नगर टुडे बुलेटीन 31-01-2021

 नगर टुडे बुलेटीन 31-01-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वंदे मातरम् युवा प्रतिष्ठान व बोरा परिवाराच्या वतीने राम मंदिर निर्माण कार्यात भरीव निधी

वेब टीम नगर : अयोध्येच्या प्रभुराम मंदिरनिर्माण कार्यात नगरच्या वंदे मातरम् युवा प्रतिष्ठान व कापडबाजार श्रीगणेश मित्र मंडळ परिवारातील सदस्यांनी वैयक्तिक सहभागातून २,११,१११ रुपये तसेच कापड बाजार येथील सिमरतमल कुंदनमल ज्वेलर्सच्या वतीने बाबुशेठ बोरा व हिंदसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा परिवाराच्या वतीने १,११,१११रुपयांचा धनादेश नगरमध्ये निधी संकलनाचे कार्य करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीकांत जोशी यांच्या कडे सुपूर्द केला. यावेळी जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष राजेश झंवर, शहर कार्यवाह हिराकांत रामदासी, जेष्ठनेते सुनिल रामदासी, नरेंद्र कुलकर्णी, वंदे मातरम् युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतिक बोगावत व कापडबाजार श्रीगणेश मित्र मंडळचे अध्यक्ष ईश्वर बोरा, गौतम बोरा, विनीत बोरा आदी उपस्थित होते.

          यावेळी सुनील रामदासी म्हणाले, अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी नगर मधूनही मोठा प्रतिसाद निधीसंकलला मिळत आहे. बोरा पारिवार कायमच सामाजिक व मदत कार्यात पुढे येत आहे. वंदे मातरम् युवा प्रतिष्ठानचे मोठे योगदान सामाजिक क्षेत्रात आहे. राम मंदिरासाठी बोरा परिवार व वंदे मातरम् युवा प्रतिष्ठानने दिलेले समर्पण बहुमोल आहे.

          प्रास्ताविकात ईश्वर बोरा म्हणाले, अयोध्येच्या प्रभुरामचे मंदिराचे काम सुरु झाल्याने आम्हा सर्वांना मोठा आनंद झाला आहे. त्यामुळे या कार्यात तनमनधनाने सहभागी होत वंदे मातरम् युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांचा वैयक्तिक व संकलीत केलेला दोन लाख अकरा हजार एकशे आकार रुपयांचा निधी तसेच आमच्या सिमरतमल कुंदनमल ज्वेलर्सच्या वतीने एक लाख अकरा हजार एकशे एक निधी प्रभुरामाच्या चरणी समर्पित केला आहे.

          यावेळी वर्धमान पितळे, चिंटु खंडेलवाल, महावीर कांकरीया, केतन मुथा, भैय्या भांडेकर, संजय बोगावत, कुणाल नारंग, हर्षल पेटकर, चंदन पवार, संतोष ठाकुर, बन्सी फुलडहाळे, पवन किथानी, अजय गांधी व इतर सदस्य उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जिल्हा रुग्णालयातील सर्व सेवा पुर्ववत सुरु कराव्यात

भिंगार शिवसेना महिला आघाडीच्या प्रा.कांता बोठे यांची मागणी

    वेब टीम  नगर : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या ८-९ महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयातील कोरोना व्यतिरिक्त रुग्णांवर होणारे उपचार व विभाग बंद करण्यात आले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने हे सर्व विभाग पुर्ववत सुरु करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन भिंगार शिवसेनज्ञ महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा.कांता बोठे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल पोखरणा यांना दिले. याप्रसंगी अ‍ॅड.शितल बेद्रे उपस्थित होत्या.

     जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण हे गरीब घरातील आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्हा रुग्णालयातील सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करणारे इतर विभाग   बंद करण्यात आले होते. त्यामुळे येथे आलेल्या रुग्णांना शहरातील इतर रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात. त्यामुळे या रुग्णांच्या पैशाचा व वेळेचा अपवय होतो. सदर रुग्णांची गैरसोय टाळावी यासाठी जिल्हा रुग्णालयातील बंद असलेले सर्व विभाग व सोयी-सुविधा पूर्ववत सुरु कराव्यात. असे निवेदनात नमूद करुन  जेणे करुन गरीब रुग्णांना उपचार मिळणे सुलभ होईल. बर्‍याच खाजगी रुग्णालयातून गरीब रुग्णांची अनावश्यक गोष्टींसाठी मोठ्याप्रमाणात लूट होत असल्याने जिल्हा रुग्णालय त्यांच्यासाठी मोठा आधार आहे. त्यामुळे येथील सर्व विभाग सुरु झाल्यास सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल, असे सौ.कांता बोठे यांनी म्हटले आहे.

     यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पोखरणा यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांबरोबरच इतर रुग्णांवरही उपचार सुरु करण्यात येत आहेत. टप्प्याटप्प्याने विविध विभाग सुरु करण्यात आले आहे, पुढील काळातही शासनाच्या निर्देशानुसार सर्वच विभाग सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शेतकरी संरक्षण कायद्यासाठी बिगर शासकीय मसुदा समिती स्थापनेचा प्रस्ताव

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचा पुढाकार :समितीत पद्मश्री पोपटराव पवार व पाटोद्याचे भास्करराव पेरे यांची कार्य करण्याची सहमती

वेब टीम नगर : देशात राष्ट्रीय शेतकरी संरक्षण कायदा आनण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली बिगर शासकीय मसुदा समिती स्थापनेसाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदने पुढाकार घेतला आहे. या मसुदा समितीत देशातील कृषी तज्ञ, प्रगतशील शेतकरी व शेतीचा सर्वांगीन अभ्यास असलेल्या व्यक्तीमत्वांचा समावेश केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.  

मागील दोन महिन्यापासून देशातील शेतकर्‍यांनी केंद्र सरकारने नव्याने पारीत केलेले तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली येथे आंदोलन सुरु ठेवले आहे. प्रारंभी हे आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. प्रजासत्ताकदिनी झालेल्या उग्र आंदोलनानंतर यामध्ये फुट पाडण्याचे प्रयत्न सुरु आहे. देशातील शेतकर्‍यांना प्रतिष्ठा मिळून त्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी संरक्षण कायदा क्रांतीकारक ठरणार आहे. शेतकरी या संज्ञेत शेतकरी, शेतमजूर व शेतीमालावर प्रक्रिया करणारा स्वयंरोजगाराचा या कायद्याने संरक्षण मिळणार आहे. देशातील प्रत्येक राज्यांनी व केंद्र सरकारने कृषी अंदाजपत्रक वेगळे सादर करावे, जलसंधारण, ठिबक सिंचन, सिंचन पाणी वाटपाची हमी मिळावी, शेतीमालाला उत्पादन खर्चाशी सुसंगत बाजारभाव मिळणे, सरकारचे नियंत्रण नसलेला कृषीमुल्य आयोग स्थापन होणे, नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी शेतकर्यांना विमा संरक्षण, शेतात जाण्यासाठी रस्ते, प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी संरक्षण न्यायप्राधिकरणची नेमणुक होणे, शेतकर्यांची फसवणुक करणार्यांवर फौजदारी कारवाई होऊन आरोपींना जेलमध्ये टाकण्या संदर्भातच्या तरतुदी या मसुद्यात समाविष्ट करुन समिती मधील तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

या मसुदा समितीत आदर्श गाव संकल्प व कार्य समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, पाटोदा (जि. औरंगाबाद) येथील भास्करराव पेरे यांनी देखील संघटनेला या समितीत कार्य करण्याची सहमती दर्शवली आहे. शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी गट, तट विसरुन सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. या मसुदा समितीच्या माध्यमातून व्यापक कृषी मंथन करुन कृषी क्रांती घडविण्याचा संघटनेचा मानस असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी सांगितले. ही मसुदा समिती निर्माण करण्यासाठी कॉ.बाबा आरगडे, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, कॉ. महेबुब सय्यद, अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, प्रकाश थोरात, वीरबहादूर प्रजापती, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लॉकडाऊनच्या काळात लाईट बीलामध्ये 50 टक्के सूट द्यावी

मानव संरक्षण समितीच्यावतीने प्रांत अधिकार्‍यांना निवेदन

    वेब टीम  नगर : लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांचे रोजगार, व्यवसाय बुडाला असल्याने सर्वसामान्यांसह सर्वजण आर्थिक अडचणी आलेले आहेत. त्यात वीज वितरण कंपनीच्यावतीने सर्वसामान्यांना लाईट बील वाढवून आले आहेत.  या वाढवून आलेल्या लाईट बीलामध्ये ५० टक्के सूट देण्यात यावी, अशी मागणी मानव संरक्षण समितीच्यावतीने प्रांतधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी शहराध्यक्ष इम्रान बागवान, जिल्हा उपाध्यक्ष नसिर सय्यद, जिल्हा जनसंपर्क अधिकारी एम.बी.जहागिरदार, भिंगार शहराध्यक्ष जहीर सय्यद, शहर उपाध्यक्ष सलिम शेख, संघटक वैभव शहाणे, जिल्हा निरिक्षक खलील पठाण आदि उपस्थित होते.

     प्रांतधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात लाईट बीला मध्ये५० टक्के देण्यात यावी. या लॉकडाऊनच्या काळात लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोर-गरीब या लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेले असून, त्यांना उदरनिर्वाहाचे कोणत्याही प्रकारे साधन नसल्याकारणाने सदरील लाईट बीलामध्ये शासनाने ५० टक्के सूट देण्यात यावी जेणे करुन गोर-गरीबांचे कल्याण होईल. ही कार्यवाही लवकरात लवकर करुन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

निंबळक चर्चअंतर्गत भव्य प्रेअर टॉवरचे शानदार उद्घाटन

    वेब टीम  नगर : निंबळक चर्च अंतर्गत निंबळक येथे प्रार्थनेसाठी प्रेअर टॉवर उभारण्यात आला आहे. गुड न्यूज हिलिंग मिनिस्ट्री सुवार्ता प्रसार आरोग्यदान सेवा संघाच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या प्रेअर टॉवरचे उद्घाटन रेव्ह.डॉ.विनय दुबे यांच्या हस्ते झाले. यावेळी निंबळक चर्चचे बिशप तानाजी पाडळे, रेव्ह.दीपक पाडळे, बिशप मनोहर सावंत, मधुकर पडागळे, एम.एस.कदम, राजन कांबळे, शकुंतला पाडळे, रमेश शिंदे, पास्टर प्रभाकर घाटविसावे, छाया पाडळे आदीं उपस्थित होते.

     रेव्ह.दीपक पाडळे म्हणाले की, शांती व प्रेमाचा संदेश देणार्‍या प्रभू येशूची करूणा सर्वांवर होण्यासाठी प्रेअर टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. याठिकाणी मनोभावे प्रार्थना केल्यास मनातील इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होतील तसेच दु:ख, वेदना संपुष्टात येतील असा विश्‍वास आहे. याठिकाणी दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत सर्वधर्मियांसाठी प्रार्थना केली जाणार असून जास्तीत जास्त भाविकांनी या प्रार्थनेतील शक्तीची अनुभूती घ्यावी.

     रेव्ह.डॉ.विनय दुबे म्हणाले की, बिशप तानाजी पाडळे यांचे सेवाकार्य वयाच्या ७४ व्या वर्षीही तितक्याच उत्साहात चालू आहे. प्रभू येशूच्या सेवेत व प्रार्थनेत ते कायम मग्न असतात. श्रध्दा ठेवली तर फळ निश्‍चित मिळते असा संदेश ते येशूची शिकवण जनसामान्यांपर्यंत पोहचवत असतात. याठिकाणी अतिशय सुंदर प्रेअर टॉवर उभारले असून हे केंद्र प्रत्येकासाठी नवी उर्जा देणारे ठरेल, असा विश्‍वास आहे.

     या कार्यक्रमासाठी अहमदनगर डिस्ट्रीक्ट रेव्हरंड अ‍ॅण्ड पास्टर असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य, संडे स्कूल टिचर्स, बायबल स्कूल टिचर्स स्टाफचे सदस्य तसेच पुरुष व महिला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

काँग्रेसच्यावतीने महात्मा गांधी यांना अभिवादन

   वेब टीम नगर : सत्य, अहिंसेचा पुरस्कार करणारे गांधीजी आणि गांधीजींची काँग्रेस आज नगर शहरात विशिष्ट व्यक्तीच्या नावाने ओळखली जाऊन कोणाच्या तरी द्वेष करण्याच्या प्रयत्नात पक्षातील निष्ठावंतांना दूर लोटून पक्षाचे ध्येय, धोरणं, विचार, परंपरा मोडीत काढली जात आहे. अशा पक्षातील नवोदितांसहीत त्यांना साथ देणार्‍या पक्षातील अशांना सुबुद्धी देवो! अशी प्रार्थना आज महात्मा गांधी पुण्यतिथीचे औचित्य साधून  काँग्रेसचे नेते बाळासाहेब भुजबळ यांच्यासह पदाधिकार्‍यांनी केली.

     वाडिया पार्क येथील गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन शहर काँग्रेसचे नेते बाळासाहेब भुजबळ, भिंगार अध्यक्ष अ‍ॅड. आर.आर.पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमास अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान, प्रदेश सदस्य शाम वाघस्कर, उपाध्यक्ष शशिकांत पवार, आर.आर.पाटील, एम.आय.शेख, राजेश बाठिया, सरचिटणीस अभिजित कांबळे,  संतोष धिवर, विवेक येवले, अनिल परदेशी, अनिल वराडे, भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष मार्गरेट जाधव, प्रदेश सदस्य शारदाताई वाघमारे, सुमन काळापहाड, संध्या मेढे, ग्रा.पं.सदस्य किरण अळकुटे, मीना घाडगे, रजनीताई ताठे, राणीताई गायकवाड, संतोष फुलारी, संजय झोडगे, अ‍ॅड.भिंगारदिवे, निजाम पठाण, विवेक येवले, विजय आहेर, अनिल निकम आदि उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भगवान बाबांचा आदर्श समाजाने घ्यावा 

 लहामगे : ओबीसी,व्हीजे,एनटी जनमोर्चाच्यावतीने भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी

     वेब टीम नगर : संत-महंतांची शिकवण, प्रबोधन लोकांचे सामाजिक जीवन बदलते हे खरे कार्य आहे; या कार्याचा केवळ गौरव न करता आपल्या जीवनात, आचरणात बदल घडवावा. भगवान बाबांनीही समाज सुधारण्याचे काम केले त्यांचा आदर्श समाजाने घ्यावा. ओबीसी, व्हीजे,एनटी. संघटनेच्यावतीने बहुजन समाजाला एकत्र करण्याचे सुरु केलेल्या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भगवान बाबा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष आनंद लहामगे यांनी केले.

     ओबीसी, व्हीजे, एनटी जनमोर्चाच्यावतीने भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी आनंद लहामगे बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ होते.

     यावेळी संघटनेचे नेते ना.विजय वडेट्टीवार यांच्यावर नहाक आरोप करुन समाजात दूही निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍यांचा निषेध करावा, असा ठराव भुजबळ यांनी मांडला नगरसेवक बाळासाहेब बोराटेंसह उपस्थितांनी ठरावाला अनुमोदन देऊन संमत केला. ना. वडेट्टीवार यांचा इतर मागासवर्गीय सहीत उपेक्षित समाज जोडण्याचे व त्यांना न्याय देण्याच्या भुमिकेचा सभेत पुरस्कार करण्यात आला. संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन मजबूत करुन समाजोपयोगी कार्यात पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ना. वडेट्टीवार यांना झेड सुरक्षा व्यवस्था द्यावी, अशी मागणीही सभेत करण्यात आली.

     याप्रसंगी बोलतांना माजी महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले जमिनी विका पण  शिक्षण घ्या, असे भगवानबाबा समाजाला म्हणत. त्यांनी समाजात आमुलाग्रबदल घडवला. केवळ स्वत:च्या वंजारी समाजाचे बाबा नसून त्यांनी जाती-धर्माच्या पलिकडे कार्य केले आहे.

     माजी महापौर अभिषेक कळमकर म्हणाले, नगरमध्ये नुकताच झालेला ओबीसी मेळाव्याचा संदेश समाजात सकारात्मक आहे. अशा संघटना राजकारणाच्या वलय असलेल्या असून, त्या समाजकारणाकडे वळतात ही स्त्युत्य अशी कृती आहे. शिवसेनेचे विक्रम राठोड म्हणाले, समाज जोडणे आणि त्या माध्यमातून थोरविभुतींचे विचारावर आधारित कार्य करणे ही भगवान बाबांसारख्या थोर संतांना अभिवादन केल्यासारखे आहे ते आपण कृतीतून करुन राजकारणापलिकडे समाजकारण घडवू, असे सांगितले.

     याप्रसंगी डॉ.श्रीकांत चेमटे, अ‍ॅड.बाळासाहेब खांडरे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे आदिंची समयोचित भाषणे झाली.

     प्रारंभी राष्ट्रसंत संत भगवान बाबा यांना अभिवादन करण्यात आले. सभेला दत्ता जाधव, प्रकाश सैंदर, डॉ.सुदर्शन गोरे, अनिल इवळे, शाम औटी, जालिंदर बोरुडे, शशिकांत पवार, श्रीकांत मांढरे, हर्षल म्हस्के, परेश लोखंडे, मुन्ना भिंगारदिवे, शरद मुर्तडक, माजी नगरसेवक सुनिल भिंगारे, रमेश सानप, लक्ष्मण साळवे, बाबासाहेब सानप, सागर सातपुते, ज्ञानेश्‍वर साळवे, रमेश बिडवे, अभिजित कांबळे, फिरोज खान, सुनिल क्षेत्रे, विशाल वालकर, अशोक दहिफळे, नईम शेख, कैलास गर्जे, संजय आव्हाड, दिपक कावळे, राजेंद्र पडोळे आदि उपस्थित होते. सभेपूर्वी शहराचे पहिले उपमहापौर ज्ञानेश्‍वर खांडरे यांच्या निधनाबद्दल द:ख व्यक्त करुन सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. शेवटी अनिल निकम यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉक्टर्स आरोग्य कर्मचार्‍यांसह ‘दो गज की दूरी’ दूर करण्यात रुग्णवाहिका चालकांचा मोलाचा वाटा

 अक्षय कर्डिले : साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानने केला 51 कोरोना योद्धांचा सन्मान

   वेब टीम   नगर :  २०२० हे वर्ष फक्त ‘कोरोना’च्या नावानेच ओळखले जाईल आठ महिन्यांत लॉकडाऊन, कोरोना रुग्णांची वाढती संख्या, माणसांपासून माणसे दूर जाताना हरवलेली माणुसकी अशी भयावह परिस्थिती असतांना माणसाचे जीव वाचवणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचार्‍यांसह ‘दो गज की दूरी’ दूर करण्याचे काम रुग्णवाहिका चालकांनी देखील केल्याने कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान योग्यच आहे, असे प्रतिपादन युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले.

     सावेडी उपनगरातील संदेशनगरमध्ये साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने बीव्हीजी 108 रुग्णवाहिकांचे चालक त्यामधील डॉक्टर्स अशा 51 जणांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन .कर्डिले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

     कार्यक्रमास नगरसेवक सुनिल त्र्यंबके, नगरसेविका शितल जगताप, प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, झिशान शेख, वैभव  पोकळे, धिरज उर्कीडे, प्रदीप राऊत, बबलू सुर्यवंशी, अमित गाडे, प्रताप गायकवाड आदि उपस्थित होते.

     कर्डिले पुढे म्हणाले, कोरोनामुळे संकटात एकमेकांना कशी मदत करायची, कोरोना रुग्णाला कसा आधार द्यायचा, लॉकडाऊनमुळे उपासमारी दूर करण्यासाठी हजारो हात पुढे आले, अन्नदानाबरोबरच सेवा करणारे असंख्ये हात पुढे सरसावले. महामारीत सुरवातीला रुग्णवाहिका आली की, रुग्णाला पहिला स्पर्श होत होता, तो चालकाचा त्याला गाडीत घेऊन जाण्याचे काम या चालकांनी केले. डॉक्टर्स, आरोग्य कर्मचार्‍यांसह या चालकांचा या कार्यात मोलाचा वाटा असल्याने त्यांना प्रतिष्ठानाने दिलेला सन्मान योग्यच असल्याचे यावेळी अक्षय कर्डिले यांनी स्पष्ट केले.

     नगरसेवक सुनित त्र्यंबके यावेळी म्हणाले की, साई-बाबांच्या कृपेने आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून असलेली जबाबदारी पार पाडतांना, प्रत्येक रुग्णांशी माणुसकीचे नातं जोपासत अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप केल्या. मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. अन्नदान करुन माणुसकी जोपासली हे सर्व साईंनी करुन घेतले, याचे समाधान वाटते.

     प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे म्हणाले, चांगल्या कामाचा व काम करणार्‍या सर्वांंच्या कार्यास प्रोत्साहन व प्रेरणा मिळण्यासाठी गौरव केला. यामध्ये सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी यांचा सन्मान केला. मग रुग्णवाहिका चालक, डॉक्टर्स यांना देखील कोरोना योद्धा पुरस्कार दिल्याने त्यांचे मनोबल वाढेल, असे सांगितले.

     यावेळी साई मंदिरात शेवटचा गुरुवार व पौर्णिमेचे औचित्य साधून एक शाम साई के नाम कार्यक्रमातून श्रीकांत गडकरी, पुजा गडकरी, गौरव राऊत यांनी भक्तीगीते सादर केली.  यावेळी राहुल पाटोळे यांनी मंदिरास एक मोठी साईंची प्रतिमा भेट दिली.महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याची मागणी

अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांचे उपमुख्यमंत्री ना. पवार यांना निवेदन

वेब टीम नगर: अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या प्रलंबित सुधारीत सेवाअंतर्गत आश्‍वासित प्रगती योजनाच्या लाभासह, सेवानिवृत्ती वेतन प्रस्तावांना मंजुरी देवून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना निवृत्तीवेतन सुरू करण्यासह इतर मागण्यांचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार यांना देण्यात आले.

एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री ना. पवार शहरात आले असता त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण बळीद, जिल्हा सचिव संतोष कानडे, दिपक अल्हाट, सुनील नेटके, योगेश दाते, यांच्यासह माहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे अनेक प्रश्‍न प्रलंबीत आहे. ७ डिसेंबर २०१८ व १६ फेब्रुवारी २०१९ हे शासन निर्णय रद्द करुन सध्या सेवेत असलेल्या शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागू करुन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्‍चिती करुन वेतननात लाभ मिळावा आदी प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्याची मागणी उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

किसान संघर्ष समन्वय समिती व संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने : महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह

हुतात्मा दिनी केंद्रातील भाजप सरकारचा निषेध

वेब टीम नगर : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा महाराष्ट्र अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिनानिमित्त वाडियापार्क क्रीडा संकुल येथील त्यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह करण्यात आला. केंद्र सरकार शेतकरी आंदोलनास बदनाम करून आंदोलन दडपून टाकत असल्याचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला.

शेतकरी नेत्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, तीन अन्यायकारक शेतकरी विरोधी कृषी कायदे व कामगार विरोधी चार संहिता रद्द करा या मागण्या घेऊन शेतकरी आंदोलनास नैतिक बळ देण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधाता हुतात्मा दिन केंद्र सरकारच निषेध दिन म्हणून पाळण्यात आला. महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या सत्याग्रहाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये कॉ. सुभाष लांडे, अविनाश घुले, बन्सी सातपुते, महेबुब सय्यद, अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, भैरवनाथ वाकळे, अर्शद शेख, अंबादास दौंड, रामदास वागस्कर, प्रशांत पाटील, भाऊसाहेब थोटे, अब्दुल गणी शेख, संध्या मेढे, बाळासाहेब भुजबळ, फिरोज खान, मार्गरेट जाधव, श्यामराव वाघस्कर, दिपक शिरसाठ, कान्हू सुंबे, बाळासाहेब सागडे, वैभव कदम आदी सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात शेतकरींच्या दिल्ली येथील आंदोलनाची दखल न घेता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला.  तसेच शेतकरी नेते कॉ. अजीत नवले यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणार्‍यास त्वरीत अटक करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात विविध राजकीय पक्ष व स्वयंसेवी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी पाठिंबा दिला. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना निवेदन

ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळण्यासाठी निर्माण होणार्‍या त्रूटी दूर कराव्या  

वेब टीम नगर - मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचा नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख यांनी त्यांचा सत्कार करुन ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शन प्रश्‍नी निवेदन दिले. यावेळी आमदार संग्राम जगताप उपस्थित होते.

एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री ना. पवार शहरात आले असता त्यांना सदरचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र सरकारने राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरु केली आहे. ही पेन्शन मिळण्यासाठी शासनाच्या जाचक अटी असून, मोजक्याच ज्येष्ठ पत्रकार बांधवांचा यामध्ये समावेश झाला आहे. तर अनेक ज्येष्ठ पत्रकार सदर पेन्शन मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. ज्येष्ठ पत्रकारांना हक्काची पेन्शन मिळण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन पेन्शन मिळण्यासाठी निर्माण होणार्‍या त्रूटी दूर करुन हा प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------





    

Post a Comment

0 Comments