शपथविधीनंतर ममता बॅनर्जींना राज्यपालांचा सल्ला, मिळालं प्रत्यूत्तर

शपथविधीनंतर ममता बॅनर्जींना राज्यपालांचा सल्ला, मिळालं प्रत्यूत्तर

वेब टीम कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये शानदार विजय संपादन केल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी आज राज्यात सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात पार पडलेल्या एका छोटेखानी समारंभात राज्यपाल जगदीप धनखड यांनी ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. परंतु, शपथविधीनंतर राज्यात पुन्हा एकदा 'मुख्यमंत्री विरुद्ध राज्यपाल' सामना रंगणार, याची झलक पाहायला मिळाली.

शपथविधीनंतर ताबडतोब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचा तक्रारीचा आणि टीकेचा सूर फारच कमी पाहायला मिळतो. परंतु, पश्चिम बंगालमध्ये शपथविधीनंतर लगेचच मुख्यमंत्री बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड या वादात अडकलेत.

आमची प्राथमिकता करोना संकटावर नियंत्रण मिळवणं हीच असेल, यासाठी आज दुपारी १२.३० वाजता एक बैठकही बोलावण्यात आलीय. त्यानंतर ३.०० वाजता एका पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती देण्यात येईल, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.

सोबतच, पश्चिम बंगालला अशांती रुचत नाही, संयम बाळगा आणि हिंसाचारात सहभागी होऊ नका. आजपासून आमचं सरकार कायदे-व्यवस्था आपल्या हातात घेत आहे. अशावेळी राज्यात शांती लागू करण्याला आपलं प्राधान्य राहील. हिंसाचारात सहभागी होणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शपथविधीनंतर दिला.

यानंतर माईक हातात घेतलेल्या राज्यपाल जगदीप धनखड यांनी ममता बॅनर्जींना तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर आरुढ होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. राज्यात सरकार संविधान आणि कायद्याच्या पद्धतीने काम करेल. भारतात लोकशाही आहे, इथे सरकार कायद्यानुसार चालतं. आपण एका संकटाचा सामना करत आहोत. लोक बंगालसंबंधी चिंतेत आहेत, अशा बातम्या मला मिळत आहेत.निवडणुकीनंतर राज्यात सुरु झालेला हिंसाचार लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असं धनखड यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री ताबडतोब राज्यात कायद्याचं राज्य लागू करतील, अशी अपेक्षा आहे. मुख्यत: महिला आणि मुलांना जे नुकसान होतंय त्यांना मदत केली जाईल. मुख्यमंत्री,  ममता बॅनर्जी यावर करावाई करतील, कारण सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदी विराजमान होणं सोप्पं नाही. नव्या पद्धतीनं तुम्ही सत्ता हाताळाल, अशी मला अपेक्षा आहे.

राज्यपालांच्या या सल्ल्यानंतर मुख्यमंत्री बॅनर्जी यांनीही त्यांना प्रत्यूत्तर दिलं. 'मी आजच शपथग्रहण केलीय. तीन  महिन्यांपासून राज्यातील संपूर्ण सरकार निवडणूक आयोगाच्या हाती होतं. निवडणूक आयोगानं या दरम्यान अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. तसंच नव्या नियुक्त्याही केल्या... आणि त्यांनी कोणतंही काम केलेलं नाही. आता सत्तेची सूत्रं आम्ही घेतली आहेत आणि जनतेला शांती कायम राखण्याचं आवाहन करत आहोत' असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी आपली बाजू स्पष्ट केली.

मुख्यमंत्री बॅनर्जी आणि राज्यपाल धनखड यांच्यात सामना रंगल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. विधानसभा निवडणुकीआधीही अनेकदा या दोघांमध्ये 'तू-तू-मैं-मैं' रंगलेली दिसली होती.

तृणमूल काँग्रेसनं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवत इतिहास कायम केलाय. राज्यात सलग तिसऱ्यांदा तृणमूल काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी जनतेनं दिलीय. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत २९२ विधानसभा मतदारसंघांपैंकी तब्बल २१३ जागांवर तृणमूल काँग्रेसला विजय मिळालाय. बहुमताहून हा आकडा बराच मोठा आहे. या निवडणुकीत बहुमत मिळवण्याचा दावा करणाऱ्या भाजपला केवळ ७७ जागा गाठणं शक्य झालंय.(शपथ विधी )

Post a Comment

0 Comments