आकाश मला ठेंगणे गं ......

आज महिला दिन ...
ज्यांच्या  अफाट कर्तृत्वानं समस्त महिलांच्या मानात काकणभर  का होईना भर पडली.ज्यांच्या उत्तुंग यशाने हिमालयाला खुजं केलं आणि आकाशाला गवसणी घातली . या महिलांच्या गवसणीला  साद देत आकाशही त्यांच्या पुढे ठेंगणे वाटू लागले त्या महिलांच्या कर्तुत्वाला आमचाही सलाम......

आकाश मला ठेंगणे गं ...... या मथळ्याखाली सुप्रसिद्ध चित्रकर्ती अनुराधा ठाकूर आणि सुप्रसिद्ध बालगायिका अंजली-नंदिनी गायकवाड यांच्या प्रेरणादायी मुलाखती प्रसिद्ध करीत आहोत .


आकाश  मला ठेंगणे गं ......

निसर्गात रमणारी चित्रकार अनुराधा ठाकूर 


अमृतसर येथे गेली अनेक वर्षे नित्य नेमाने होणारी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन  हयात हॉटेलच्या साखळीतील चित्रमालिरिस ,अमेरिकासह देश विदेशातील प्रदर्शन , प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून  कलाक्षेत्राच्या क्षितिजावर  अनुराधा ठाकूर यांचे नाव चमकू लागले.
अनुराधा ठाकूर या विशिष्ट शैलीच्या चित्रांनी प्रचंड वाहवा मिळवली, जगातल्या ज्या देशांची नावं  कोणाला माहिती नाही  अश्या देशातून येणारे ई - मेल्स , पंतप्रधानांच्या निवासस्थानी विराजमान झालेले त्यांचं पेंटिंग , देशातील १०० प्रभावशाली स्त्रियांत झालेला समावेश , राष्ट्रपती भवनातील मेजवानी साठी झालेली निवड त्या बरोबर क्राय  सारख्या सामाजिक जाणिवेतून काम करणाऱ्या संघटनेनं कॅलेंडर साठी त्यांच्या चित्रांची केलेली निवड या साऱ्या गोष्टींमुळे त्या कायम प्रकाश झोतात राहिल्या .
अनुराधा ठाकूर यांचे विद्यार्थीही कलाक्षेत्रात कंगणगले चमकत आहेत त्या मागेही त्यांचीच प्रेरणा असल्याचेही सांगणारेही अनेक जण आहेत आपल्या कर्तृत्वाने ठाकूर यांचे आकाश ठेंगणे झाले आहे.  त्यांचा चित्रातील 'काळया' रंगा  मागची भूमिका उलगडणारी मुलाखत.   



कॉलेज मध्ये असताना चित्रकलेचे  एक सर सर्वांचे खोड रबर गोळा करायचे अन खिडकीतून फेकून द्यायचे . पेंसिलीने स्केच करा तेही फिकट नको गडद करा त्यात पर्फेक्ट प्रपोर्शन (प्रमाण बद्धता ) आलं  पाहिजे तेव्हा पासून त्यांचे काळं करा हे शब्द मनात घर करून राहीले . हॉस्टेल मध्ये  राहिल्यानं मॉडेल्स भरपूर मिळायचे , भरपूर स्केचेस व्हायचे तेव्हा पासूनच काळं करायला शिकले.
 पुण्यात असताना वेस्टर्न आर्टशी संबंध आला मात्र त्याच वेळी आर्ट कॅन चेंज द  सोसायटी हे हि लक्षात आलं मग पेंटिंग करायचं सोडून शाळेतल्या लो इन्कम ग्रुप च्या मुलांसाठी प्रोजेक्ट राबवला त्या मुलांमध्ये घडलेला सकारात्मक  आणि गुणात्मक बदल मनाला बळ देऊन गेला. मग लक्षात आलं महिलांना दैनंदिन जीवनात खूप ऐकावं लागतं त्यांना हवं असलेलं एक्सपोजर मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर महिलांच्या चित्रांची एक सिरीज केली तीही यशस्वी झाली. पैठण तालुक्यात ७० गावात वर्कशॉप घेतले , तिथे  मिळणारे यश , येणारे  सकारात्मक अनुभव त्यात मी आनंदी होते .
एकदा मी गडचिरोलीला गेले डॉ. बंग आणि राणी बंग यांच्याकडे राहून तेथील आदिवासी जीवनाचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं कि इथले आदिवासी निसर्गाची खूप काळजी घेतात त्यांचं जीवन अगदी  साधं त्यामुळे गैरसोयींवर मात करण्याची सवय त्यांना लागलेली एकदा कुठल्याश्या कार्यक्रमा  निमित्त आम्ही  जंगलात गेलो, कार्यक्रमासाठी खूप माणसं  जमली होती आणि प्रत्येकानेच येताना तेंदूची पानं आणली होती बसल्या बसल्या त्यांनी त्याच्या पत्रावळ्या शिवल्या आणि अवघ्या ३ भांड्यात  शिजवलेलं अन्न  त्या पत्रावळ्यांत वाढून  घेतलं. जेवण झाल्यावर ज्याने त्याने आपली पत्रावळी एका बाजूला नेऊन टाकली काहींनी स्वयंपाकाची भांडी स्वछ केली. इतक्या  साध्या कार्यक्रमातही आनंद ओसंडून वाहत होता.
एकदा अश्याच एका वसतीगृहात  आम्ही गेलो तिथे एका खोलीत ५०-६० तरुण आणि दुसऱ्या एका खोलीत ५०-६० युवती रहात असल्याचं माझ्या लक्षात आलं तस मी राणीताईंकडे शंका उपस्थित  केली तसं  त्या म्हणाल्या इथे एकपत्नी व्रत पाळलं जातं  एखाद्या युवकाला एखादि युवती आवडली तर तिच्या इच्छे नुसार ते स्वतंत्र झोपडं बांधून राहतात.  त्यांच्याकडे  थोडी सुबत्ता आली कि ते लग्न करतात कधी कधी त्यांच्या लग्नात त्यांचीच २-३ मुलं  देखील  हजर असतात, मात्र कुठल्याही परिस्थितीत ते एकमेकांना सोडत नाहीत इथल्या पोलीस ठाण्यात रेप केस दाखल  झाल्याचं ऐकिवात नाही. मग लक्षात आलं कि रेप केस जंगलात होत नाहीत  तर आपल्या सिमेंटच्या जंगलात  निर्भया सारख्या प्रकरणातून घडतात. जंगलात निर्भयतेने जगता येते , एकमेकांच्या आनंदात सहभागी होता येते, नाचता येतं ,गाता येतं त्यावर एक चित्रमालिका तयार केली ही  चित्रमालिका तयार करताना पुन्हा एकदा 'काळ्या' रंगाचं महत्व अधोरेखित झालं काळा रंग कम्पोज करणं पॅच करणं दगडावरची रेघ असण्या इतकच अवघड असतं  हे लक्षात आलं मग आदिवासींच्या जीवनातील पारदर्शकता ( ट्रान्सपरन्सी ) दाखविण्यासाठी चित्रात 'काळा 'रंग मात्र कायम राहिला.ग्रॅज्यूएशनच्या २२ वर्षानंतर आदिवासींची हि पहिली चित्रमालिका होती . 




कच्छमधील आदिवासिंना  जेवण झाल्यानंतर पेलाभर पाण्यात हात धुवून तेच पाणी प्यावं लागतं  एवढं पाण्याचं दुर्भिक्ष्य पण त्या लोकांची मात्र त्या बद्दल काहीच  ओरड नसते ,उलट तेथे असलेला निसर्ग ते जपतात. काही नसतानाहि त्यांच्याकडे सर्वत्र सुंदर कलाकुसर दिसते. गडचिरोलीच्या तुलनेत इथले रंग भडक , ताजे तवाने असतात इथली माणसं  खूप सकारात्मकतेनं  जगतात हीच गोष्ट माझ्या मनाला भावते तिथली माणसं  साधे पणात आनंद मानतात आपण मात्र पंच तारांकित हॉटेल मध्ये जाऊन वारेमाप पैसे देऊन आनंद शोधत राहतो . जम्मूतला आदिवासी भाग पाहण्यासाठी गेले होते, तेथून परतल्या नंतर आपण जीव धोक्यात घातला होता हे लक्षात आलं ,पण ज्यांच्याशी आम्ही बोललो त्या आदिवासींच्या चेहेऱ्यावर मात्र चिंतेचा लवलेशहि नव्हता.
आपल्या कडच्या वारली आदिवासी कलेतही   निसर्गाची जपवणूक आहे. निसर्गाशी आपण जितका एकरूप होतो इतका चैतन्य तुम्हाला  मिळतं. अनेक जण मला विचारतात तुमच्या चित्रातील रंगसंगती वेगळी का दिसते, तेव्हा मी त्यांना तेच सांगते निसर्गाशी एकरुप होताना निसर्गातलेच रंग आपल्याला दिसतात आणि तेच रंग चित्रातल्या कुंचल्यातल्या फटकार्यातून चित्रात उतरतात .
दरम्यानच्या काळात फेसबुकवर रजिस्ट्रेशन केलं आणि एके दिवशी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या एडिटरने माझ्याशी संपर्क केला.  मेल वरून आमची प्राथमिक बोलणी झाली अर्थात सुरवातीला मैत्रिणींनी खूप घाबरवलं  पण मनाचा हिय्या करून मीही त्यांच्याशी संपर्क साधलाच. फेसबुक मुले खुपश्या गोष्टी साध्य झाल्या .
सुरवातीच्या काळात राहुरी फॅक्टरी सारख्या लहानश्या गावातून आलेलो आपण, आपला कुठे वशिला नाही,  आपलं नाव कोणी सांगणार नाही मग या क्षेत्रात उंची कशी गाठणार असले प्रश्न मला पडायचे, मात्र फेसबुकच्या माध्यमातून हयात हॉटेलच्या साखळीने माझी चित्र पाहून लाइव्ह   डेमॉन्स्ट्रेशन साठी चौकशी केली तिथली माझी  चित्र पाहून  पंतप्रधानांच्या निवासस्थानातून विचारणा झाली. पुढे माझ्या चित्राला पंतप्रधान निवासाचं  कोंदण लाभलं . .त्या पुढच्याच वर्षी देशातल्या १०० प्रभावशाली स्त्रियांमध्ये माझी निवड झाली राष्ट्रपती भवनातील आदरातिथ्याने भारावले गेले.  माझासाठी हे सगळंच स्वप्नंवत होतं आणि तसं  पाहिलं तर हा माझा अलीकडच्या १० वर्षातला प्रवास होता.
या सर्व प्रवासात एक मोठं आत्मिक समाधान आहे ते म्हणजे मी कधी चुकीचा मार्ग अनुसरला नाही खूप पॉजिटिव्हली  वागले.  भविष्यातही खूप काम करायचंय १०-१५ सिरीज डोळ्यासमोर आहेत मात्र हल्ली प्रकृती साथ देत नाही मात्र नवीन जोमाने काम करण्याची ऊर्जा १० वर्षातल्या प्रवासाने मिळाली.   

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

    स्वरांगणातल्या किमयागार अंजली-नंदिनी गायकवाड

  

                 सा रे लिटील चॅम्प  या स्पर्धेची अंतिम फेरी जयपूर येथे सुरु होती. या स्पर्धेला आणि त्यातील स्पर्धकांना मोठी लोकप्रियता मिळत होती त्यामुळे या स्पर्धेच्या वेळेत देशभरातीलच नव्हे तर विदेशातील प्रेक्षकही दूरदर्शन संचा समोर खिळलेले असायचे. विशेषतः नगरकर... अर्थात त्याला कारणही तसंच होते.नगरची अंजली गायकवाड ही अवघ्या वर्षांची चिमुकली अंतिम फेरीत पोहोचली होती.आणि आज ती कसं  गाते या बद्दल सर्वांनाच उत्सुकता होती.
               क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा आणि जवळ येणारी निकालाची वेळ या साऱ्याची  प्रतीक्षा संपून मान्यवर अतिथींनी निकाल जाहीर करायला सुरवात केली, आणि सरते शेवटी या स्पर्धेतील विजेते पदाचा मुकुट  अंजली गायकवाडच्या शिरावर स्थिर झाला. तस अख्या नगर शहराच वातावरण बदलून गेल. अंजली गायकवाड सा रे लिटील चॅम्प या स्पर्धेची विजेती ठरली हा क्षण नगरकरांनी दिवाळी सारखा साजरा केला फटाक्यांची आतिषबाजी ,अंजली आणि तिचे कुटुंबीय नगरला पोहोचल्या नंतर भव्य मिरवणूक काढून केलेलं जंगी स्वागत नगरकरांनी आपल्या डोळ्यात आणी मोबाईल मध्ये साठवून ठेवलं .
                 नगरच्या संगीत क्षेत्रा बाबत सांगायचं झाल तर अत्यंत प्रयोगशीलतेने  ते विकसित झाल. ज्या काळात आजच्या सारखी साधन सामुग्री नसतानाही मोठ्या गायकांची गायकी पुण्या-मुंबईत जाऊन ऐकायची सुरावटींची टिपण काढायची ती अभ्यासून रियाज करायचा अश्या परिस्थितीतून नगर शहर-जिल्ह्याचीसंगीत क्षेत्राची वाटचाल सुरु झाली. मात्र आज संगीतच उत्तम प्रशिक्षण देणाऱ्या संगीताची जोपासना करणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत.अंजली-नंदिनी गायकवाड भगिनींनी संगीत सम्राट ही स्पर्धा आणि अंजलीन सा रे लिटील च्याम्प ही स्पर्धा जिंकून नगरच्या संगीत क्षेत्राच्या वाटचालीवर मनाचा शीरपेच चढविला आहे.
                 अनेक विद्यार्थी अंगद गायकवाड यांचे कडे संगीताचे धडे गिरवायला येतात त्याच वेळी आजूबाजूला रंगणाऱ्या रेंगाळणाऱ्या अंजली-नंदिनी वर संगीताचे सुरांचे संस्कार नकळत पणे होतच होते.नंदिनी अवघ्या पाच वर्षांची असताना गायला लागली तर अंजली त्याही पेक्षा लवकर अगदी चौथ्याच वर्षी गाऊ लागली. या दोन्ही भगिनींची संगीतातील कारकीर्द अवघ्या तीनचार वर्षाची मात्र एवढ्या अल्प काळात त्यांनी अनेक स्पर्धा तर गाजवल्याच शिवाय अनेक स्पर्धातून बक्षीस मिळवली आणि आपल्या गायकीनं  प्रेक्षक, श्रोते ,परीक्षकांना थक्क करून सोडल. नव्हे या स्वरांगणातल्या अद्भुत सुरांच्या त्या किमयागार ठरल्या.
                अगदी अल्लड वयातल्या या दोघी भगिनी. नंदिनी मृदू आवाजाची मात्र तीची स्मरणशक्ती,आकलन शक्ती तल्लख असल्याचे अंगद गायकवाड यांनी निरीक्षणातून हेरलं.एकूणच संगीतातील चांगली समज नंदिनीला आहे. शब्दातला नेमका भाव तिला कळतो हे जाणवलं.वयाच्या पाचव्या वर्षी नंदिनीने सुमन कल्याणपूर यांनी गायलेलंआकाश पांघरून जग शांत झोपलेही काहीशी गंभीर रचना वडिलांना  गाऊन दाखवली त्यांनीही तिचं कौतुक करत तिच्या गाण्यावर थोडी मेहनत घेतली,आणि त्या वर्षीच्या रावसाहेब पटवर्धन बालमहोत्सवात या गाण्याच्या सादरी करणातून प्रेक्षकांची दाद तर मिळवलीच शिवाय पुरस्कारही पटकावला.   




              अंजली तर त्याही पेक्षा लवकर गाऊ लागली. खणखणीत आवाज त्यात चंचलता असे दुहेरी मिश्रण असल्याने तीही तिही नंदिनी सारख उत्तम गाऊ शकेल असाही विश्वास अंगद गायकवाड यांना होता. त्या वयातच अंजली छोट्या छोट्या बंदिशी सहज गाऊ लागली. “ तुम बिन मोरी कौन खबर ले,मोरे गिरिधारीही पारंपारिक चालीतली पिलू रागातली बंदिश अगदी बिनचूक पणे गात अनेक मैफिलीतून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवून कौतुकास पात्र ठरत असतानाच लातूरच्या अष्टविनायक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतवृन्दावनी वेणूही गवळण सादर करून त्या स्पर्धेत उपविजेती ठरली, अर्थात वयात बसत नसल्याने तिचा विजेते पणाचा मान हुकला. तिथेच तिचा सन्मान सुरेश वाडकरांच्या हस्ते करण्यात आला. त्या दोघींशी बोलण्याच्या ओघात तुमचे आवडते गायक कोण असा प्रश्न आला त्यावेळी शास्त्रीय संगीतात किशोरी आमोणकर,कौशिकी चक्रवर्ती, मालीनी राजूरकर, पद्मावती शाळीग्राम, व्यंकटेश कुमार,शोभा गुर्टू, नजाकत अली, सलामत अली ही नाव आली तर सुगम संगीतात ,लता मंगेशकर , आशा भोसले, श्रेया घोशाल , अरजित सिंग अशी नावे या दोघींनी पटापट सांगितली. वास्तविक पहाता अंजली-नंदिनीच्या वयातल्याच काय तर त्यांच्याहून मोठ्या असलेल्या पिढ्यातील बहुतांश लोकांना यातली काही नाव माहितही नसतील, वर उल्लेखलेल्या गायकांची गायकी इतरही नवी जूनी गाणी त्यांना आवडत असल्याने रेडीओ ,मोबाईल मधून त्या ऐकत असतात, त्यातूनही गायकीतल्या हरकती, नजाकती लक्षात ठेऊन त्या रीयाजातून गिरवल्या जातात.  
       स्थानिक ,जिल्हास्तरीय-राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांमधील शेकडो पारितोषिके अंजली-नंदिनीच्या बावनकशी यशाची साक्ष देतात.त्यामुळेच चित्रवाहिन्यांवरच्या रियालिटी शोमधूनही या दोघी भगिनींना वाइल्ड कार्ड मधून प्रवेश मिळाला. हे ही या दोघींचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल. या दोन्ही भगिनींनी देशभरातील होणाऱ्या स्पर्धांमधून आलटून पालटून बक्षिसे मिळवल्याचे दिसते.त्याचे एकच उदहरण द्यायचे तर लखनौ येथे होत असलेल्यालखनौ क्लासिक व्हॉइस ऑफ इंडियाच्या स्पर्धेची २०१५ सालची विजेती नंदिनी ठरली तर २०१६ साली याच स्पर्धेचा जेतेपदाचा मान अंजलीने पटकावला.



संगीत सम्राटया स्पर्धेत दोघींना एकत्रितपणे गायनाची संधी असल्याने अंजली-नंदिनी या स्पर्धेत सह भागी झाल्या. तर सारेगमप लिटील चॅम्पस या स्पर्धेत ही दोघी सहभागी होणार होत्या मात्र संयोजकांनी त्या दोघींच्या गायनाचे महत्व लक्षात घेऊन एकाच कुटुंबातील दोन बहिणींमध्ये स्पर्धा करणे बरोबर नाही असा मुद्दा पुढे आल्याने नंदिनीने या स्पर्धेबाहेर रहाण्याचे ठरविले. मात्र अंजलीच्या यशात नंदिनीचा वाटा हा अत्यंत मोलाचा आहे.
     गेल्या तीन-चार वर्षापासून अंजली-नंदिनीची यशस्वी घौडदौड जोमाने सुरु आहे. या पुढील काळातही शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा त्या दोघींचा मानस आहे. अगदीच पोरसवदा वय  असलेल्या अंजली-नंदिनी यांनी अगदी लहान वयात मिळवलेले यश हिमालया एवढे उतुंग आहे. मात्र अजूनही या मुलींचे पाय जमिनीवर आहेत. आजही अंजलीला मैत्रिणींसोबत खेळायला खूप आवडते. वेळ मिळाला कि पोहायला जाण्याचा छंद ती जोपासते. तर नंदिनीला अभ्यासात रुची असली तरी शास्त्रीय संगीतातच करियर करायचे आहे.आजवरच्या त्यांच्या यशाकडे पाहता भविष्यातही त्या संगीत क्षितिजावर अखंडितपणे झगमगत रहातील यात शंका नाही

 अंजली मनस्वी कलाकार - 
  
                    अंजलीचे वडील अंगद गायकवाड हे मूळ लातूरचे , २००८ साली अखिल भारतीय गांधर्वसंगीत  अलंकार परीक्षेत ते देशभरातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्या निमित्त अरुण निगवेकरांच्या हस्ते त्यांचा  सन्मानही झाला. नगरमधील सुदाम गडकर हे तबला वादक संगीत शिकण्यासाठी म्हणून दर पंधरवड्याला लातूरला जायचे. तेथेच सुदाम गडकर आणि अंगद गायकवाड हे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे. नगरच्या पेमराज गुगळे कनिष्ठ महाविद्यालयात संगीत शिक्षकाची जागा भरावयाची असल्याने सुदाम गडकरींनी अंगद गायकवाड यांच्याकडे विचारणा केली. संगीत शिक्षकाच्या नोकरी निमित्ताने ते नगरला आले. नगरमधेही त्यांनी संगीत शाळा सुरु केली. व्यावसायिक संगीत कलावंत व्हावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती.अंजली-नंदिनी गायला लागल्या पासून त्यांनी त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले.स्वतःला जरी व्यावसायिक कलावंत होता आले नाही ,तरी अंजली-नंदिनीच्या यशामुळे मी खूप समाधानी आहे, असे ते म्हणतात.
                   अंजली-नंदिनीला रियालीटी शो मध्ये पाठवण्याबाबत अंगद गायकवाड यांच्या मनाची द्विधा मनस्थिती झाली होती.यापूर्वीच्या रियालिटी शोज बद्दल त्यांचा व्यक्तिगत अनुभव फारसा चांगला नसल्याने आणि स्पर्धेतून मधेच पडताना मुलींच्या मनावर होणारा परिणाम आदी गोष्टींचा विचार करून शिवाय शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या अंजली-नंदिनीच्या गायकीची शिस्त बिघडेल अशा अनेक प्रश्नांनी त्यांना घेरलेले होते. सरगम प्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रा.राम शिंदे अन्य स्नेहींशी चर्चा केल्यानंतर मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांचे संगीत त्यांचे संगीत क्षेत्रातील गुरु पंडित शांताराम चीगरी  गुरुजी यांना भेटून त्यांनी परवानगी दिल्या नंतरच या मुलीना रीयालीटी शो मध्ये भाग घेण्यास उद्युक्त केले
                 
  आईचे मोठे योगदान 
अंजली नंदिनीच्या या सांगीतिक वाटचालीमध्ये त्यांची आई मनीषा गायकवाड यांची मोठे योगदान आहे. कधी काळी भजने, हरीपाठ, गाण्या पर्यंतच संबंध असलेल्या मनीषा यांना लग्नानंतर अंगद यांच्या संगीताचा परीस स्पर्श लाभला मग त्यांनीही संगीताचे कित्ते गिरवीत संगीतातल्या चार परीक्षा दिल्या अंजली-नंदिनीच्या रियालिटी शो स्पर्धांच्या सहभागात त्याच या मुलींबरोबर सातत्याने असायच्या स्पर्धेच्या परीक्षकांनी दिलेले गाणे यु टयूब वर शोधायचे, ते अंजलीला ऐकवायचे अंजली ते वडिलांना गाऊन दाखवायची वडिलांनी सूचना दिल्या बरहुकुम मनीषा मुलींकडून तयारी करून घ्यायच्या. लिटील चॅम्प  स्पर्धेच्या वेळी तर अंजलीला मनीषाताई आणि नंदिनी या दोघींचे मार्गदर्शन मिळाले. संगीताच्या चार परीक्षा पास केल्यानंतरही आज मी उत्तम गाते असे नाही मात्र मुलींच्या गाण्यात  त्या कुठे चुकतात हे नेमके पणाने सांगण्याइतका आत्मविश्वास त्यांच्यात आला आहे. घरातून असलेले सांगीतिक वातावरण आणि दोन्ही मुलींची शास्त्रीय संगीताची झालेली पक्की बैठक यामुळेच अंजलीने अंतिम फेरीतनजर जो तेरी लागी,मै दिवानी हो गई , छल्ला वल्ला , मै कोल्हापूर से आइ हू , या तीनही गाण्यांबरोबर अगोदर गायलेल्या काही गीतांमधील हरकती नजाकतीं मुळे पाकिस्तानातील संगीत क्षेत्रातील जाणकारांनी अंजलीला भरभरून दाद दिली.    





Post a Comment

0 Comments