राज्यात किमान १५ दिवसांचा लॉकडाऊन : टोपे

 राज्यात किमान १५ दिवसांचा लॉकडाऊन : टोपे 

वेब टीम मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत चालली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करणं हाच पर्याय असल्याचं काल सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात लॉकडाऊन हा कमीत कमी १५ दिवसांचा असेल. लॉकडाऊनची सर्वांच्या मनाची तयारी झाली आहे. अंतिम निर्णय दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री घेतील, असं टोपे यांनी सांगितलं आहे. 

राजेश टोपे म्हणाले की, दोन तीन दिवसात मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय घेतील. तसेच रेमडेसिवीरवर इंजेक्शनच्या नियंत्रणासाठी कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयांना आता रेमडेसिवीर जिल्हाधिकारी कार्यालयातून घ्यावं लागणार आहे, असंही ते म्हणाले.  

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आणि रोज वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता दाट झाली आहे. कारण आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनला पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. काल सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. राज्यात लॉकडाऊनला पर्याय नाही. १ रुग्ण२५ जणांना बाधित करतो, त्यामुळे ही चैन तोडणं गरजेचं आहे. तरुण, लहान मुलं बाधित होत आहेत, त्यामुळं एकमुखानं निर्णयाची वेळ आली आहे. यात राजकारण नको. केंद्राकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची मागणी केली आहे. आता  लॅाकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असं ते उद्धव ठाकरे म्हणाले.  सर्वांना एकमुखानं निर्णय घेऊन सर्वांनी जनजागृती केली पाहिजे. सर्वांच्या साथीची गरज आहे, असं आवाहन देखील त्यांनी केलं होतं.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्वाचा इशारा दिला आहे. राज्यात कडक लॉकडाऊनची गरज आहे नाहीतर १५ एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल, असा इशारा मुख्य सचिवांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वांसमोर यावेळी त्यांनी कोरोनासंबंधी सादरीकरण देखील केलं.

Post a Comment

0 Comments