महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष: १६ आमदारांना अपात्र ठरवलं गेलं तर काय होईल?

 महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष: १६ आमदारांना अपात्र ठरवलं गेलं तर काय होईल? काय म्हणाले कायदेतज्ज्ञ उल्हास बापट?



महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांना अपात्र ठरवलं तर नेमकं काय होईल हे कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी स्पष्ट केलं आहे.


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात सुनावणी



वेब टीम नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आता १४ फेब्रुवारीपासून सलग होणार आहे. सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय देणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मात्र १६ आमदार जर अपात्र ठरवले गेले तर काय होईल यावर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट हा सामना सुप्रीम कोर्टात गेला आहे. शिवसेना आमचीच हा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांना अपात्र ठरवलं तर हा शिंदे सरकारसाठी मोठा झटका असणार आहे.


काय म्हटलं आहे कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी?

सर्वोच्च न्यायालयात आज नक्की क्रमवार कसं काय घडेल ते सांगणं कठीण आहे. मात्र हा निर्णय लवकरात लवकर लागला पाहिजे. छोट्या देशांमध्ये थेट लोकशाही असते. तर भारतासारख्या देशात पक्ष व्यवस्था असते. ही व्यवस्था जपण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय १६ आमदारांना अपात्र ठरवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

१६ आमदारांना जर कोर्टाने आज अपात्र ठरवलं तर काय होईल?

सर्वोच्च न्यायालयाने जर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात १६ आमदारांना अपात्र ठरवलं तर त्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर त्यांना मंत्री राहता येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपद गेलं तर सरकार अस्तित्त्वात राहणार नाही. याचाच अर्थ असा होईल की कुणालाही बहुमत राहणार नाही आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल. याचा अर्थ असा होईल की गेले सहा महिने हे सरकार काम करतं आहे ते घटनाबाह्य होतं का? हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे असे जे खटले आहेत ते सुप्रीम कोर्टाने लवकर निकाली काढले पाहिजेत. कारण सगळ्याच राज्यांमध्ये पक्षांतर सुरू आहे. निकोप लोकशाही जपायची असेल तर निर्णय लवकर घेतले गेले पाहिजेत असंही बापट यांनी स्पष्ट केलं.

१६ आमदारांना अपात्र ठरवलं गेलं तर सरकार पडणार

१६ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवलं तर सरकार पडणार हे निश्चित आहे. ९१ वी घटना दुरूस्ती झाली त्यात असं लिहिलं आहे की या कायद्याखाली अपात्र झाल्यास मंत्री राहता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री गेले तर सरकार पडणार. कुणालाच बहुमत नसेल तर राष्ट्रपती राजवट ठरणार. एवढंच नाही तर उर्वरित जे आमदार आहेत तेदेखील अपात्र ठरणार आहे.

बंडखोर आमदारांना विलीनकरणाचा पर्याय आहे का?

१६ आमदारांना जर सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवलं तर त्यांच्या पाठोपाठ आलेले सगळे आमदार अपात्र ठरणार. एवढंच नाही तर त्यांना भाजपमध्ये विलीन होण्याचाही कुठलाच पर्याय उरणार नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्ट याबाबत काय निर्णय देतं ते महत्त्वाचं ठरणार आहे. टीव्ही नाईन मराठीला दिलेल्या मुलाखतीत उल्हास बापट यांनी म्हटलं आहे.

महेश जेठमलानी हे आजच्या सुनावणीत शिंदे गटाची बाजूने उपस्थित होते. तर कपिल सिब्बल हे ठाकरे गटाची बाजूने उपस्थित होते. महाराष्ट्रात २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान देत बंड केलं. सुरूवातीला त्यांच्यासोबत १६ आमदार होते. त्यानंतर ही संख्या ४० आणि अपक्ष आमदार १० अशी मिळून एकूण ५० झाली होती. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरेंनी २९ जूनला राजीनामा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. तर ३० जूनला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर हा अपात्रतेचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. नव्या वर्षातली ही पहिली सुनावणी होती. या सुनावणीच्या दरम्यान आता १४ फेब्रुवारी ही पुढची तारीख मिळाली आहे.


Post a Comment

0 Comments