नगर बुलेटीन 23-12-2020

 नगर बुलेटीन 

आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न व्हावे-  प्रसाद शिंदे 

वेब टीम नगर : अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या संख्येने आदिवासी समाज राहत आहे.आदिवासी समाजाचा विकास व्हावा या हेतूने शासनाच्या माध्यमातून आदिवासी विकास योजना राबवल्या जातात या सर्व योजनांचा लाभ आणि माहिती अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाजातील व्यक्तीना मिळावा या साठी  आदिवासी योजना माहिती कक्ष स्थापन व्हावा  तसेच .या कक्षाच्या माध्यमातून गाव ,शहर ,जिल्हा स्थरावर शासकीय कार्यालयात योजनेच्या बाबतीत जनजागृती साठी देखील कक्ष स्थापन व्हावा  अशी मागणी प्रसाद शिंदे यांनी केली 

 शिंदे यांनी माहिती दिली आहे की आदिवासी समाज गावकुसाबाहेर रहायला आहे.विविध योजना बाबतीत सहजासहजी माहिती मिळत नाही त्यामुळे योजनेपासून आदिवासी समाज हा वंचित राहत आहे.सध्या कार्यन्वीत असणाऱ्या खावटी योजने संदर्भात देखील पुढील रुपरेषा काय आहे.या योजनेचा फायदा मिळनार आहे की नाही या बाबतीत देखील समाजात संभ्रम  निर्माण झाला आहे.आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी विविध वसतीगृह आहेत.त्या बाबतीत देखील आढावा घेणे गरजेचे आहे.आदिवासी समाजाचे जिवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न व्हावेत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून मदत व्हावी तसेच अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी समाजाची जनगणना व्हावी ही देखील आदिवासी संघर्ष सामिती अ.नगर जिल्ह्याच्या वतीने तसेच शिंदे यांच्या  वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदना व्दारे विनंती करण्यात आली.या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे ,उपजिल्हाध्यक्ष गणेश खोकले,स्वप्निल गायकवाड ,जिल्हा सरचिटणीस प्रसाद शिंदे.आदि उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बहुजन विकास मंत्री ना.विजय वडेट्टीवार  यांच्या उपस्थितीत

ओबीसी, व्ही.जे., एन.टी.जनमोर्चाचा नगरात शनिवारी जिल्हा मेळावा

मेळाव्याची तयारी पूर्ण - हजारोंच्या संख्येने उपस्थितीचे आवाहन

   वेब टीम नगर : राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी, व्ही.जे., एन.टी.सह अन्य उपेक्षित समाजाचा जिल्हा मेळावा नगर शहरात आयोजित करण्यात आला आहे. येथील टिळक रोडवरील लक्ष्मी-नारायण मंगल कार्यालयात शनिवारी (दि.२६) स.११.३०वा. हा मेळावा होणार असून, यावेळी ओबीसीचे नेते बाळासाहेब सानप, आणि बारा बलुतेदार संघटनेचे राज्य अध्यक्ष कल्याणराव दळे  सह अन्य नेतेही उपस्थित राहणार आहेत,  अशी माहिती ओबीसी नेते अशोक सोनवणे, भगवान फुलसौंदर यांनी दिली.

     डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले घटनात्मक अधिकार मिळविण्यासाठी राज्यातील ओबीसी सह उपेक्षित समाज संघटीत करण्याचा निर्धार करुन ओबीसीचे आरक्षण वाचविणे आणि विविध समाजाच्या प्रलंबित ज्वलंत प्रश्‍न सोडविण्यासाठी ओबीसी, व्ही.जे., एन.टी. जनमोर्चाची निर्मिती झाली आहे. राज्याचे नेते ना.विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब सानप आदि या प्रश्‍नी महाराष्ट्रात संघटीत शक्ती उभी करीत आहे. त्यानुसारच नगर शहरात संघटन करण्यात आले आहे, असे आयोजक सदस्य रमेश सानप, शौकतभाई तांबोळी यांनी सांगितले.

     ओबीसी, व्ही.जे., एन.टी. आदि समाज विविध संघटनेत विभागाला असाला तरी मूळ प्रश्‍न आणि समाजाचे हित ओळखून सर्व संघटना एकमेकांना सहकार्य देत एकत्र आहे आणि भविष्याचा विचार करता सर्वांनी संघटीत असण्याशिवाय पर्याय नाही, म्हणूनच दि.३० चा मोर्चा रद्द जरी झाला असला तरी बंदिस्त सभागृहातला मेळाव्यासाठी मोर्चातील सर्वच प्रयत्न करीत आहे, असे हरिभाऊ डोळसे, डॉ.श्रीकांत चेमटे यांनी सांगितले.

     मेळाव्याला विविध ५०-५५ समाजाचे प्रतिनिधी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतील, असे नियोजन आयोजकांनी केले आहे. नगरमध्ये ओबीसी, व्ही.जे.,एन.टी. सह विविध समाजाचे संघटन बांधणी राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. संघटीत शक्तीमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लावू दिला जाणार तर नाहीच पण, विभागला गेलेला उपेक्षित समाज भविष्याची नांदी ओळखून एकत्र वाटचाल करेल आणि पुढची पिढी उपेक्षित राहणार नाही याची दक्षता घेणार आहे, असे बाळासाहेब बोराटे, आनंद लहामगे यांनी सांगितले.

     मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कोणाचाही विरोध नाही पण, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी आमची प्रथम पासूनच भुमिका आहे. ओबीसी, व्ही.जे., एन.टी. आदि समाजाच्या हक्कासाठी ही चळवळ आहे. मराठा समाजाची संघटीत ताकद ही आमची प्रेरणा असून मोठ्या भावाच्या भुमिकेत  मराठा समाज तर आम्ही सर्व लहान भाऊ असं नातं आहे. लहान भावाच्या हक्काला मोठा भाऊ संमती देतो, ही आपली संस्कृती आहे, असे इंजि.बाळासाहेब भुजबळ, राजेंद्र पडोळे म्हणाले.

     ओबीसी आरक्षणात कोणाचाही समावेश नको, नोकरी भरती तात्काळ सुरु करण्यात यावा, एमपीएससी परिक्षा तात्काळ सुरु करण्यात याव्या, शिक्षक-नोकर भरती कपात न करता करण्यात यावी, महाज्योतीला १००कोटी निधी मिळावा, जात निहाय जनगणना करण्यात यावी, महात्मा फुले आणि सावित्रीमाय फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, बारा बलुतेदारांना आर्थिक विकास महामंडळ जाहीर करण्यात यावे. या महामंडळास ५०० कोटीचा निधी मिळावा, एससी-एसटी प्रमाणे सर्व अभ्यासक्रमासाठी १००टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी, धनगर समाजाचे विविध मंजूर योजनांना १०० कोटी निधी उपलब्ध करुन योजना त्वरीत सुरु कराव्यात, ओबीसी मुस्लिम समाजाला शिक्षणासाठी ओबीसी कोट्यामध्ये विशिष्ट प्रवर्ग तयार करुन ४ टक्के सब कोटा देण्यात यावा आणि मुस्लिम समाजातील पोट जातीचा जनगणनेत स्पष्ट उल्लेख करावा, आदि मागण्या शासन दरबारी मांडणार आहे, असल्याचे सुनिल भिंगारे व डॉ.परवेझ अशरफी यांनी सांगितले.

     या पत्रकार परिषदेस रावळ समाजाचे शशिकांत पवार, संजय गांधी निराधार समितीचे बाळासाहेब भुजबळ, अनिल निकम, अ‍ॅड.अभय राजे, संजय आव्हाड, बालाजी डहाळे, विशाल वालकर, ज्ञानेश्‍वर गायकवाड  आदि उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यास गावकर्‍यांना गोरे डेंटलमध्ये सवलतीत उपचार

      वेब टीम नगर :  नगरमधील विविध गावांत होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणार्‍या गावकर्‍यांसाठी माळीवाडा येथील गोरे डेंटल हॉस्पिटलच्यावतीने दंत उपचारात ३० ते ५० टक्के सवलत देण्यात येईल, असे दंततज्ञ डॉ.सुदर्शन गोरे यांनी जाहीर केले.

    विशेषत: नगर, पारनेर, कर्जत, राहुरी, पाथर्डी व नेवासा या तालुक्यातील विविध गावात बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी ही योजना लागू राहील. या सवलतीत दंतउपचार योजनेत फिक्स दात बसविणे, एका दिवसात रुट कॅनाल करणे, वेडेवाकडे दात सरळ करणे, लहान मुलांचे रुट कॅनाल यासारख्या सर्व दंत उपचारांवर ३०  ते ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

     बिनविरोध निवडणुका करणार्‍या गावांसाठी भविष्यात सुदृढ आरोग्य योजनेतंर्गत मोफत सर्वरोग निदान शिबीरे, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरे, व्यसनमुक्तता शिबीरे, यासारखी शिबीरे नगर डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून राबवणार असल्याचेही डॉ.सुदर्शन गोरे यांनी सांगितले.

     ग्रामपंचायत निवडणुकीत वेळ, पैसा, शक्ती व मनुष्यबळ यांचा विनाकारण अपव्यय होतो. सुदृढ लोकशाहीसाठी आणि विशेषत: तरुणाईला वाईट मार्गाला जाण्यापासून रोखण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात हा उद्देश या योजने मागील आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिवराष्ट्र सेना पक्षाच्या ओबीसी आघाडी

जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब करपे यांची नियुक्ती

   वेब टीम  नगर : शिव राष्ट्र सेना पक्षाच्या ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब करपे यांची निवड करुन पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांच्या हस्ते त्यांना पत्र देण्यात आले. यापसंगी जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विजय पितळे, ज्येष्ठ पदाधिकारी भैरवनाथ खंडागळे, राधाकिसन कुलट आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी संतोष नवसुपे म्हणाले, शिवराष्ट्र सेनेच्यावतीने सर्वसामान्यांच्या विविध प्रश्‍नांसाठी कार्य करत आहे. प्रत्येक घटकाला प्रतिनिधीत्व असावे, त्यांच्या प्रश्‍नांना न्याय मिळावा, यासाठी पक्षात सर्वांना सहभागी करुन घेण्यात येत आहेत. सध्या ओबीसी समाजाच्यावतीने विविध प्रश्‍नांसंदर्भात मोर्चा, आंदोलने, बैठका सुरु आहेत. अशा परिस्थितीत शिवराष्ट्र सेना ओबीसींच्या पाठिशी उभे राहून त्यांच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करेल. यासाठीच शिवराष्ट्र सेनेच्या ओबीसी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब करपे यांची नियुक्ती करुन त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या या पदाला चांगला न्याय देतील, असा विश्‍वास संतोष नवसुपे यांनी व्यक्त केला.

     याप्रसंगी बाबासाहेब करपे म्हणाले, शिवराष्ट्र सेनेच्यावतीने सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी सतत आवाज उठविला आहे. या पक्षात काम करण्यास मोठी संधी असल्याने आपण कार्यरत राहून काम करत आहोत, आता ओबीसी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन जो विश्‍वास दाखविला तो सर्वांना बरोबर घेऊन सार्थ ठरवू. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ ओबीसींपर्यंत पोहचविण्याचा आपला प्रयत्न राहील, असे सांगितले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय कांबळे यांनी केले तर आभार भैरवनाथ खंडागळे यांनी मानले.  याप्रसंगी  प्रशांत देठे, राजू चावक, अयि म्हस्के, माऊली बाधाडे, नवनाथ नागरगोजे, विवेक डफळ, धनंजय डोके, अनुप गांधी, ऋषी शिंदे, निलेश जायभाय, विजय जगताप, अजय अपुर्वा, अनिकेत पवार, ओमकार जाधव, साहिल सोनटक्के आदिं उपस्थित होते. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अहमदनगर महाविद्यालयात नाताळ सण उत्साहात साजरा

सोशल मिडियाच्या माध्यातून सहभागी होत विद्यार्थी व शिक्षकांचे लाईक्स

   वेब टीम  नगर : अहमदनगर महाविद्यालयात नाताळ सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत येत असतो. दरवर्षी दि.२० ते २२ डिसेंबरमध्ये अहमदनगर महाविद्यालयात चॅपल (चर्च)मध्ये साजरा करण्यात येतो आणि यानंतर महाविद्यालयात सुट्टी जाहीर होते. यंदा कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे महाविद्यालये बंद असल्याने यंदाचा नाताळ उत्सव हा महाविद्यालयात साजरा होईल की नाही, याबाबत संभ्रम होता. परंतु उत्साही विद्यार्थी आणि शिक्षकांनी मागील काही दिवसांपासून प्रचंड मेहनत घेत अथक परिश्रम करत प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे नियोजन केले. आपली प्रॅक्टिस निरंतर सुरु ठेवत, आवश्यकतेनुसार  भव्य दिव्य सेट तयार करण्यात आले. चर्चला रोषणाई केलेली आहे. विविध विद्यार्थ्यांच्या ग्रुप साँगने धमाल केली. अशा या पवित्र वातावरणात हा पवित्र नाताळ सण विद्यार्थी आणि काही शिक्षकांच्या मदतीने साजरा करण्यात आला.

     सदर कार्यक्रमाचे संपूर्ण प्रोफेशनल पद्धतीने चित्रीकरण करण्यात आले आणि दिनांक २०डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. युट्यूब प्रिमिअरवर प्रसारित करण्यात आले. सदर ऑनलाईन नाताळ कार्यक्रमाचा समस्त आजी-माजी विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.हजारो लाईक्स मिळवत कार्यक्रमाचे चित्रीकरण संपूर्ण देश-विदेशात प्रसारित झाले.

     याप्रसंगी प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस म्हणाले, विविध सण उत्सव ही आपली संस्कृती आहे. या संस्कृतीतून आपणास अनेक गोष्टी शिकण्यास मिळतात. हे सण आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. यातून आपणास उर्जा व प्रेरणा मिळत असते.  सर्वांना एकत्र घेऊन एका धाग्यात गुंफण्याचे काम यानिमित्त होत असते. त्याचबरोबर संस्कृती व चाली-रितेचे आदान प्रदान यानिमित्त होत असते. सध्या कोरोनामुळे महाविद्यालय जरी बंद असले तरी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनी नाताळ सणात खंड पडू न देता.  ‘शो मस्ट गो ऑन’ हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला. विद्यार्थ्यांनीही सोशल मिडियाच्या माध्यमातून या कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला, असल्याचे सांगून सर्वांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या.

     यासाठी प्रा.फिलिख अब्राहम, अरुण बळीद, विनय रणनवरे, सुजाता लोंढे, उज्वला गायकवाड, श्रद्धा त्रिभुवन, सानिका जाधव, प्रा. प्रतुल कासाटे, प्रा.गौरव मिसाळ आदिंनी परिश्रम घेतले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कवी सुभद्रासुतांच्या ‘झरा जाणिवांचा’ काव्य संग्रहास प्रथम पुरस्कार

   वेब टीम  नगर : केडगाव येथील कवी सुभद्रासुत उर्फ संजय आंधळे यांच्या  ‘झरा जाणिवांचा’ या सामाजिक वास्तववादी काव्य संग्रहाला शब्दगंध साहित्य परिषद व राष्ट्रीय एकता वाहन चालक श्रीरामपुर शाखा यांच्यावतीने काव्यसेवा ‘राष्ट्रीय संत गाडगेबाबा पुरस्कार -२०२०’  संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त देण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. शिरीष लांडगे, डॉ बाबुराव उपाध्ये, शेख मिराबक्ष बागवान, ह.भ.प शरद महाराज बनसोडे, सुनिल गोसावी, प्रा.डॉ.शैलेंद्र भनणे, कवी आनंदा साळवे, रफिक शेख यावेळी व्यासपिठावर व साहित्यिक उपस्थित होते.

     कवी सुभद्रासुत यांचा ‘झरा जाणिवांचा’ २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या पहिला काव्यसंग्रह हा वाचनीय आणि समाजास विविध अंगाने व विषयान्वे प्रबोधानात्मक असा आहे. ही दुरदुष्टी समोर ठेऊन पुरस्कारासाठी कवी सुभद्रासुत यांच्या या काव्य संग्रहाची निवड झाली.

     या पुरस्काराबद्दल नागलवाडी (शेवगाव) व पंचक्रोशी अहमदनगर (केडगाव ) येथील अनेकांकडून कवी सुभद्रासुतांचे कौतुक होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ग्राहकांची फसवणुक थांबण्यासाठी संघटना कटिबध्दग्राहक 

 तुकाराम महाराज निंबाळकर : कल्याण फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी निलेश चांदणे यांची नियुक्ती

वेब टीम नगर : ग्राहक कल्याण फाउंडेशनची (महाराष्ट्र राज्य) अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम महाराज निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीप्रसंगी उपाध्यक्ष रामचंद्र तांबे, राज्य कार्यवाहक सतीश कातोरे, नाशिक जिल्हाध्यक्ष प्रवीण चौधरी उपस्थित होते. या बैठकित निलेश नामदेवराव चांदणे यांची सर्वानुमते अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम महाराज निंबाळकर यांच्या हस्ते चांदणे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या बैठकित ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. विविध वस्तू खरेदी करताना, स्वस्त धान्य दुकान, मेडिकल अन्य काही वस्तू खरेदीवर ज्यादा पैसे अथवा ग्राहकांचा फसवणुक झाल्यास फसवणुक करणार्‍या दुकानदारांवर ग्राहक मंचात कशा पध्दतीने कारवाई केली जाते याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.  

तसेच यावेळी फाऊंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी पंकज कर्डिले, जिल्हा कार्यवाहक गणेश बेल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे, भगवान जगताप, किशोर पवार, सुनील सकट, गणेश ढोबळे, तुषार वाघमारे, प्रशांत पवार, नितीन लांडगे, मुन्ना पवार, मंगेश शिंदे, अरुण इनामदार, सिताराम नवले, प्रवीण गव्हाणे, अस्लम तांबोळी, संतोष मगर, चिंतामणी गिरमकर, विकास महाजन आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

संस्थापक अध्यक्ष तुकाराम महाराज निंबाळकर यांनी नुतन पदाधिकार्‍यांना ग्राहकांच्या न्याय, हक्कासाठी काम करण्याचे आवाहन करुन ग्राहकांची फसवणुक थांबण्यासाठी संघटना कटिबध्द असल्याचे सांगितले. तर नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नूतन पदाधिकार्‍यांचे या नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढण्यासाठी शिंदे यांचे कार्य प्रभावी 

बाबासाहेब बोडखे :  शिक्षकांच्या वतीने प्र. शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांचा सत्कार

वेब टीम नगर :  जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांची प्रभारी शिक्षणाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल शिक्षकांच्या वतीने त्यांचा सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. मुख्याध्यापक संघाचे शहराध्यक्ष ज्ञानदेव बेरड, शिक्षक परिषदेचे नेते व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, जुनी पेन्शन कोअर कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे यांच्या हस्ते प्र. शिक्षणाधिकारी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बबन साळवे, राजेश सोनवणे, रोहित शिदोरे, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब रोहोकले, बन्सी नरवडे, वैभव शिंदे आदि उपस्थित होते.

बाबासाहेब बोडखे म्हणाले की, उपशिक्षणाधिकारी असताना शिवाजी शिंदे यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढण्यासाठी प्रभावीपणे कार्य केले. कोरोनाच्या संकटकाळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी देखील त्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन अभ्यासक्रमाचे उत्तमप्रकारे नियोजन केले. त्यांचे शिक्षण क्षेत्रात असलेले योगदान व काम करण्याची तळमळ ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपुर्ण राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्र. शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व सामान्य घटकातील शिकणार्‍या मुलांना कशा पध्दतीने अद्यावत व गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळेल हे उद्दीष्ट ठेऊन कार्य करणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात शाळा बंद असल्यातरी विद्यार्थ्यांचे शिक्षण अविरतपणे सुरु राहण्यासाठी व शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने कामकाज सुरु राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बापू आणि बा पुरस्कार डॉ.वाटवाणी आणि आरती पालवे यांना जाहीर

  




वेब टीम नगर : यंदाच्या पहिल्या बा आणि  बापू पुरस्कारांसाठी  मानसोपचार तज्ञ भरत वाटवाणी आणि बुलढाणा येथील सेवा संकल्प संस्थेच्या संचालिका आरती नंदू पालवे यांची  निवड करण्यात आली आहे. स्नेहालय आणि अनामप्रेम परिवारातर्फे अजित कुलकर्णी , राजीव गुजर, फिरोज तांबटकर आणि  अनिता अजित माने यांच्या  समितीने डॉ.वाटवाणी आणि पालवे यांची त्यांच्या प्रकल्पांना भेटी देऊन निवड केली.

येत्या गुरुवारी, दिनांक २४ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ४.३० वाजता  रूपाली मुनोत बालकल्याण संकुल  केडगाव , अहमदनगर येथे  पद्मश्री पोपटराव पवार, पंजाब सरकार मधील कमिशनर ऑफ स्टेट टॅक्सेस नीळकंठ आव्हाड ,ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक महावीर जोंधळे, बिन पटाच्या भिंती , हे संस्थांमधील अनाथ मुलांचे जीवन व्यक्त करणारी आत्मकथा लिहिणाऱ्या इंदुमती जोंधळे आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजण्यात आल्याचे निवड समितीने सांगितले.

 श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन, स्थापन करून दहा हजारांवर मानसिक आजारी रुग्णांना संपूर्ण बरे करुन त्यांच्या घरी पोहोचविण्याचे  अतुल्य काम  मानसोपचार तज्ञ  भरत वाटवाणी यांनी केले.

त्यासाठी त्यांना जगातील प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार वर्ष २०१८ मध्ये मिळाला होता.

बा पुरस्कार मागील एक दशकापासून चिखली  (जि. बुलढाणा )येथील मानसिक आजारी रुग्णांची सेवा - सुश्रुषा आणि कौटुंबिक पुनर्वसन करणाऱ्या  आरती नंदू पालवे यांना देण्यात येत आहे .प्रत्येकी ५० हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

मोरे यांची जन्मशताब्दी पुणे जिल्ह्यातील दिवंगत स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार, आणि माजी आमदार  श्‍यामकांत दामोदर मोरे यांची यंदा जन्मशताब्दी  आहे. स्व.सीताबाई मांढरे या एक सामाजिक जाणीव संपन्न गृहिणी होत्या. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे कुटुंबीय भारती आणि किरीटी श्यामकांत मोरे यांनी दिलेल्या ठेवीतून बा आणि बापू पुरस्कार यापुढे दिले जाणार आहेत.

मागील वर्षी महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या दीडशेव्या जन्मदिनाचे औचित्य साधून   स्वर्गीय शामकांतजी आणि सीताबाई  मांढरे यांच्या स्मरणार्थ  मोरे दांपत्याने हा उपक्रम   सानुदान सुचवला होता.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  


 


Post a Comment

0 Comments