कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने

 कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने 

कोजागरी पौर्णिमा या दिवशी रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जो जागा आहे, त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, अशी कथा आहे. या दिवसाचे महत्त्व आणि पूजाविधी या लेखातून समजून घेऊया.

कोजागरी पौर्णिमा हा उत्सव आश्विन पौर्णिमा या तिथीला साजरा करतात.

या वर्षी कोजागरी पौर्णिमा ३० ऑक्टोबर २०२० या दिवशी साजरी करा ! शुक्रवार, ३०.१०.२०२० या दिवशी सायंकाळी ५.४६ नंतर ‘कोजागरी पौर्णिमा’ चालू होते. या वर्षी ‘अधिक आश्‍विन मास’ असल्याने निज आश्‍विन पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ आहे.

पौर्णिमा तिथी दोन दिवस असल्यास कोणत्या दिवशी कोजागरी पौर्णिमा साजरी करावी ?

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयसमयी असणारी तिथी ग्राह्य धरली जाते. हिंदु पंचांगानुसार आश्‍विन मासात मध्यरात्रीला असणार्‍या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी ३०.१०.२०२० या दिवशी सायंकाळी ५.४६ पासून ३१.१०.२०२० या रात्री ८.१९ वाजेपर्यंत पौर्णिमा तिथी आहे. ३०.१०.२०२० या दिवशी मध्यरात्रीला पौर्णिमा असल्याने कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.

या दिवशी भगवान श्रीकृष्णाने व्रजमंडळात रासोत्सव साजरा केला, असे श्रीमद्भागवतात म्हटले आहे.

 आश्‍विन पौर्णिमेच्या विविध नावांचा अर्थ

आश्‍विन पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’, ‘नवान्न पौर्णिमा’ किंवा ‘शरद पौर्णिमा’ या नावांनी ओळखले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होते, त्या दिवशी ‘नवान्न पौर्णिमा’ साजरी केली जाते.

आश्‍विन पौर्णिमेला उत्तररात्री लक्ष्मीदेवी ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागता आहे ?’, असे विचारते; म्हणून या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ असे म्हणतात.

आश्‍विन पौर्णिमेला शेतकरी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवीन धान्याची पूजा करून त्याचा नैवेद्य दाखवतात; म्हणून या पौर्णिमेला ‘नवान्न पौर्णिमा’ असे म्हणतात.

आश्‍विन पौर्णिमा शरदऋतूत येते; म्हणून या पौर्णिमेला ‘शरद पौर्णिमा’ असे म्हणतात.

वर्षातील या दिवशी मूळ चंद्रतत्त्वाचे म्हणजे ‘चंद्रमा’चे प्रतिनिधित्व करणारा आणि आपल्याला दिसणारा चंद्र ‘चंद्रमा’प्रमाणेच शीतल आणि आल्हाददायक आहे. साधकांना चंद्रासारखी शीतलता ईश्वराच्या अवतारांपासून अनुभवता येते, म्हणूनच रामचंद्र, कृष्णचंद्र अशीही नावे राम-कृष्णांना दिली गेली. चंद्राच्या या गुणांमुळेच ‘नक्षत्राणामहं शशी’ म्हणजे ‘नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे’, असे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत (१०:२१) सांगितले आहे.

मध्यरात्री श्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येऊन ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागे आहे ?’, असे विचारून जो जागा असेल, त्याला धनधान्याने संतुष्ट करते.

या दिवशी ब्रह्मांडात आदिशक्तीरूपी धारणेतील श्री लक्ष्मीरूपी इच्छाशक्तीची स्पंदने कार्यरत असतात. या दिवशी धनसंचयाविषयी असलेल्या सकाम विचारधारणा पूर्णत्वाला जातात. या धारणेच्या स्पर्शाने स्थूलदेह, तसेच मनोदेह यांची शुद्धी होण्यास साहाय्य होऊन मनाला प्रसन्नधारणा प्राप्त होते. या दिवशी कार्याला विशेष असे धनसंचयात्मक कार्यकारी बल प्राप्त होते.

कोजागरीच्या रात्री जो जागृत आणि सावध असतो, त्यालाच अमृतप्राशनाचा लाभ मिळतो ! कोजागर · को ± ओज ± आगर. या दिवशी चंद्राच्या किरणांद्वारे सर्वांना आत्मशक्तीरूपी (ओज) आनंद, आत्मानंद, ब्रह्मानंद भरभरून मिळतो; परंतु हे अमृत प्राशन करण्यासाठी ऋषी म्हणतात, ‘को जागर्ति ?, म्हणजे कोण जागृत आहे ? कोण सावध आहे ? कोण याचे माहात्म्य जाणतो ? जो जागृत आणि सावध आहे आणि ज्याला याचे माहात्म्य ठाऊक आहे, त्यालाच या अमृतप्राशनाचा लाभ मिळेल !’ 

उत्सव साजरा करण्याची पद्धत

‘या दिवशी नवान्न (नवीन पिकवलेल्या धान्याने) जेवण करतात. श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची रात्री पूजा करतात. पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी देव आणि पितर यांना समर्पून नंतर नैवेद्य म्हणून ग्रहण करतात आणि मग आपल्याकडे आलेल्या सर्वांना देतात. शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर नैवेद्य म्हणून ते दूध ग्रहण करतात. चंद्राच्या प्रकाशात एकप्रकारची आयुर्वेदिक शक्ती आहे. त्यामुळे हे दूध आरोग्यदायी आहे. या रात्री जागरण करतात. करमणुकीसाठी निरनिराळे बैठे खेळ खेळतात. दुसर्‍या दिवशी सकाळी पूजेचे पारणे करतात.

Post a Comment

0 Comments