“भाजपाचे कार्यकर्ते पक्षासाठी, मोदींसाठी, रामासाठी वाटेल ते करायला तयार असतात, त्यामुळे…”; चंद्रकांत पाटालांचा इशारा

“भाजपाचे कार्यकर्ते पक्षासाठी, मोदींसाठी, रामासाठी वाटेल ते करायला तयार असतात, त्यामुळे…”; चंद्रकांत पाटालांचा इशारा

वेब टीम मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना हा सर्टीफाइड गुंड पक्ष असल्याच्या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. गुंडगिरीला एवढं समर्थन मिळत असेल तर आश्चर्य असल्याचं म्हणताच त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांचा दाखला देत सेनेला अप्रत्यक्ष इशारा दिलाय.

संजय राऊत यांनी शिवसेना भवनासमोर भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीसंदर्भात केलेल्या वक्तव्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांना पुण्यामध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना, गुंडगिरीला एवढं समर्थन मिळाणार असेल तर ठीक आहे. जसं त्यांना तोडांचे तोंडाचे नुसके बार मारता येतात तर आम्हालाही ते उडवता येतात. पण मला वाटतं हा विषय इथे संपवावा लागेल. त्यांनीच एके ठिकाणी काल वक्तव्य केलं त्याचं मी स्वागत केलं. जे काही झालं ते संपलं. पण अशा पद्धतीनेच जर चालू राहणार असेल तर भाजपाचे कार्यकर्ते पक्षासाठी, मोदींसाठी, रामासाठी वाटेल ते करायला तयार असतात. त्यामुळे अशी भाषा वापरु नका, असा सल्ला चंद्राकांत पाटील यांनी दिला.

तसेच पुढे बोलताना पाटील यांनी शिवसेनेला राज्यात पक्षाची सत्ता असल्याची आठवण करुन दिली. काल उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगली समज दिली. राज्य आपलं आहे. शांतता सुव्यवस्था राखं आपली जबाबदारी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं पाटील म्हणाले. सत्तेत असलेल्या शिवसेनेने गुंडगिरी केली तर त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील असंही पाटील म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले होते

“होय शिवसेना गुंडगिरी करते. पण त्याला सत्तेचा माज म्हणणं चुकीचं आहे. सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता, तर तो खूप वेगळ्या पद्धतीने झाला असता. आमच्या शिवसेना भवनाच्या दिशेनं कुणी चाल करत असेल, तर होय आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड आहोत. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. ही गुंडगिरी मराठी माणसाने केली म्हणून मुंबई महाराष्ट्रात राहिली. आम्ही ही गुंडगिरी केली म्हणून महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणसाचा आवाज आहे”, असं सांगत संजय राऊत यांनी शिवसेना भवनासमोर झालेल्या हाणामारीवर प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना भवनाबाहेर नेमकं काय घडलं –

अयोध्येतील राम मंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होऊ लागल्याने या प्रकरणी चौकशीची मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या या भूमिके मुळे संतापलेल्या ‘भाजयुमो’ने मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली दादरमधील शिवसेना भवनवर ‘फटकार मोर्चा’ काढला होता. शिवसेना भवनवर मोर्चा येणार, हे समजताच शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा झाले. माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासहअनेक महिला शिवसैनिकही हजर होत्या. या आंदोलनातून काही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी सावधगिरी बाळगत ‘भाजयुमो’चा मोर्चा शिवसेना भवनपासून काही अंतरावरच अडवला. ‘भाजयुमो’च्या कार्यकर्त्यांनी मोर्चा पुढे नेऊ द्यावा, असा प्रयत्न के ला. काही जणांनी रस्त्यावर ठाण मांडत घोषणाबाजी सुरू के ली, तसेच ‘सोनिया सेना’ असे फलकही झळकवले.

आशा वर्कर्सवरुन पाटलांनी लगावला टोला –

ज्या आशा वर्कर्सने करोना कालावधीमध्ये न थकता दीड वर्षे काम केलं त्यांच्या मागण्या तरी सरकारने ऐकून घ्याव्यात असं पाटील म्हणाले. मात्र मागण्या ऐकून घेण्याचीही सरकारची तयारी नसून आम्ही बोलतोय तो कायदा असं सुरु असल्याचा टोला पाटील यांनी लगावला. आशा वर्कर्सकडून केल्या जाणाऱ्या मागण्या बरोबर आहेत की चूक आहेत. त्या प्रॅक्टीकल आहे की नाही हे चर्चा करुन ठरवता येईल. पण सरकार सगळं केंद्राकडेच ढकलत आहे. करोना तेच झालं, मराठा आरक्षण तेच झालं, ओबीसी आरक्षण तेच घडलं आता आशा वर्करही केंद्राकडेच ढकला. सोयिस्करपणे केंद्राकडे ढकलायचं असं राज्य सरकारचं धोरण असल्याची टीका पाटील यांनी केली. तसेच पुढे बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या सोबत काम करुन सरकारला या आशा वर्कर्सच्या विषयावर धारेवर विचारु असं आश्वासन मी सर्व आशा वर्कर्सला देतो, असंही पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments