पेटत्या गाडीतच झाला पाच जणांचा मृत्यू

 पेटत्या गाडीतच झाला पाच जणांचा मृत्यू 


वेब टीम पाटणा : उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये यमुना एक्सप्रेस वे वर मंगळवारी सकाळी एक विचित्र दुर्घटना घडली. एका गाडीनं समोरून आलेल्या कंटेनरला धडक दिल्यानंतर लगेचच पेट घेतला. हा अपघात इतका भयंकर होता की गाडीत बसलेल्या पाच जणांना बाहेर पडणंही शक्य झालं नाही आणि गाडीतच जळून त्यांचा मृत्यू झाला.गाडीतील पाचही मृत लखनऊचे रहिवासी असल्याचं समजतंय. ते नोएडा - दिल्लीकडे जात होते. यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता.

एत्मादपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक कंटेनरचा वेग जास्त होता. त्यातच चालकानं हा कंटेनर चुकीच्या दिशेनं वळवला. तेवढ्यात समोरून आग्र्याहून लखनऊला जाणारी एक गाडी येऊन ट्रक कंटेनरच्या डिझेल टँकवर आदळली आणि गाडीने पेट घेतला.

गाडीमध्ये सेंट्रल लॉक असल्यानं सगळेच प्रवासी आत अडकून पडले. त्यातील कुणालाही बाहेर पडणं शक्य झालं नाही. गाडीनं हा हा म्हणता पेट घेतला आणि क्षणार्धात सगळं काही जळून भस्मसात झालं.

पेटलेल्या गाडीतून येणारा आवाज ऐकून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या काही चालकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. 'आम्हाला वाचवा... आम्हाला वाचवा' अशा केवळ किंकाळ्या आगीतून ऐकू येत होत्या, एका लहान मुलाला वाचवण्याचा प्रयत्नही करण्यात आला परंतु आग एव्हढी भडकली होती की कुणालाही काहीही करणं अशक्य झालं होतं, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय.

यमुना एक्सप्रेस वेवर बनलेल्या एका बूथ कर्मचाऱ्यानं पोलिसांना या दुर्घटनेची सूचना दिली. तसंच अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आलं. आगीवर ताबा मिळवण्यात आलं परंतु, तेव्हापर्यंत गाडीतील कुणीही जिवंत उरलं नव्हतं. गाडीतील पाचही प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू झाला होता.

या अपघातानंतर ट्रक कंटेनरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आग्रातील या घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केलाय.

Post a Comment

0 Comments