लखीमपूर हत्याकांड पूर्व नियोजित एस आय टी चा गंभीर आरोप

लखीमपूर हत्याकांड पूर्व नियोजित एस आय टी चा गंभीर आरोप 

पंतप्रधान मोदींवर पुन्हा माफी मागण्याची वेळ आल्याचा राहुल गांधींचा टोला 

वेब टीम नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी मोदी सरकारवर सातत्याने हल्ले चढवत आहेत. सध्या ते देशभरात महागाईविरोधात रॅली घेत सभांमधून सरकारवर हल्ले चढवत आहेत. त्यातच आता लखीमपूर खेरी प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारणे हा पूर्वनियोजित कट असल्याचा खुलासा केला. यानंतर राहुल गांधी यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींना पुन्हा माफी मागण्याची वेळ आल्याचा टोला लगावला. तसेच माफी मागण्याआधी शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या आरोपीच्या वडिलांना मंत्रीपदावरून हटवा अशी मागणी केली.

एसआयटीने नेमका काय खुलासा केला?

लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणं हा विचारपूर्वक केलेल्या नियोजित कटाचा भाग होता, असं या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) म्हटलं आहे. या प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा मुख्‍य आरोपी आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाच्या प्रमुखांनी न्यायाधीशांना याबाबत चिट्ठी लिहिली आहे. यात आशीष मिश्राविरोधातील आरोप दुरुस्त केले पाहिजे असं म्हटलं आहे. या प्रकरणी आशीष मिश्रा आणि त्याचे इतर सहकारी हत्या आणि कटाच्या आरोपांचा सामना करत आहेत. यात हत्येचा प्रयत्न  आणि काही गंभीर आरोपांचा समावेश करण्याची शिफारस या एसआयटीने केली आहे.

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना आणि सत्ताधारी भाजपाविरोधात सत्ताविरोधी जनमत असताना या घडामोडी भाजपाची डोकेदुखी वाढवणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे केंद्रीय गृह राज्‍यमंत्री अजय मिश्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत.

लखीमपूर हत्याकांडाचा निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता

विरोधी पक्षांनी या घटनेनंतर सातत्याने अजय मिश्रा यांना पदावरून हटवण्याची मागणी केलीय. मात्र, आतापर्यंत मोदी सरकारने ही मागणी मान्य केलेली नाही. मात्र, तपासात समोर येत असलेल्या नव्या पुराव्यांमुळे भाजपावरील दबाव वाढण्याची चिन्हं आहेत. लखीमपूर हत्याकांडानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना सातत्याने दिसून आली आहे. त्याचा परिणाम आगामी निवडणुकांवरही होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडले?

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना मागून येऊन गाडीखाली चिरडल्याचा आरोप आहे. या लखीमपूरमधील या घटनेत ४ शेतकऱ्यांचा आणि एका पत्रकाराचा मृत्यू झालाय. महिंद्रा थार गाडीसह एकूण ३ गाड्यांच्या ताफ्यानं शेतकऱ्यांना चिरडल्यानंतर घटनास्थळावर उपस्थित शेतकरी संतापले. त्यांनी ज्या गाड्यांनी आंदोलकांना चिरडलं त्या गाडीतील काही लोकांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत मंत्री अजय मिश्रा यांच्या महिंद्रा थार गाडीचा चालक आणि २ भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments