगळू ढब्बू मकात्याचे पिक उगवले आहे. त्यामुळे देशातील शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करुन देशप्रेम जागृक करण्याची गरज आहे. देश हिताला प्राधान्य देऊन नागरिक समाजात वावरतील तेंव्हा देशात बदल घडणार असून, यासाठी राष्ट्रकेंद्रित भारतशाही प्रभावी ठरणार आहे. तर डिच्चू कावा तंत्राने भ्रष्ट सत्ताधारीवर सर्वसामान्य नागरिकांचा वचक राहणार असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी सांगितले. यावेळी सर्वांना दिवाळी फराळ देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments