महामार्गावरील खड्डे दाखवणारे महापौर पालिकेत का झटकतायेत जबाबदारी ?



 महामार्गावरील खड्डे दाखवणारे महापौर 

पालिकेत का झटकतायेत जबाबदारी ?

शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांची टीका 

  वेब टीम  नगर  : नगर शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील खड्डे न बुजविल्यास अधिकाऱ्यांना काळे फासण्याची भाषा नगरचे महापौर करीत आहेत .मग नगर शहरातील रस्त्यांच्या अवस्थेचे काय? पालिका आयुक्त , महापौर शहरातील रस्त्ये दुरुस्त करण्याची जबाबदारी का झटकत आहेत अशी टीका शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केली आहे. 

                पालिकेच्या दुर्लक्षामुळे  पावसाळ्यात  शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. शहरात एकही रस्ता चालण्यायोग्य राहिलेला नाही.  मग वाहन चालविण्याची काय कथा ! रस्त्यातील खड्डे चुकविण्यासाठी नगरच्या वाहनचालकांना गल्लीबोळातून वाट काढावी लागत आहे. उपनगरांची परिस्थिती तर या पेक्षा भयानक आहे. 

               मनपा आयुक्तांना याची जाणीव करून देण्यासाठी शिवसेनेने त्यांना घेराव घातला . त्यांच्या दालनात शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सेनेचे नगरसेवक व शिवसैनिक एकवटले . त्यांनी आयुक्त श्रीकांत मायकेलवार यांना परिस्थिती समजावून सांगितली . शहर अभियंता सुरेश इथापे हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळात नगरसेवक गणेश कवडे, नगरसेवक अमोल येवले, नगर सेवक बाळासाहेब बोराटे, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, प्रथम महापौर  भगवान फुलसौंदर, नगरसेवक दत्ता जाधव, संतोष ग्यानप्पा ,उपशहर प्रमुख जालिंदर वाघ, डॉ. श्रीकांत चेमटे, संग्राम कोतकर, सतीश मैड, बाळासाहेब जरे, विजय पठारे, रमेश परतानी,  संजय शेंडगे, श्याम नळकांडे, अर्जुनराव बोरुडे, आदी उपस्थित होते.  

             नगरच्या रस्त्यावरील परिस्थिती दाखविण्यासाठी आयुक्त आणि शहर अभियंत्यांना जुन्या महानगर पालिकेच्या रस्त्यावर बोलावण्यात आले . त्यांना नगरसेवकांनी हे खड्डडे दाखवले . नगरकर या रस्त्यावरून कसे जाणार असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला .  या रस्त्यावरील खड्ड्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करून रस्त्यावरच बैठा सत्याग्रह केला . तेव्हा आयुक्त आणि अभियंत्यांनी शिवसैनिकांचे उग्र आंदोलन पाहता पाहणी अर्धवट शोधून काढता पाय घेतला . 


                 कोरोना टाळेबंदीच्या काळात पालिकेला रस्ते दुरुस्त करण्याची संधी होती. उन्हाळ्यात ही कामे झाली असती तर पावसाळ्यात हे रस्ते व्यवस्थित राहू शकले असते . पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे आदेश असताना   या काळात पालिकेने काहीच केले नाही. .स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी रस्त्याच्या परिस्थिती बाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यावर झुडूप मारण्याचा प्रकार महापौरांनी चालवला आहे. शहरातील रस्त्यांची वाट लागलेली असतांना  ही सपशेल नगरकरांच्या डोळ्यात धूळफेक आहे. 

                 अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा देऊन महापौरांना काय साध्य करायचे  आहे. त्याऐवजी महापालिका निवडणुकीच्या प्रचारात तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नगर शहराच्या विकासासाठी ३०० कोटी रुपये देण्याची पोकळ घोषणा केली होती . त्यातील निदान एक दोन कोटी रुपये आणण्यासाठी महापौरांनी प्रयत्न करावेत . त्यातून निदान खड्डे तरी बुजविले जातील आणि नगरकरांचे जीवन सुसह्य होईल . 

आधीच नगरमधील पालिकेची विविध कामे प्रलंबित आहेत . पावसाळ्यात नगरचे खड्डे बुजविण्याचे काम पालिकेला करता आले नाही. गणपती आणि मोहरमच्या मिरवणुका नसल्याने  पालिकेला मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम झालेच नाही .  . पावसाळ्यापूर्वी पालिकेला नालेसफाई , ड्रेनेज दुरुस्ती करायचे सुचले नाही. अमृत योजनेची मुदत संपलेली आहे . त्यामुळे पावसात गटारी ड्रेनेज तुंबत आहेत. 

                 बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेले जुना टिळक रोड , कल्याण रोड हे रस्ते पालिकेला दिसतात मग तख्ती दरवाजा ते मंगळवार बाजार रस्त्याचे काम मंजूर आहे. त्याचा २७ लाखांचा निधी पडून आहे. तेथे पाईपलाईन कधी टाकणार, ड्रेनेज कधी बांधणार ?   त्याच्या नियोजनाचे काय ? शहरातील २७ रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत . फेज २ चे कनेक्शन , भुयारी गटार , रस्त्यावरील पॅचिंग पालिका कधी करणार याची उत्तरे नगरकर मागत आहेत. मागील शासन कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरच्या पालिकेला १० कोटींचा निधी दिला होता त्याचे काय झाले ? पालिकेच्या नाकर्तेपणामुळे आलेला निधी परत जाण्याची वेळ आली आहे. राज्यातील इतर महानगरपालिकांनी लोकडाऊनच्या काळात रस्त्यावर रहदारी नाही ही संधी साधली. प्रलंबित कामे पूर्ण करून घेतली . रस्ते चकाचक  मोठे करून घेतले . लाईटचे पोल उभे केले. ड्रेनेज, गटारी दुरुस्त केल्या . आपल्या पालिकेला हे का सुचले नाही ?  कोविड लोकडाऊन काळात पालिकेने काय कामे केली याचा हिशोब द्यावा असे आव्हान दिलीप सातपुते यांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments