नगरटुडे बुलेटीन 04-01-2021

 नगरटुडे  बुलेटीन 04-01-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 राठोड परिवाराचे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडून सांत्वन

   वेब टीम  नगर :  नगरचे शिवसेनेचे माजी आमदार स्व.अनिल राठोड यांच्या परिवाराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी  भेट घडवून देणार आहे, असा शब्द शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी नुकतीच राठोड कुटूंबियांना दिला शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांच्या कुटूंबाचे सांत्वन केले.

     यावेळी स्व.अनिल राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड, अमोल ठाकूर, विनया ठाकूर, मीरा मिलिंद नार्वेकर, शुभदा मालवणकर उपस्थित होते. नार्वेकर यांनी उपनेते स्व.अनिल राठोड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. यानंतर राठोड परिवार व नार्वेकर यांच्यामध्ये चर्चा झाली.

    यावेळी  बोलतांना नार्वेकर म्हणाले, उपनेते अनिल राठोड यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांना भेटण्यासाठी यायाचे होते. मागील वेळेला काही कारणास्तव येता आले नाही, त्यामुळे आज मी त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली आहे. राठोड यांच्या पत्नी यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्हाला भेटायचे आहे, असे सांगितले आहे. त्यांचे कुटूंब येथे आल्यावर त्यांची व मुख्यमंत्र्यांची भेट घडवून देणार आहे, असे नार्वेकर यांनी सांगितले. ही बाबही मी पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.

     त्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी शिवालय येथेही स्व.अनिल राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करुन पदाधिकारी व नगरसेवक यांच्याशी चर्चा केली.

     यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, योगीराज गाडे, संजय शेंडगे, गणेश कवडे, दत्ता कावरे, मदन आढाव, संतोष गेनप्पा, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, अनिल बोरुडे, सचिन शिंदे, अशोक दहिफळे, दत्ता जाधव, अमोल येवले,  काका शेळके, परेश लोखंडे, विशाल वालकर, संग्राम कोतकर, रमेश खेडकर, मुन्ना भिंगारदिवे, प्रदीप परदेशी, गौरव ढोणे, शशिकांत देशमुख यांच्यासह महिला आघाडीच्या आशा निंबाळकर, अरुणा गोयल आदिंसह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

समाजातील वंचितांना शिक्षण देण्याचा कार्य संस्थेच्यावतीने सुरु

 बाळासाहेब बोराटे : श्री सावताश्रम शिक्षण समितीच्यावतीने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

   वेब टीम  नगर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा मुलींना शिक्षण बंदी होती, अशा परिस्थितीत स्वत: शिक्षण घेऊन मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे मुली शिक्षित होऊन आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्वाने आपले नाव चमकवित आहेत. श्री सावता श्रम शिक्षण समितीच्यावतीनेही मुलींच्या शिक्षणासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. मुलींना शिक्षण मिळावे, त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहव्यात, यासाठी संस्थेच्यावतीने मुलींसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. महात्मा ज्योतिबा फुले व सवित्रीबाई फुले यांनी वंचितांना शिक्षण देण्याचा जो वसा उचचला आहे, तेच कार्य संस्थेच्यावतीने सुरु असल्याचे प्रतिपादन श्री सावताश्रम शिक्षण समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.

     क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री सावता श्रम शिक्षण समितीच्या सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय व महात्मा फुले विद्या मंदिर यांच्यावतीने सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सचिव प्रा.सुनिल जाधव, कार्याध्यक्ष विष्णू फुलसौंदर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, डॉ.सुदर्शन गोरे, बजरंग भुतारे, विष्णूपंत म्हस्के, जालिंदर बोरुडे, शेखर व्यवहारे, मुख्याध्यापिका सुनिता पालवे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी विष्णू फुलसौंदर म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्या त्यागातून स्त्री शिक्षणाची जी चळवळ उभे राहिली आहे, ती पुढे नेण्याचे काम आपणा सर्वांना करावयाचे आहे. मुलींना चांगले शिक्षण देऊन त्यांना समाजात मानाचे स्थान मिळाण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. संस्थेच्यावतीने शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच विविध क्षेत्रात विद्यार्थी चमकत असल्याचे त्यांनी सांगितले.

     कार्यक्रमाच्या प्रास्तविकात मुख्याध्यापिका सुनिता पालवे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन दिला. सूत्रसंचालन शेखर व्यवहारे यांनी केले तर आभार विष्णू फुलसौंदर यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

समाजाच्या गरजा ओळखून काम करावे

श्रीकांत आंबेकर : महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्यावतीने रक्तदान शिबीर 

    वेब टीम  नगर : कोरोनाच्या संकटानंतर रक्तदान ही महत्वाची गरज बनली आहे. रक्ता अभावी अनेक समस्या उद्भवत आहे, त्यामुळे अनेक पातळीव्यांवर रक्तदान चळवळीत पुन्हा नव्या जोमाने सुरु करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या रक्तदान शिबीराचे आयोजन करुन सामाजिक दायित्व जपले आहे. राष्ट्र पुरुषांनी समाजाच्या उन्नत्तीसाठी जे योगदान दिले आहे, जे विचार दिले आहेत, त्या विचारांवर आपण सर्वांनी चालले पाहिजे. समाजाच्या गरजा ओळखून त्यादृष्टीने आपण काम केल्यास एक चांगला समाज निर्माण होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन श्रीकांत आंबेकर यांनी केले.

     क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्यावतीने माळीवाडा येथे रक्तदान शिबीर व दंत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ सुदर्शन गोरे ,श्रीकांत आंबेकर, भारत जाधव, अक्षय गाडळकर, विकी कानडे, कमलेश जंजाळे, ओंकार फुलसौंदर, ओंकार लेंडकर, गणपत चेडे, मंदार लोखंडे, अक्षय चेडे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी भारत जाधव म्हणाले, महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्यावतीने नेहमीच समाज हिताच्या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. रक्तदानाची गरज ओळखून शिबीराचे आयोजन करुन गरजवंतांच्या रक्ताची गरज भागविण्याचा छोटासा प्रयत्न यानिमित्त केला आहे. सावित्रीबाई फुले यांचे त्याकाळातील सामाजिक खूपच संघर्षमय होते. अशा महान व्यक्तींचे स्मरण सामाजिक उपक्रमात ठेवण्याचा प्रयत्न यानिमित्त केला आहे.

     या कार्यक्रमास मंगल भुजबळ, स्वाती सुडके, विष्णूपंत म्हस्के, अनिल इवळे, चंद्रकांत ताठे, बजरंग भुतारे, रोहित व्यवहारे, मोहित गांधी, शुभम भापकर, सिंद्धांत जाधव, अजिंक्य म्याना,अशोक तुपे  आदि उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय गाडळकर यांनी केले तर आभार विकी कानडे यांनी मानले. यावेळी पोलिस कर्मचार्‍यांनीही रक्तदान करुन प्रोत्साहन दिले. रक्तसंकलनाचे कार्य अर्पण रक्तपेढीच्यावतीने केले तर डॉ. सुदर्शन गोरे यांनी रुग्णांची दंत तपासणी केली. या शिबीरात 51 रक्तपिशव्यांचे रक्तसंकलन झाले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सेवाश्रय करणार अनाथ दिपकची स्पप्नपुर्ती...

मातृ-पितृछत्र हरलेल्या दिपकला फुंदे दाम्पत्यांचा आधार

   वेब टीम पाथर्डी : काही दिवसापुर्वी एक फोन आला अन दिपक ची माहिती मिळाली,त्याच्यासह आम्हालाही भेटीची ओढ लागली...दिपक घरी आला. बीड जिल्ह्यातील दुष्काळी गावातला दिपक बारावीत असतांना दोन वर्षापुर्वी वडीलांच निधन झाल, घरातील कमवती व्यक्ती गेली. वडील कुठे गेले हे न समजणारी चिमुकली बहीणच्या संगोपनासह डोंगराएवढ्या दुःखातून सावरत असतांना एका जीवघेण्या असाध्य आजाराने घेरलेली आई अन दिपक एकमेकांना कसाबसा आधार देत सावरत असतांनाच आठ दहा महिन्यापुर्वी नियतीने घाला घातला अन दिपकच उरलसुरल मातृछत्रही हरपलं स्पर्धा परिक्षेतून अधिकारी होण्याच स्वप्न पाहत धिरोदात्त दिपक आता मात्र गावाकडे असून नसल्यासारखी शेती आई-वडिलांच्या आजारपणानं झालेली आर्थिक कोंडी यामुळे नियतीपुढे अक्षरशः गुडघे टेकून हाताश झाला होता तासभरात त्याची कथा अन व्यथा ऐकतांना अनेकदा अश्रू अनावर झाले.आज शिक्षणासोबत दिपकच्या पोटाचा मोठा प्रश्‍न आहे वाढत्या वयातील लेकरांना दिवसभरात अनेकदा भूक लागते,भूकेलेला चेहरा पाहून काहीतरी खायला देणारी आई राहीली नाही गेले काही महिने अर्ध भाजल अर्ध कच्च अस हाताने करुन तर कधी मिळेल ते खाणारा दिपक पुस्तकाच्या सहवासात भूक नाही लागत सर हे बोलतांना खूप गहिवरला. त्याला धीर देताना कोणतीही ही चर्चा न करता अनुराधा आणि मी केवळ डोळ्यांच्या भाषेने एकमेकांच्या मनातल जाणून दिपकच्या स्पर्धा परीक्षेच्या स्वप्नपुर्तीसाठी आवश्यक त्या पुस्तकांसह त्याच्या राहण्या खाण्याची काळजी अन जबाबदारी घेण्याच ठरवत सेवाश्रय ने दिपकला आश्रय देवून त्याच मातृत्व स्विकारलं...

     जून मध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दिपकला पुण्याला जायच आहे आम्ही घेतलेल्या जबाबदारीच कौतुक करत अभ्यासासाठी स्पर्धा परीक्षेत नावलौकिक असलेली पार्थ अ‍ॅकॅडमी अभ्यासिकेचे संचालक आदरणीय आंधळे मेजर यांनी मे  महिन्यांपर्यंत विनामूल्य प्रवेश दिला.

     सेवाश्रय फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा फुंदे यांचे वतीने दिपकला राहण्या-खाण्याच्या व्यवस्थेच्या खर्चासाठी  मदतीचा दहा हजार रुपयांचा  धनादेश पाथर्डी नगरपरिषदेचे नगरसेवक बंडूपाटील बोरुडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. सेवाश्रयच्या माध्यमातून अनाथ, निराधार विधवा भगिनी सांठी करत असलेल्या कार्यामुळे फुंदे दाम्पत्याच सर्वत्र कौतुक होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोनाच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी स्नेहामेळावे  उपयुक्त

डॉ.विजय पवार : ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा संपन्न


    वेब टीम चिचोंडी पाटील :
गेल्या १० महिन्यांपासून कोरोनामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. त्यामुळे प्रत्येकजण आरोग्याची काळजी घेत होते. आता कोरोनाचे संकट दूर होत असतांना पुन्हा पुर्वीसारखे चांगले दिवस येण्यासाठी कोरोनाच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले. यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येवून नव्या-जुन्या आठवणींना उजाळा दिला. एकप्रकारे यानिमित्त अंतरिक ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे, असे सांगून डॉ. विजय पवार यांनी  कोरोना प्रादुर्भावाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

चिचोंडी  पाटील  येथील बाबासाहेब पवार यांनी चिचोंडी पाटील येथे ज्येष्ठ संघाच्यावतीने स्नेहमेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.विजय पवार, ज्येष्ठ नागरिक करांडे गुरुजी, भोस गुरुजी, धर्माजी हजारे,  कल्याण पाटील, खांदवे गुरुजी, छबुराव कोकाटे, श्रीरंग पाटील ठोंबरे, नामदेव थोरे, गणपतराव पवार, अशोक बंन्सी कोकाटे, शंकरराव कोकाटे आदिंसह सभासद, जुने सहकारी उपस्थित होते.

       देशावर जगावर आलेले कोरोना संकट लवकरात लवकर दूर व्हावे. या अनुषंगाने  सर्व जगाच्या आरोग्य  रक्षणासाठी  प्रार्थना करण्यात आली. यावेळी बाबासाहेब पवार यांनी सर्व जेष्ठांना गरम पाणी पिशवीचे वाटप केले. प्रास्ताविक ऑडिटर रघुनाथ दळवी यांनी केले. शेवटी बाबासाहेब पवार यांनी आभार मानले गंगाधर दरेकर यांनी पसायदान म्हणून  मेळाव्याची सांगता केली. या उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्वातंत्र्य आणि समानता निर्माण करण्यास सावित्रीबाईंचेही योगदान आहे 

 प्रा.स्वाती सुडके : ओबीसी, व्ही.जे., एन.टी.ची अभिवादन सभा


वेब टीम नगर : 
स्वातंत्र्य आणि समानता निर्माण करण्यास सावित्रीबाई फुलेंचेही योगदान आहे. महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारधारेतून देशाला स्वातंत्र्य आणि आजचा आधुनिक समाज निर्माण झाला. समाजात एकजूट आणि समानता कायम ठेवण्यासाठी फुले दांम्पत्यांची विचारधारा आणि चरित्र आजच्या नव्या पिढीला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन प्रा. स्वाती सुडके-चौधरी यांनी केले. ओबीसी, व्ही.जे., एन.टी. जनमोर्चाच्या नगर शाखेच्यावतीने प्रख्यात व्याख्यात्या प्रा.सुडके यांचे व्याख्यान माळीवाडा महात्मा फुले पुतळ्या नजिक आयोजित केले होते. त्यावेळी त्यांनी सावित्रीबाईंचे जीवनचरित्र उपस्थितांसमोर ठेवले. अध्यक्षस्थानी माजी महापौर भगवान फुलसौंदर होते.

     प्रा.सुडके पुढे म्हणाल्या, स्त्री-पुरुष समानता ही आजची गरज आहे. सावित्रीबाईंनी त्यांच्या काळात महात्मा फुले यांची चळवळ राबवून समाजाला नवी दिशा दिली होती. फुले यांच्या निधनानंतरही सावित्रीबाईंनी ही विचारधारा त्यांच्या अखेरपर्यंत जपली आणि समाजाला दिशा देण्याचे काम केले. तो काळ अत्यंत वेगळ्या परंपरेतील होता. नवी परंपरा निर्माण करण्याचे जिकीरीचे काम सावित्रीबाईंनी केले. त्या समाजसुधारकच असं ही त्यांनी अनेक उदहारण देत स्पष्ट केले.

     प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात माजी महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले, ओबीसी चळवळीला फुले दाम्पत्यांच्या विचाराची खरी गरज असून, चळवळ संकुचित वृत्तीची न ठरता सत्याचा पुरस्कार करणारी ठरावी.

     स्वागतपर भाषणात नगरसेवक बाळासाहब बोराटे म्हणाले, आज समाजात स्त्रीयांना जी समान संधी विविध क्षेत्रात प्राप्त आहे ती फुले यांच्या समाजसुधारणा कार्याची देणगी आहे. तर प्रास्तविकाात शहर काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ म्हणाले, प्रवाहा विरोधात लढणं आजच्या लोकशाहीतही अवघड आहे. समाजावर वेगळ्या परंपरेचा पगडा असलेल्या १५० वर्षापूर्वीची स्थिती अत्यंत वेगळी होती पण आद्य समाजसुधारक महात्मा फुले यांनी समाजात समानता आणण्याचा जो प्रयत्न केला ती परंपरा सावित्रीबाईंनी जपली त्यामुळे स्वातंत्र्य देशाला मिळाले आणि स्वतंत्र्य भारताने समानताही स्विकारली, तो विचार पुरोगामी आहे.

     ओबीसी नगर शाखेचे दत्ता जाधव, जयंत येलूलकर, प्रा.सुनिल जाधव, संतोष गेनाप्पा, विष्णूपंत म्हस्के, रमेश सानप, आनंद लहामगे, राजू पडोळे, अनिल निकम, अनिल इवळे, विशाल वालकर, गौरव ढोणे, किरण बोरुडे, नईम शेख, सागर फुलसौंदर, मंगल भुजबळ, .मनिषा गुरव, अमोल भांबरकर, जालिंदर बोरुडे, प्रकाश भंडारे, नागेश शिंदे, नितीन डागवाले, दिपक खेडकर आदि उपस्थित होते. शेवटी शशिकांत पवार-रावळ यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तज्ञ डॉ.संकेत पुरोहित सारख्यांमुळे आनंदऋषीचा डायलिसिस विभाग देशात अव्वल 

 सुधीर मेहता : डॉ.संकेत पुरोहित यांचा रुग्णांकडून उस्फुर्त सन्मान.

     वेब टीम नगर : सामान्य गरीब रुग्णांना अल्प दरात सेवा देण्याची आचार्य श्री आनंदऋषजी यांनी संकल्पना मांडली. आदर्शऋषी आणि सहकार्‍यांनी ती प्रत्यक्षात आणली. संतोष बोथरा व सर्व सहकारी मित्रांनी ती पूर्णत्वास नेली. मात्र डॉ. आशिष भंडारी, डॉ. गोविंद कासट आणि सेवाभावी डॉक्टरांनी निस्पृह सेवेचा कळस चढवून आनंदऋषी  डायलिसीस विभाग आज देशात अग्रेसर केलाय. केवळ सुसज्ज आधुनिक सामुग्री नव्हे तर प्रत्येक कर्मचारी हा अदबशिर सेवाभावी हे येथील वैशिष्ट्ये असून डॉ. संकेत पुरोहित यांना मिळालेला ‘किडनी वॉरियर्स योद्धा’ हा देश पातळीवरील पुरस्कार हे त्याचेच द्योतक असल्याचे प्रतिपादन नवनीत विचार मंच आणि नगर पर्यटन महोत्सवचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी केले.

     संकेत पुरोहित यांचा गौरव म्हणजे संपूर्ण हॉस्पिटलचा सन्मान असल्याच्या शब्दात सुधीर मेहता यांनी आनंद ऋषी हॉस्पिटलच्या निरपेक्ष  रुग्ण सेवेचा गौरव केला. डॉ. आशिष भंडारी, किडनी विकार तज्ञ डॉक्टर गोविंद कासट, प्रकाश मुनोत,  दिपक धेंड, डॉ. यशोदीपा कांकरिया,परमजीत सभरवाल, रवि बोरसे, आदित्य पावसे, सतीश संचेती, प्रकाश गडे, रमेश सावंत, पेशंट आणि पालक तर तंत्रज्ञ कर्मचारी बाळासाहेब लहरे, बाळू दळवी, तुषार गाडेकर, प्रवीण बोर्डे, छाया गादे, प्रज्ञा कुलकर्णी आदींनी  यावेळी  संकेत पुरोहित यांचा सन्मान केला नेहमी इतरत्र रुग्ण आणि पेशंट यांचा वेगळाच सामना रंगतो पण आनंद  ऋषितल्या  या आगळ्या सन्मानाने सगळ्यांनाच सुखावून गेला..

     डायलिसीस रुग्णांसाठी आनंद दर्शन डायलिसीस क्लब सुरू करणार असून किडनी रुग्णांना वैद्यकीय मार्गदर्शन त्यांच्या जागृती आणि प्रसंगी आर्थिक सहकार्य देण्याची घोषणा मेहता यांनी केली. डॉ. आशिष भंडारी यांनी या क्लबला संपूर्ण मार्गदर्शनाचे आश्‍वासन दिले. डॉ. गोविंद कासट यानी लवकरच किडनी रुग्णांसाठी हेल्पलाइन सुरू होत असून त्याचा रुग्णांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले .

     जगभरातील किडनी वरियार योध्यांसाठी देण्यात येणारा पुरस्कार महाराष्ट्रातील रोज दोन हजार डायलिसीस  आणि सर्व उच्च वैद्यकीय सेवा देणार्‍या आनंदऋषी डायलिसीस  विभागाचे मुख्य तंत्रज्ञ संकेत पुरोहित यांना दुबई येथे झालेल्या कार्यक्रमात ऑनलाईन देण्यात आला. यावेळी  परमजीत सभरवाल यांनी पुढच्या वर्षी सर्वोत्कृष्ट रुग्णसेवेचा पुरस्कार आनंदऋषी हॉस्पिटलला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अहमदनगर जिल्हा माळी सेवा संघाच्या कार्यक्रमातून क्रांतीज्योतीच्या किर्तीवंत कार्याचा जागर

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती : प्राकृतिक चिकित्सा शिबीरात नागरिकांची तपासणी 

वेब टीम नगर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्हा माळी सेवा संघाच्या वतीने मोफत प्राकृतिक चिकित्सा शिबीर घेण्यात आले. सेवा संघाच्या लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड येथील जिल्हा संपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात शाहिरांनी आपल्या पोवाड्यातून क्रांतीज्योतीच्या किर्तीवंत कार्याचा जागर केला. तर व्याख्यानातून सावित्रीबाईच्या स्त्री शिक्षण चळवळ ते आजची सक्षम स्त्री चा आढावा घेण्यात आला.

क्रांतीसुर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण मोफत प्राकृतिक चिकित्सा शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. सुदर्शन गोरे, प्रा.स्वाती सुडके, डॉ. संजय गिर्‍हे, माळी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भानुदास होले, अ‍ॅड. महेश शिंदे, उपाध्यक्ष मेजर नारायण चिपाडे, अशोक लेंडकर, अ‍ॅड. अनिता दिघे, अ‍ॅड. सुनिल तोडकर, अ‍ॅड. पुष्पा जेजूरकर, किरण सातपुते, आरती शिंदे, पोपट बनकर, अशोक तुपे, रजनी ताठे, शकुंतला लोखंडे, योगेश खेंडके, सागर आलचेट्टी, सुर्यकांत रासकर, संतोष धीवर, विजया काळे, सुनिल सकट आदी उपस्थित होते.  

अ‍ॅड. भानुदास होले म्हणाले की, आजच्या पिढीला सावित्रीबाई फुले यांचे कार्य, विचार व त्यांचा त्याग समजण्याची गरज आहे. स्त्री शिक्षणाने आज समाजात क्रांती झाली आहे. स्त्री शिक्षणाची मशाल प्रज्वलीत करणार्या सावित्रीबाईंचे कार्य आजही दीपस्तंभासारखे असल्याचे सांगितले. अ‍ॅड. महेश शिंदे यांनी प्रवाहा विरोधात जाऊन सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य केले. आजची कर्तुत्ववानस्त्रीचे श्रेय सावित्रीबाईंना जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. गोरे, अ‍ॅड. दिघे, अ‍ॅड. तोडकर यांनी आपल्या भाषणात महिलांना समाजाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण चळवळीतील योगदान विशद केले.    

या मोफत प्राकृतिक चिकित्सा शिबीरात डॉ. संजय गिर्‍हे यांनी शिबीरार्थींची गुडघेदुखी, सांधेदुखी, मायग्रेन, मनके विकार, कंबर व टाचदुखी आदिंची तपासणी करुन मार्गदर्शन केले. प्रा. स्वाती सुडके यांनी आपल्या व्याख्यानात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी परिस्थितीवर मात करुन व समाजाच्या रुढी, परंपरा झुगारुन स्त्री शिक्षणासाठी दिलेले योगदानावर भाष्य करीत आजच्या सक्षम व कर्तृत्ववान महिलांचा आढावा घेतला. शाहिर वसंत डंबाळे, कान्हू सुंबे, अनंत द्रवीड व संतोष धीवर यांनी एका पेक्षा एक सरस पोवाडे व गीत सादर करुन सावित्रीबाईच्या कार्याला सलाम केले.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय युवा अ‍ॅकेडमी, आधारवड बहुद्देशीय संस्था, उडान फाऊंडेशन, द युनिव्हर्सल फाऊंडेशन, नर्मदा फाऊंडेशन, रयत प्रतिष्ठान, किरण फाऊंडेशन, माहेर फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बहुजन शिक्षण संघात प्राचार्य डी.व्ही.शिंदेचे कार्य कौतुकास्पद

अँड.संघराज रुपवते : दादासाहेब रुपवते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डी.व्ही.शिंदे यांचा संस्थेच्या वतीने सन्मान.                                                                                                                                             

 वेब टीम नगर : बहुजन समाजातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या भावनेने संस्थेची स्थापना संस्थापक दा.ता.रूपवते यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह केली या बहुजन शिक्षण संघात प्राचार्य.डी.व्ही.शिंदे सरांचे योगदान मोलाचे आहे त्यांनी सर्वसामान्यांची मुले शिक्षणासाठी 30 वर्षे योगदान देऊन दा.ता. रूपवते यांच्या प्रेरणेने कार्य केले असल्याची भावना अँड. संघराज रुपवते यांनी व्यक्त केली शहरातील सिद्धिबाग जवळील बहुजन शिक्षण संघाचे दादासाहेब रुपवते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डी.व्ही.शिंदे सर हे शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त झाले त्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात अँड.संघराज बोलत होते.संस्थेच्या वतीने सेवापुर्ती निमित्त प्राचार्य शिंदे सरांचा व त्यांच्या पत्नींचा शाल.श्रीफळ. स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला सत्काराला उत्तर देताना प्राचार्य.शिंदे सर म्हणाले की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला संस्थेने बहुजनांच्या मुलांना सुशिक्षित करण्याची संधी दिली या शिक्षण संस्थेत अनेक विद्यार्थी घडले असून ते उच्च पदावर आपले कर्तव्य पार पाडत आहे सेवापुर्ती होत असताना संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या सन्मानाने भारावलो असल्याचे सांगितले तर संस्थेच्या कार्यात नेहमी सहभाग नोंदवुन शिक्षण प्रवाहात योगदान देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी संस्थेचे रजिस्टार प्रा.व्ही.एम.बैचे, ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सुनील पंडित, मा.नगरसेवक अजय साळवे, प्रा.शरद मेढे, मुख्याध्यापक विलास साठे, आर. एम.घोडे, यु.एस.मूनतोडे, जगताप आदींनी आपले विचार व्यक्त केले यावेळी जिना रूपवते, अहमदनगर कॉलेजचे प्रा.अरुण बळीद, ज्येष्ठ मार्गदर्शक मिलिंद गायकवाड, सुनील शिंदे, प्रा.सुभाष चिदे, माध्यमिक सोसायटीचे आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, प्रा.मारुती लांडगे, प्रा.डी.व्ही.बांगर, प्रा. भीमराव पगारे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक पर्यवेक्षक रवींद्र पटेकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.जयंत गायकवाड व सुनील वाघमारे व सुनील बढे यांनी केले आभार प्रा. राहुल खंडीझोड यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालय व जुनिअर कॉलेज च्या सर्व शिक्षक वृद्धांनी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लघुपट समाज जागृतीचे मोठे माध्यम 

बाळासाहेब बोराटे :  कोरोना प्रतिबंधासाठी जनजागृतीवर मास्क या लघुपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ

वेब टीम नगर : कोरोनाच्या संकटानंतर भविष्यात शाळा उघडल्यावर पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी कशी खबरदारी घ्यावी? या विषयाच्या जनजागृतीसाठी नगरच्या कलाकारांनी मास्क या लघुपटाच्या निर्मितीचे कार्य सुरु केले आहे. लवकरच हा जनजागृतीवर लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मास्क या लघुपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते झाला. 

यावेळी लेखक, दिग्दर्शक भैय्या बॉक्सर, मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक जावेद शेख, निर्माता बबलू सय्यद, राजू जहागीरदार, मुशाहीद शेख, अजीम राजे, कॅमेरामन हमझा शेख, अशोक पायमोडे, वसीम शेख, स्मिता इथापे, संदीप खरमाळे, वर्षा चोथे, मोईन शेख, दिपाली खरमाळे, कैफ शेख, अनिस शेख, मुद्दसर शेख आदी कलाकार उपस्थित होते.

 कोरोनाच्या संकटानंतर भविष्यात शाळा उघडल्यावर मुलांची काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाचे संकट पुर्णत: टळले नसून, सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसीची प्रतिक्षा आहे. मात्र ही लस प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला देण्यासाठी मोठा कालावधी लागणार असला तरी काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूने हा सामाजिक विषय हाताळण्यात आला असल्याची माहिती लघुपटाचे लेखक तथा दिग्दर्शक भैय्या बॉक्सर यांनी दिली. लघुपट समाज जागृतीचे मोठे माध्यम आहे. या संकटकाळात कलाकारांनी सामाजिक भावनेने जनजागृतीसाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांची आज सर्व क्षेत्रात प्रगती

आ. संग्राम जगताप : राष्ट्रवादीच्या वतीने महिला शिक्षण दिन साजरा

वैद्यकिय व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान  

वेब टीम नगर : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या व भारताच्या प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रेरणेने मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून, महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडी करुन दिली. आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहे. सावित्रीबाईंनी महिलांना खर्या अर्थाने जगण्याची दिशा दिली. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला. त्यामुळेच आज महीला उच्च शिक्षण घेऊन सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती करत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. तसेच राज्य सरकारच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी केली जात असताना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वैद्यकिय व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सुरेश बनसोडे, अंजली आव्हाड, संतोष ढाकणे, संजय सपकाळ, मळू गाडळकर, संभाजी पवार, दिपक खेडकर, अमित खामकर, भरत गारुडकर, साहेबान जहागीरदार, मतीन शेख, प्रा. प्रशांत म्हस्के, शहानवाज शेख, प्रकाश कराळे, खंडू काळे, निलेश इंगळे, गणेश बोरूडे आदी उपस्थित होते.

प्रा. माणिक विधाते म्हणाले की, सावित्रीबाई फुलेंचे आदर्श समोर ठेऊन महिलांनी योगदान द्यावे. राज्य सरकारने सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षमयी योगदानाची स्मृती ठेवत महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णयाचे स्वागत असून, राष्ट्रवादीच्या वतीने कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकिय क्षेत्रात योगदान देणार्‍या व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान करण्यात आला असल्याचे सांगितले.        

यावेळी आयुर्वेद महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये कार्य केलेल्या डॉ.ए.ए. देशमुख, डॉ.पी.एस. जगताप, डॉ.एम.व्ही. देशमुख, डॉ.पी.एस. नलगे, डॉ.व्ही.के. वाघे, डॉ.यु.एस. पाटील, डॉ.आर.व्ही. म्हसे, डॉ. ए.पी. पवार यांचा तसेच दामोदर विधाते (मास्तर) प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका शोभा गिते, सविता सोनवणे, शोभा गाडगे, लता म्हस्के, सारिका गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 सावित्रीच्या लेकींसाठी रोशनी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

     टाटा पॉवर कॅम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि बॉस्को ग्रामिण विकास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने : सावित्रीबाई फुले जयंतीचा उपक्रम

वेब टीम नगर : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून टाटा पॉवर कॅम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि बॉस्को ग्रामिण विकास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव कौंडा (ता. नगर) येथे महिलांसाठी रोशनी प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्रा कोटक बँकेच्या (मुंबई) सीएसआर माया पाटील, मराठवाडा ग्रामीण विकास केंद्राच्या श्रद्धा चव्हाण, टाटा पॉवर कॅम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टचे सीएसआर विश्‍वास सोनावले, बॉस्को ग्रामिण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज डिअ‍ॅब्रिओ, सरपंच सतीश ढवळे, उपसरपंच छायाताई ढवळे आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

प्रास्ताविकात फादर जॉर्ज  डिअ‍ॅब्रिओ म्हणाले की, महिला सक्षमीकरणाच्या उद्दीष्टाने व त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी रोशनी प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महिलांना ब्युटीपार्लर, शिवणकाम, मसाला बनविणे, रजई बनविणे आदि घरगुती पध्दतीने रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 विश्‍वास सोनावले म्हणाले की, महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्दीष्टाने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे सांगून, त्यांनी टाटा पॉवरच्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तर सर्व महिलांना स्वरोजगार मिळवण्यासाठी या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून कला, कौशल्य आत्मसाहत करण्याचे आवाहन केले. गावाचे सरपंच सतीश ढवळे यांनी महिलांच्या आत्मनिर्भरसाठी टाटा पॉवर आणि बॉस्को ग्रामीण विकास केंद्राने सुरु केलेल्या उपक्रमाचे विशेष आभार मानून महिलांना या प्रशिक्षण केंद्राचा लाभ घेण्याचे सांगितले.

श्रद्धा चव्हाण यांनी महिलांना सावित्रीबाई फुले जयंतीच्या शुभेच्छा देत सावित्राबाईंची प्रेरणा घेऊन आत्मनिर्भर बनण्यासाठी आवाहन केले. माया पाटील यांनी शिक्षणाने महिला आत्मनिर्भर बनू शकतात. प्रशिक्षणातून महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. स्वत:चा विकास साधण्यासाठी महिलांनी कला, कौशल्ये आत्मसात करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. उपसरपंच छायाताई ढवळे यांनी महिलांच्या वतीने सर्व पाहुण्यांचे आभार मानले. 



Post a Comment

0 Comments