पत्रकार खून प्रकरणात मंत्री तनपुरे अडचणीत

 पत्रकार खून प्रकरणात मंत्री तनपुरे अडचणीत 

वेब टीम नगर :राहुरी येथील एका सप्ताहिकाचे पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्याप्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पोलिस तपासाचा हवाला देत ही हत्या भूखंड प्रकरणातून झाली असून तो भूखंड ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कंपनीशी संबंधित आहे. या भूखंडासंबंधी तक्रारी करून अडथळा आणत असल्यानेच दातीर यांची हत्या झाली आहे, त्यासंबंधीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला आहे. कर्डिले यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीच्या सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणी आला आहे.

सहा एप्रिलला राहुरीत पत्रकार दातीर यांचे अपहरण करून हत्या झाली होती. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. पोलिसांचा तपास सुरू असताना या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. राहुरीचे माजी आमदार कर्डिले यासंबंधी शनिवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी या घटनेसंबंधी प्रसार माध्यमांशी बोलताना खळबळजनक आरोप केले आहेत.

कर्डिले म्हणाले, ‘पत्रकार दातीर यांच्या हत्येची आम्ही बारकाईने माहिती घेतली. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे की, राहुरीतील १८ एकर भूखंडाच्या मालकीसंबंधी दातीर सतत तक्रार अर्ज करून अडचणी वाढवत असल्याने त्यांची हत्या केली, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे आम्ही या भूखंडाची माहिती मिळविली. तेव्हा कळाले की हा भूखंड पठारे नावाच्या एका शेतकऱ्याच्या नावावर आहे. मात्र नगरपालिकेने तेथे आरक्षण टाकले होते. नंतर हे आरक्षण उठविण्यात आले. त्या जागेत आता सोहम ट्रॅन्सपोर्ट कंपनी आहे. ही कंपनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावे असून सोहम त्यांच्या मुलाचे नाव आहे. या कंपनीत तनपुरे यांचे मेहुणे देशमुख आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हे भागीदार आहेत. दातीर यांना पठारे कुटुंबीयांनी मुखत्यारपत्र दिले होते. त्या आधारे दातीर या भूखंडासाठी कायदेशीर लढाई लढत होते. यावरून त्यांना मोरे यांच्याकडून अनेकदा धमक्या आल्या होत्या. दातीर यांच्या पत्नीने पोलिसांत तशी तक्रारही दिली होती. मोरे याच्या विरुद्ध दातीर यांनीही अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही. दातीर यांना संरक्षणही दिले नाही. १८ एकरची मालमत्ता लाटण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला असेल.

'विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनाही आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची विनंती करणार आहोत. येत्या पंधरा दिवसांत कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलन करू. दातीर यांच्या नातेवाईकांना आणि त्यांच्या समाजाला याची माहिती आहे, मात्र आरोपींना राजकीय पाठबळ असल्याने ते तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आपण यासाठी पुढाकार घेतला आहे, असेही कर्डिले यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments