राज्य सरकारने मंदिरे उघडली नाही तर भाजपाचे तीव्र आंदोलन

राज्य सरकारने मंदिरे उघडली नाही तर

भाजपाचे तीव्र आंदोलन

 महेंद्र गंधे :शहर भारतीय जनता पार्टीचे लाक्षणिक उपोषण,धरणे आंदोलन 

    वेब टीम  नगर : राज्याचे आघाडी सरकार हे खरे तर बिघाडी सरकार आहे. एकही चांगला निर्णय सरकार घेत नाहीय हे   मंदिराची दारे बंद करुन मदिरेचे दारे उघडून  सरकारने सिद्ध केले आहे. कोरोनामुळे बंद झालेली मंदिरे अद्याप बंद आहेत, त्यामुळे मंदिरावर अवलंबून असलेले असंख्य पुजारी, पुरोहित, फुलवाले, प्रसादवाले व इतर छोट्या-मोठ्या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच भिक्षेकरींचीही आज दैयनिय अवस्था झालेली आहे, मात्र राज्य सरकारला अद्याप जाग आलेली नाही, म्हणून भाजप आज शहरात आंदोलन व लाक्षणिक उपोषण करत आहेत. यापुढेही जर सरकारला जाग आली नाही तर भाजप याहून अधिक तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक महेंद्र गंधे यांनी दिला.

     शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने व आध्यात्मिक आघाडीच्यावतीने राज्य सरकारने राज्यातील मंदिरे अद्याप उघडली नसल्याच्या निषेधार्थ गांधी मैदान येथील मार्कंडेय मंदिराजवळ लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महेंद्र गंधे बोलत होते. या आंदोलनात उपमहापौर मालन ढोणे, संघटन सरचिटणीस विवेक नाईक, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, सुनिल रामदासी, आध्यात्मिक आघाडी प्रमुख प्रद्युमन  जोशी, मध्य मंडल अध्यक्ष अजय चितळे, भिंगार अध्यक्ष वसंत राठोड, केडगांव अध्यक्ष पंकज जहागिरदार, महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस सुरेखा विद्ये, महिला बाल कल्याण समिती सभापती लता शेळके, नगरसेविका पल्लवी जाधव, रविंद्र बारस्कर, संगीता खरमाळे, अनिल सबलोक, राजू मंगलारम, उपेंद्र खिस्ती, भरत सुरतवाला, महेश नामदे, शिवाजी दहिंडे, वैभव जोशी, तुषार पोटे, विलास नंदी, श्रीगोपाल जोशी, सचिन पारखी, अभिजित चिप्पा, संध्या पावसे, प्रिया जानवे, राजु मंगलारप्, गोकूळ काळे, अनिल गट्टाणी, विलास नंदी आदिंसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी राधाकृष्ण महिला भजनी मंडळाचे भजन झाले.

यावेळी वसंत लोढा म्हणाले, महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्यासाठी भारतीय जनता पार्टीने या आधीही आंदोलने केले आहे. मात्र घरी बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व दारे उघडली मात्र मंदिराची दारे बंद ठेवली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने संपूर्ण भारतातील मंदिरे उघडण्यास परवानगी दिली असतांनाही त्यांच्या आदेशाची पायमल्ली महाराष्ट्रातील सरकार करत आहे. म्हणून आज पुन्हा राज्यातील सरकारला जाग येण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आंदोलन केले आहे.

उपमहापौर मालन ढोणे म्हणाल्या, रोज सकाळची सुरुवात प्रसन्न होण्यासाठी भगवंताचे दर्शन होणे आवश्यक आहे. मात्र मंदिरे बंद असल्याने रोज भाविकांची निराशा होत आहे. त्यामुळे सरकारने त्वरित निर्णय घेऊन मंदिरे उघडावीत.

     उपेंद्र खिस्ती म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदूत्ववादी आहेत. त्यांच्याच राज्यात हिंदूंना मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर आली आहे, हे खेदजनक आहे.

Post a Comment

0 Comments