गोव्यात राजकीय भूकंप करायला निघालेल्या राऊतांना काँग्रेसचा दणका, म्हणाले…


मुंबई  : महाराष्ट्रात सत्तापालट केल्यानंतर शिवसेनेने आपला मोर्चा गोव्याकडे वळवला असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सांगितलं होतं. तसंच लवकर गोव्यात राजकीय भूकंप होणार असून, चमत्कार दिसेल असा दावाही त्यांनी केला होता. गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि तीन मंत्री आपल्या संपर्कात असून शिवसेना नवी आघाडी निर्माण करुन भाजपा सरकार घालवणार असल्याचंही ते म्हणाले होते. परंतु त्यांच्या वक्तव्याला २४ तासही उलटत नाही तर काँग्रेसनंच त्यांना मोठा दणका दिला आहे. आपण विरोधी पक्षातच बसणार असल्याचं गोवा काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे.
गोवा सरकार पाडण्यासाठी आपण प्रयत्नशील नसल्याचं गोवा काँग्रेसनं म्हटलं आहे. तसंच काँग्रेस सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार करण्यापेक्षा विरोधी बाकांवर बसणं पसंत करेल, अशी प्रतिक्रिया गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली. आमच्यासाठी महाराष्ट्राचं राजकारण संपलं असून सध्या गोव्याच्या राजकारणात व्यस्त आहोत असं संजय राऊत म्हटलं होतं. “महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही फ्रंट उभा केला जात आहे. गोव्यात ज्या प्रकारे सरकार निर्माण केलं आहे ते सर्वांना माहिती असून हे आमच्यावर टीका करतात,” असा टोलाही त्यांनी लगावला होता.
गोव्यात ४० पैकी ३० आमदार हे भाजपाच्या बाजूनं आहेत. त्यामुळे सरकार पाडण्यापेक्षा आम्ही विरोधी बाकावर बसू, असं चोडणकर यावेळी म्हणाले. तसंच महाराष्ट्रातील जनतेला दिलेली आश्वासनं तुम्ही पूर्ण करा. दिवसा-ढवळ्या स्वप्न पाहणं बंद करा, असा टोला भाजपा नेते विनय तेंडुलकर यांनी राऊत यांना लगावला.

Post a Comment

0 Comments