देशातील ८० लाख राज्य सरकारी कर्मचारी जाणार संपावर

देशातील ८० लाख राज्य सरकारी कर्मचारी जाणार संपावर

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने : २६ नोव्हेंबरच्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचे आवाहन

वेब टीम नगर - टाळेबंदी काळात कामगार विरोधी घेतलेले निर्णय, खाजगीकरण व कंत्राटीकरणाने राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांच्या आर्थिक सेवा व हक्क विषयक अस्वस्थता निर्माण झाली असल्याने या हक्काचे व अधिकार अबाधित ठेऊन विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, अहमदनगर जिल्हा शाखा या संपात उतरणार आहे. या संपात जिल्ह्यातील सर्व सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने गेल्या ६० वर्षापासून केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने लढा दिला आहे. त्यामुळे देशातील २७ राज्यातील ८० लाख राज्य सरकारी कर्मचारी या महासंघाच्या छत्राखाली भक्कमपणे गेली सहा दशके एकसंघ राहिले आहेत. केंद्र शासनाने गेल्या आठ महिन्यातील कोरोना कालावधीत महामारीची ढाल पुढे करून कामगार, कर्मचारी विरोधी कायदे, अर्थविषयक लाभाचा संकोच व सेवा विषयबाबीत कर्मचारी जीवन विरोधी धोरणे जाहीर करून कर्मचार्यांच्या शाश्‍वत सेवाजीवनालाच आव्हान देण्याचा दुर्देवी प्रयत्न केला आहे. देशाचा अन्नदाता शेतकर्याला सुद्धा मारक धोरणे लादून देशोधडीला लावण्याचा प्रयत्न चालू आहे. नफ्यात असणारे शासकीय उद्योग विक्रीला काढून सुसह्य सामाजिक जीवनासाठी आवश्यक असणारी मिश्र अर्थव्यवस्था उध्वस्त करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे देशभरातील राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांना तसेच कामगारांना स्वतःचे अस्तित्वालाच आव्हान दिल्याचे चित्र दिसून येत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

भयग्रस्त वातावरणात कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व कामगार अस्वस्थ झाले आहेत. केंद्रशासनाने कामगार, कर्मचारी याबाबत खाजगीकरण, कंत्राटीकरण व उदारीकरण याबाबतची अतिरेकी धोरण लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. याला विरोध दर्शवीत केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशातील कामगार, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी २६ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी लाक्षणिक संपावर जाणार आहे.

सर्वांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, खाजगीकरण कंत्राटीकरण धोरण रद्द करून सध्याच्या अंशकालीन व कंत्राटी कर्मचार्यांच्या सेवा नियमित करावे, मुदतपूर्व सेवानिवृत्ती जाचक धोरण रद्द करावे, कामगार, कर्मचारींना देशोधडीला लावणारे नवीन कामगार कायदे रद्द करावे, केंद्रीय कर्मचार्यांना मिळणारे सर्व भत्ते राज्य कर्मचार्यांना मंजूर करावे, सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरावी, पदे भरताना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या करावे, चतुर्थश्रेणी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांचे प्रलंबित प्रश्‍न तात्काळ सोडण्यात यावे, वेतन श्रेणी त्रुटी दूर करण्यासंदर्भात बक्षी समितीच्या अहवालाचा दुसरा खंड तात्काळ जाहीर करावा, अन्यायकारक शेतकरी कायदे रद्द करावे, दरमहा साडेसात हजार बेरोजगार भत्ता मंजूर करावा, प्रत्येक गरीब व्यक्तीला दरमहा दहा किलो अन्नधान्य पुरवठा करावा, प्रत्येक व्यक्तीला मनरेगा मार्फत किमान दोनशे दिवसांचा रोजगार मिळेल असे धोरण लागू करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments